भारत आणि श्रीलंका यांच्यातील चौथी वनडे गुरुवारी (१३ नोव्हेंबर) ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर खेळली जाणार आहे. प
कोलकाता- भारत आणि श्रीलंका यांच्यातील चौथी वनडे गुरुवारी (१३ नोव्हेंबर) ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर खेळली जाणार आहे. पहिल्या तीन लढती जिंकून यजमानांनी ३-० अशी विजयी आघाडी घेतल्याने उर्वरित लढतींना फारसे महत्त्व नाही. मात्र धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माच्या पुनरागमनाची उत्सुकता लागून राहिली आहे.
मालिका जिंकल्याने भारताने उर्वरित लढतींसाठी सलामीवीर शिखर धवन आणि अष्टपैलू रवींद्र जडेजाला विश्रांती देताना ‘मुंबईकर’ रोहित शर्मा तसेच रॉबिन उथप्पाला संधी देण्यात आली आहे. बोटाच्या दुखापतीमुळे दोन महिन्यांनंतर रोहित संघात परतला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सराव लढतीत बहारदार १४२ धावांची खेळी करत त्याने तंदुरुस्ती सिद्ध केली. ईडन गार्डन्सवर त्याच्याकडून तशीच खेळी अपेक्षित आहे. रोहितसह राखीव यष्टिरक्षक रॉबिन उथप्पा, करन शर्मा आणि केदार जाधवकडेही सर्वाचे डोळे लागलेत.
बहरलेल्या फलंदाजीवरच भारताने विजयाची हॅटट्रिक साधलीय. रोहित आणि रॉबिनमुळे फलंदाजी अधिक मजबूत झालीय. हंगामी कर्णधार विराट कोहलीसह अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू आणि सुरेश रैनानेही फलंदाजीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मात्र फलंदाजांनी गाजवलेल्या मालिकेत मध्यमगती उमेश यादव (८ विकेट) आणि डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलने (७ विकेट) छाप पाडली. लेगस्पिनर करन शर्मा आणि अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीमुळे भारताकडे गोलंदाजीत आणखी पर्याय आहेत.
तयारीसाठी फारच कमी वेळ मिळाला तरी श्रीलंकेने निराशा केली. अनुभवी माहेला जयवर्धने आणि कुमार संगकारासह तिलकरत्ने दिलशान असे चांगले फलंदाज असूनही त्यांना केवळ एकाच लढतीत अडीचशेहून अधिक धावा करता आल्यात. मालिका हातची गेली तरी शेवट ‘गोड’ होण्याहेतूने पाहुण्यांनी दिनेश चंडिमल आणि लहिरु थिरिमने या फलंदाजांसह जादुई फिरकीपटू अजंठा मेंडिसला तातडीने बोलावले आहे. लंकेची गोलंदाजी फार प्रभावी ठरत नाही. त्यामुळे किमान फलंदाजी उंचावल्यास पाहुणे यजमानांना चुरस देऊ शकतील.
वेळ : दु. १.३० वा. थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.
भारत : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, सुरेश रैना, अंबाती रायडू, रॉबिन उथप्पा, आर. अश्विन, धवल कुलकर्णी, उमेश यादव, स्टुअर्ट बिन्नी, अक्षर पटेल, आर. विनय कुमार, करन शर्मा, केदार जाधव.
श्रीलंका : अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), माहेला जयवर्धने, कुशल परेरा, तिलकरत्ने दिलशान, लहिरु थिरिमने, दिनेश चंडिमल, अशन प्रियंजन, निरोशान डिकवेला, थिसरा परेरा, नुवान कुलसेकरा, लहिरु गामजे, चतुरंग डिसिल्वा, सीकुजे प्रसन्ना, अजंठा मेंडिस, शमिंडा एरंगा.
वर्ल्डकपमध्ये रोहितची कामगिरी निर्णायक ठरू शकते
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणा-या २०१५ वनडे वर्ल्डकपमध्ये धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माची कामगिरी निर्णायक ठरू शकते, असे भारताचा हंगामी कर्णधार विराट कोहलीला वाटते.
‘‘रोहितसारख्या फलंदाजांने सातत्य राखले तर भारतासाठी फायद्याचे ठरेल. त्याची झटपट फलंदाजी विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे रोहितचे संघातील स्थान मोठे आहे. पुनरागमनानंतर त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत,’’ असे कोहलीने म्हटले. बोटाच्या दुखापतीमुळे रोहितला ऑगस्टमध्ये झालेला इंग्लंड दौरा सोडून मायदेशी परतावे लागले. मात्र श्रीलंकेविरुद्धच्या सराव लढतीत भारत ‘अ’तर्फे खेळताना झटपट शतक ठोकत त्याने फॉर्म आणि फिटनेस सिद्ध केला. त्यानंतर लंकेविरुद्धच्या उर्वरित दोन लढतींसाठी रोहितचा संघात समावेश करण्यात आला आहे.