विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण गरम झाले असताना वसई-विरार परिसरात अघोषित भारनियमनामुळे शहरवासीयांची पुरती झोप उडाली आहे.
विरार – विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण गरम झाले असताना वसई-विरार परिसरात अघोषित भारनियमनामुळे शहरवासीयांची पुरती झोप उडाली आहे. वादळी वा-यामुळे विद्युत यंत्रणा कोलमडून पडल्याचे कारण त्यासाठी पुढे केले जात असले तरी निवडणूक काळात मतदारराजाला भारनियमनाचे चटके बसत असल्याने त्याचा राग मतपेटीतून व्यक्त होण्याची शक्यता वाढली आहे.
रस्ते, पाणी, वीज आदी मूलभूत सुविधांसाठी प्रचाराला प्राधान्य आहे. मात्र दोन दिवसांपासून वसई, नालासोपारा आणि विरारमधील पूर्व, पश्चिम पट्टय़ात अंधारयात्रा सुरू आहे. आधीच ऑक्टोबर हिटचा त्यात दोन ते चार तास बत्ती गूल होत असल्याने नागरिकांत ‘महावितरण’विरोधात तीव्र संताप आहे.
उमेदवारही प्रचारात गुंग असल्याने विजेच्या खेळखंडोब्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे महावितरणकडून ‘कारणे दाखवा’ची पाटी दाखवून शहरवासीयांना छळ करण्याचा उद्योग सुरू असल्याचा आरोप होत आहे. सध्या विधानसभा निवडणुकीत मतांचा जोगवा मागण्यासाठी जाणा-या उमेदवारांना खंडित वीज पुरवठय़ामुळे मतदारांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे.
या संदर्भात महावितरणशी संपर्क साधता, बोळिंजमधील वीज ख्रिश्चन आळीतील मेन लाइनचा कंडक्टर तुटल्याने गेल्याचे सांगण्यात आले. वादळ-वारा आणि पावसामुळे झाडांच्या फांद्या एकमेकांवर घासत असल्याने शॉर्टसर्किट होते. परिणामी आम्हाला परिसरातील वीज खंडित करावी लागली. रविवारी उद्भवलेली समस्या मात्र पॉवर लाइनमध्ये झालेल्या बिघाडामुळे होती, असे सांगण्यात आले. नािरगी ते नालासोपारा भागातून ही लाइन जाते. जेणेकरून या भागातील वीज सकाळी ४ ते ११ या कालावधीत खंडित झाली होती.
बोळिंजमधील समस्या विरार पश्चिम येथील फिडरमध्ये झालेल्या बिघाडामुळे उद्भवल्याचे उत्तर देण्यात आले. त्यामुळे इकडच्या काही भागांतील वीज बंद होती. शिवाय अद्याप पाऊस संपलेला नाही. झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी लागत असल्यानेही काही वेळा वीज खंडित करावी लागते. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांत ही कामे करण्यात येतात. मात्र पुढे पावसात या झाडांच्या फांद्या पुन्हा वाढत असल्याने ही काळजी घ्यावी लागत असल्याचे नेहमीचेच उत्तर विरार पश्चिम येथील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांकडून देण्यात आले.
तूट भरून काढण्यासाठी आणखीन भारनियमन
तर १७,५०० मेगावॉट विजेचा तुटवडा आहे. ही तूट भरून काढण्यासाठी आम्हाला कदाचित भारनियमन करावे लागेल, अशी माहिती पालघर सर्कलचे अधीक्षक अभियंता सोनावणे यांनी दिली असल्याने वीजभारनियमन अटळ असल्याची खात्री वसई-विरारकरांना झाली आहे. त्यामुळे या वर्षी वीज समस्येचे निराकरण करेल, त्यालाच मतदान करण्याचा निर्णय वसई-विरारकरांनी घेतला असल्याची माहिती काही कार्यकर्त्यांनी दिली.
तेच प्रश्न, तीच उत्तरे!
विजेचा प्रश्न वसई-विरारच्या पाचवीला पूजलेला. या संबंधी कधीही महावितरणशी संवाद साधला की, तीच उत्तरे मिळतात. उदा. विजेचा तुडवडा, मीटरमधील बिघाड, झाडांच्या फांद्या छाटणे वगैरे. मात्र समस्येचे निरसन करताना महावितरणचे अधिकारी दिसत नाहीत. लोकप्रतिनिधीही केवळ वीज गेली की, मोच्रे आणि निवेदने काढण्याशिवाय काहीएक करत नाहीत. हा भार महावितरण अधिका-यांवर टाकल्यावर लोकप्रतिनिधींचेही काम भागते. त्यानंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या! परिणामी लोकांनाच रस्त्यावर उतरावे लागत आहे.