नालासोपा-याहून लहान मुलांसहित १२ कुटुंबांतील ४८ माणसं आणि जेवण बनवणारे दोन आचारी यांना घेऊन आमचा ग्रुप सहा नोव्हेंबर २०१३ रोजी ठीक संध्याकाळी पाच वाजता सहलीला निघाला. सोबत पाच दिवसांचा शिधा आचा-यानी बांधून घेतला होताच. सहलीचं प्लॅनिंग होतं, शेगावबरोबर आनंद सागर (जि. बुलडाणा), चिखलदरा हिल स्टेशन (पूर्व मेळघाट) व अमरावती जिल्ह्यातील पिंपळगाव (नांदगाव, खांडेश्वर) ही ठिकाणं पाहणं.
नालासोपा-याहून लहान मुलांसहित १२ कुटुंबांतील ४८ माणसं आणि जेवण बनवणारे दोन आचारी यांना घेऊन आमचा ग्रुप सहा नोव्हेंबर २०१३ रोजी ठीक संध्याकाळी पाच वाजता सहलीला निघाला. सोबत पाच दिवसांचा शिधा आचा-यानी बांधून घेतला होताच. सहलीचं प्लॅनिंग होतं, शेगावबरोबर आनंद सागर (जि. बुलडाणा), चिखलदरा हिल स्टेशन (पूर्व मेळघाट) व अमरावती जिल्ह्यातील पिंपळगाव (नांदगाव, खांडेश्वर) ही ठिकाणं पाहणं.
ठरल्याप्रमाणे नाशिक हाय-वेला ढाब्यावरचा चहा पिऊन, रात्री अकराच्या सुमारास धुळे हाय-वेला गाडी पार्क करून सोबत आणलेला व्हेज पुलाव फस्त केला. नाशिक-धुळे-नांदुरामार्गे जात असताना सकाळी सहा वाजता १०५ फुटी हनुमानाचं दर्शन घेऊन पुन्हा प्रवासाला सुरुवात केली. श्रीक्षेत्र शेगावला सकाळी आठला पोहोचलो. तिथे ‘माहेश्वरी समाज ट्रस्ट’च्या भव्य हॉलवर दोन दिवसांच्या मुक्कामासाठी विसावलो. सोबत आचारी आणि शिधा असल्याकारणाने आपला जेवणाचा खूपच खर्च वाचतो, हे यापूर्वीच्या सहलींच्या अनुभवांवरून कळलंच होतं.
आज सहलीचा दुसरा दिवस अर्थातच सात नोव्हेंबर. दुपारचं जेवण आटोपून जवळच असलेल्या ‘आनंद-सागर’ ठिकाणाला भेट दिली. ‘आनंद-सागर’चं काय वर्णन करावं! दरडोई ४० रुपयेप्रमाणे इथे आपल्याला एन्ट्री फी भरावी लागते. आत गेल्यानंतर महाराष्ट्रातील थोर संतांचे पुतळे, प्राणी-पक्षी यांच्या मोठमोठय़ा प्रतिकृती, अळंबीच्या छत्र्या, लहान-मोठे तलाव, तीन किमीमध्ये धावणारी ‘मिनी ट्रेन’, मत्स्यालय, उंच टेकडय़ा, चारी बाजूला तलाव, त्यातले नयनरम्य देखावे, झुलता पूल आणि आवर्जून उल्लेख करावा असं, ‘स्वामी विवेकानंदांचं ध्यानधारणा केंद्र’, मेघडंबरी पाहताना मन प्रसन्न होतं.
तिस-या दिवशी आठ नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजता शेगावी ‘गजानन महाराजां’च्या मंदिराला भेट दिली. स्वामींचं दर्शन व दुपारचा महाप्रसाद घेऊन पुढील प्रवासासाठी चिखलद-याला मार्गस्थ झालो. चिखलदरा हे महाराष्ट्रातलं एक थंड हवेचं ठिकाण, तिथं पोहोचलो. हे येतं पूर्व मेळघाटात. इथपर्यंत येताना सातपुडा पर्वतरांगा आणि घाटरस्त्याचा प्रवास एकदम भन्नाट. शेगाव ते चिखलदरा हा १२० किमीचा रस्ता व घाटमाथा चढण्यासाठी पाच तास प्रवास करून संध्याकाळी ठीक सात वाजता ‘एमटीडीसी’च्या हॉलवर रात्रीच्या विश्रांतीसाठी थांबलो. सोबत आम्ही भजनाचं साहित्य आणलं होतंच. म्हणून रात्री दीड तास भजनाचा कार्यक्रम सादर केला. एमटीडीसी हॉलवर जमलेल्या इतर पर्यटकांनीसुद्धा टाळय़ा वाजवून आमचं कौतुक केलं. सकाळच्या थंडीतून साडेसात वाजता गावित गडकिल्ला, देवी पॉइंट, पंच बोल पॉइंट, चिखलदरा असे मोजके चार पॉइंट पाहायला निघालो. इ.स. बाराव्या शतकात गावित राजाने बांधलेला हा गावित गड पाहणं हासुद्धा एक भन्नाट अनुभव आहे. वन विभागातील ३५०० हजार फुटांच्या उंचीवर असूनसुद्धा तिथे दोन तलाव आहेत आणि ते पाण्याने भरलेले आहेत, हे आश्चर्यच! त्यापैकी एक राणी तलावसुद्धा आहे.
देवी पॉइंटवर डोंगरामध्ये देवीचं निवासस्थान आहे. पंचबोल पॉइंट, इथली गंमत खूपच वेगळी आहे. निरव शांतता असताना वा-याच्या प्रवाहाबरोबर खोल दरीत आणि समोरच्या पर्वतरांगांवर नजर ठेवून आपण मोठय़ाने ‘आरोळी’ दिल्यास त्याचे पाच वेळा ध्वनी ऐकू येतात. म्हणूनच या स्थानाला ‘पंचबोल पॉइंट’ असं संबोधलं जातं.
किचकदरा ही इथली दरी, पौराणिक काळात पांडव अज्ञातवासात असताना उंच उभ्या टेकडीवर भीम आणि किचक यांच्यात युद्ध झालं. या वेळी भीमाने किचकाचा वध करून त्याला खोल दरीत फेकून दिलं. म्हणून या दरीला ‘किचकदरा’ असं नाव पडलं, असं म्हटलं जातं. कालांतराने किचकद-याचा अपभ्रंश होऊन ‘चिखलदरा’, असं नामांतर झालं. इथलं ‘भीम कुंड’ पाहण्यासारखं आहे. चिखलद-याला किमान १० ते १२ ठिकाणं फिरण्यासारखी (पाहण्यासारखी) आहेत; पण आपल्याकडे छोटं वाहन असेल तरच सर्व पॉइंटपर्यंत जाऊन ती ठिकाणं पाहता येऊ शकतात. आमच्या सोबतची गाडी (वाहन) आकाराने मोठी असल्यामुळे प्रवास आटोपता घ्यावा लागला.
दुपारचं जेवण आटोपून पुन्हा चिखलद-याचा घाट उतरू लागलो. संध्याकाळी पिंपळगाव, ता. नांदगाव-खांडेश्वर (जि. अमरावती) येथे आमच्या ग्रुपमधील मित्र गणेश लाहे यांच्या गावी, त्यांच्या आजीच्या आग्रहास्तव पोहोचलो. त्यांच्या हातचं ‘व-हाडी पद्धतीचं जेवण’ जेवून चार तासात चार दिवसांचा पाहुणचार आम्ही अनुभवला. तिथेसुद्धा आमचा भजनाचा कार्यक्रम रंगला. सर्व गावक-यांनी भजनाला मनापासून दाद दिली. रात्री ठीक बारा वाजता परतीचा प्रवास सुरू झाला. सकाळी नऊ वाजल्यानंतर पुन्हा धुळ्याच्या पलीकडे गाडी रस्त्यालगत पार्क करून आमच्यासोबतचे आचारी अजयभाऊंच्या हातचं जेवण जेवून संध्याकाळी ठीक सात वाजता नालासोपा-याला पोहोचलो. लहान-थोरांनी पाच दिवसांत खूप आनंद आणि प्रवासाचा थरार अनुभवला आणि सर्वानी भावपूर्ण होऊन एकमेकांचा निरोप घेतला तो पुढच्या वर्षी अशीच यशस्वी सहल घडवून आणण्याचा इरादा पक्का करूनच.