उल्हासनगर महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेता अंजली साळवे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात महिलांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
उल्हासनगर – दूरदर्शन वाहिन्यांच्या माध्यमातून महिलांची सामाजिक पत उंचावण्याठी प्रयक्त करणे गरजेचे आहे, मात्र मालिकांमधून महिला ही शोभेची वस्तू असल्याप्रमाणे विकृत चित्रीकरण केले जात असून त्यामुळे सध्याच्या काळात दूरदर्शनवरील मालिकांमुळे महिलांची छबी खालावत असल्याची खंत पालिका उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी व्यक्त केली. उल्हासनगर महापालिकेतील काँग्रेसच्या गटनेता अंजली साळवे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात महिलांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने कुर्ला कॅम्प येथील कालिमाता मंदिर मैदानात दोन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी सायंकाळी झालेल्या चर्चासत्रात उल्हासनगर महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी महिलांना स्वयंरोजगार विषयावर मार्गदर्शन केले. महिलांना सक्षम होण्यासाठी आर्थिक स्वालंबन आवश्यक असून त्यामुळे स्वयंरोजगार कसा महत्त्वाचा आहे, हे लेंगरेकर यांनी पटवून दिले. महिला सक्षमीकरणात सावित्रीबाई फुले यांचे योगदान या विषयावर गणेश अष्टीवकर यांनी मार्गदर्शन केले. महिलांना विविध मुद्दय़ावर पत्रकार किरण सोनावणे यांनी मार्गदर्शन केले. यानंतर नृत्यस्पर्धा व वेशभूषा स्पर्धा पार पडली. सिने अभिनेत्री नियती राजवाडे यांनी यावेळी उपस्थित राहून महिलांना प्रोत्साहन दिले. शुक्रवारी सकाळी प्रहरात १० ते १ या वेळेत पाककला स्पर्धा व उत्कृष्ट गोड पदार्थ स्पर्धेचे आयोजन केले होते. यात एकूण ४० स्पर्धकांनी भाग घेतला. यावेळी शेफ ब्रिजलाल आणि अर्चना सिंग यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
बचतगटांच्या स्टॉल्सवर गर्दी
दरवर्षी आयोजित करण्यात येणा-या या कार्यक्रमात महिला बचतगटांसाठी २० स्टॉल्स लावण्यात येतात. यात शोभेच्या वस्तू, पर्सेस, कपडे, खाद्य पदार्थाची विक्री केली जाते. दोन दिवसांत महिलांनी कार्यक्रमाला तोबा गर्दी केल्याने बचतगटांच्या स्टॉल्सलाही चांगला प्रतिसाद लाभला. कोंबडी वडय़ाच्या स्टॉलवर खवय्यांची विशेष झुंबड उडाली होती.