‘वसई-विरार शहराला जागतिक पर्यटनदृष्टया जगाच्या नकाशावर आणण्यासाठी उमराळे येथील ३५ एकर जागेवर आरक्षण टाकण्यात आले अशी माहिती वसई-विरार बहुजन विकास आघाडीचे युवा आमदार क्षितिज ठाकूर यांनी दिली.
मुंबई – ‘वसई-विरार शहराला जागतिक पर्यटनदृष्टया जगाच्या नकाशावर आणण्यासाठी उमराळे येथील ३५ एकर जागेवर आरक्षण टाकण्यात आले असून, यात बौद्ध स्तूप, गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास आणि माहिती सांगणा-या ग्रंथालयांसोबतच जुनी मंदिरे आणि स्पोर्टिग थिएटर असे उपक्रम राबवण्यात येतील,’ अशी माहिती वसई-विरार बहुजन विकास आघाडीचे युवा आमदार क्षितिज ठाकूर यांनी दिली.
वसई-विरार शहरातील युवा कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून, त्यांच्या सूचना आणि कल्पना क्षितिज ठाकूर यांनी जाणून घेतल्या. विरार-मनवेलपाडा येथील गुरुदत्त ग्रामस्थ मंडळाच्या वतीने या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला बांधकाम व्यावसायिक विनोद पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
‘वसई-विरारमधील मिठागरांची भाडेतत्त्वाची मुदत संपत आली आहे. त्यामुळे ही जागा महापालिकेच्या ताब्यात मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या १५०० एकर जागेवर वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स फायनान्शिल हबच्या धर्तीवर वसई-विरारमध्ये एज्युकेशन हब उभारण्यात येईल.
आज वसई-विरारला चांगले एज्युकेशन हब बनवायचे असेल, तर इथे चांगल्या शाळा-कॉलेजेस यायला हवीत,’ अशी इच्छाही ठाकूर यांनी व्यक्त केली. येथील तरुणांच्या कल्पनांना वाव मिळावा, यासाठी येथील सरकारी जागा, महापालिकेची आरक्षणे असलेल्या जागा ताब्यात घेऊन, ‘या जागांवर याझू पार्कसारखी वर्ल्डक्लास अम्युझमेंट पार्क, थिम पार्क, सायन्स एक्सिपिरिमेंट पार्क, बॉटनिक गार्डन, एण्टरटेन्मेंट पार्कसारख्या कल्पना राबवण्यात येतील. त्याअनुषंगाने आगामी काळात शाळा-कॉलेजेस आणि खुल्या गटात स्पर्धा आयोजित करून यातील काही कल्पना निवडल्या जातील. यातील विजेत्यांना त्यांच्या कल्पना सत्यात उतरवण्याची संधीही देण्यात येईल. त्यामुळे केवळ रस्ते आणि गटारे यांच्यापलीकडे विचार करून वसई-विरार महापालिका भारतातील एक नंबरची महापालिका कशी बनेल, यासाठी प्रयत्न करायला हवेत, असेही क्षितिज ठाकूर यांनी सांगितले.
वसई-विरार बनणार स्मार्ट सिटी!
वसई-विरार स्मार्ट सिटी बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. ज्यात ही शहरे वायफायने (४ जी स्पीड) जोडण्यात येतील. यासाठी सध्या पाच कंपन्यांसोबत बोलणी सुरू आहेत. ही संकल्पना राबवणारी वसई-विरार महापालिका पहिली महापालिका ठरणार आहे.