नवीन संशोधनानुसार वाहतुकीच्या कोंडीची समस्या फोडण्यासाठी नवीन गणिती पद्धत शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे.
जगभरातील महानगरांमध्ये वाहतुकीची समस्या जटिल बनली आहे. गाडयांची वाढती संख्या लक्षात घेऊन वाहतुकीची समस्या कशी सोडवायची, असा प्रश्न देशोदेशीच्या सरकारांना भेडसावत आहे.
वाहतूक कोंडीमुळे इंधन व वेळ या दोन्ही गोष्टी मोठया प्रमाणात फुकट जातात. या समस्येवर मार्ग काढण्याचे विविध पर्याय जगभरात काढले जात आहेत. यामध्ये जबर दंड आकारण्याबरोबरच विषम-सम संख्येनुसार असलेल्या गाडयांच्या क्रमांकांच्या आधारे वाहनसंख्येवर निर्बंध लादले जातात. आता नवीन संशोधनानुसार वाहतुकीच्या कोंडीची समस्या फोडण्यासाठी नवीन गणिती पद्धत शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे.
वाहतुकीची कोंडी कोणत्या भागात होईल, ती कशी फुटू शकेल याची गणिती पद्धत ब्रिस्टॉल विद्यापीठाच्या डॉ. रॉबर्ट झालाई यांनी शोधून काढली आहे. या संशोधनात वाहनचालकरहित कार आणि मानव आणि यंत्रमानव यांच्या समन्वयाने चालवता येणा-या गाडयांची रचना आदी बाबींचा विचार करण्याची शिफारस केली आहे. या उपाययोजनांचा वापर केल्यास वाहतूक कोंडीची समस्या व अपघाताची समस्या कमी होऊ शकते, असे अभ्यासात आढळले. भविष्यात कार निर्मिती करताना गणिती पद्धतीचा वापर केला जाईल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला. यामुळे मानवी चालक आणि रोबो चालक असलेल्या वाहनांमध्ये याचा वापर होऊ शकतो.