वसई पंचायत समितीला सध्या लाचखोरीच्या विळख्याने ग्रासले आहे.
ठाणे – वसई पंचायत समितीला सध्या लाचखोरीच्या विळख्याने ग्रासले आहे. मागील काही दिवसात एका अधिका-यासह तीन जणांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यामुळे या पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यांना राज्य सरकारने विशिष्ट पुरस्काराने गौरवण्यात यावे, अशी मागणी वसईकर करू लागले आहेत.
वसई पंचायत समितीत सध्या विविध प्रकारचे घोटाळे सुरू असून यामध्ये बांधकाम विभागाचे स्थान अव्वल आहे. तर लाचखोरीमध्ये आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असणारे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल यादव यांना एका बोगस वैद्यकीय डॉक्टरकडून खंडणीच्या स्वरूपात दोन लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. यादव हे सध्या निलंबित असून ठाणे जिल्हा परिषदेकडून ७५ टक्के पगार वसूल करीत आहेत. तसेच त्यांनी स्वत:चा खासगी व्यवसायही वसईत मोठया जोमाने थाटला आहे.
ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागातील जयश्री निरगुडे या महिला शाखा अभियंत्याला ठेकेदार मधुकर सानकर यांच्याकडून ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. त्यांना या आरोपाखाली निलंबित करण्यात आल्यानंतर विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने निरगुडे यांचे डहाणू पंचायत समितीत पुनर्वसन करण्यात आले आहे. तर चंदनसार प्राथमिक आरोग्य केंद्रातील जयश्री गाढे या आरोग्य सेविकेने आशा योजनेच्या पाडा स्वयंसेविकेकडून थकलेले मानधन देण्यासाठी लाच मागितली होती.
या प्रकरणी मोबाईल संभाषणावरून गाढे यांना ठाणे लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले होते. परंतु लाचलुचपत विभागाने हे प्रकरण पुन्हा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे चौकशीसाठी पाठवले आहे. तर आरोग्य विभागाने चौकशीच्या नावाखाली प्रकरण बासनात गुंडाळून ठेवल्याने गाढे यांच्यावर प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे गाढे या मोठया जोमाने चंदनसार प्राथमिक आरोग्य केंद्रात आपल्या पदावर कार्यरत आहेत. विजयकुमार गोनगे या शिक्षकाकडून बदलीसाठी २५ हजारांची लाच मागितल्या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातून वसई पंचायत समितीत उचलबांगडी करण्यात आलेल्या सुनील जाधव या वरिष्ठ लिपिकाने पुन्हा जिल्हा परिषदेच्या आवारातच सतीश भोसले या शिक्षकाकडून लाच स्वीकारल्याने त्याच्या मुसक्या लाचलुचपत विभागाने आवळल्या होत्या. सध्या जाधव हा निलंबित असून जिल्हा परिषदेकडून ५० टक्के पगार उकळत आहे. वसई पंचायत समितीतील एका वैद्यकीय अधिका-यासह तीन जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्याने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस. एस. कुलकर्णी यांना राज्य सरकारने एखाद्या विशिष्ट पुरस्काराने गौरवावे, अशी मागणी वसईकर करू लागले आहेत.