मुंबई, ठाणे, कोकणासह विदर्भात पावसाने शनिवारी थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
मुंबई/वर्धा/रत्नागिरी/सिंधुदुर्ग- मुंबई, ठाणे, कोकणासह विदर्भात पावसाने शनिवारी थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले. पावसाचा सर्वात मोठा फटका विदर्भातील लांबपल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीला बसला असून, ही वाहतूक खंडित झाली आहे.
नागपूर-वर्धा मार्गावरील सिंदी आणि तुळजापूर रेल्वे रुळांखालील भराव वाहून गेल्याने नागपूर मार्गावरील अनेक गाडया रद्द करण्यात आल्या आणि काही गाडय़ांचे मार्ग बदलल्याने हजारो प्रवाशांना त्याचा फटका बसला आहे. दरम्यान, राज्यात येत्या ४८ तासांत जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला.
नागपूर-वर्धा मार्गावर सिंदी आणि तुळजापूर रेल्वे स्थानकांदरम्यान माती वाहून गेल्याने ३० मीटर अंतराचे रूळ अधांतरी होते. त्यामुळे नागपूरहून सुटणा-या ११ गाडया रद्द, तर आठ गाडयांचा प्रवास थांबला. रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, ते पूर्ण होण्यास तीन दिवस लागण्याची शक्यता नागपूर येथील मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी वर्तवली
आहे.
विदर्भात पावसाने थैमान घातले असून, नागपूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव भरून वाहू लागला आहे. खबरदारी म्हणून अमरावती, भंडारा, वर्धा जिल्ह्यातील ३२ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वैनगंगा नदीला आलेल्या पुराने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. यामुळे धान, ऊस, सोयाबीन आदी पिके नष्ट झाली आहेत. शेतातील विहिरी, मोटारपंप पाण्याखाली गेल्याने शेतक-यांचे नुकसान झाले आहे.
भिवंडीत दोन वर्षाची मुलगी नाल्यात वाहून गेली
किडवाई-नगर नागाव येथील नाल्यात पडल्याने जुबेदाखातून रफिक अन्सारी (२) ही मुलगी शनिवारी सकाळी वाहून गेली. जुबेदा खाऊ आणण्यासाठी दुकानात गेली होती. घरी परतत असताना चेंबरमध्ये पाय अडकून ती नाल्यात पडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण केले. दरम्यान, संतप्त जमावाने अग्निमशन दलाच्या दोन गाडयांवर दगडफेक करून मोडतोड केली. या दगडफेकीत चालक पंढरीनाथ गाडे व जवान राजेंद्र भोईर गंभीर जखमी झाले. बालिकेचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाचे २० जवान, ठाणे अग्निशमन दल आणि आपत्कालीन विभागाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत.
राजापुरात पूरसदृश स्थिती
संततधार पावसामुळे पुन्हा एकदा राजापुरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. अर्जुना आणि कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून पुराचे पाणी शहरात शिरले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
रद्द झालेल्या गाडया
मुंबई-नागपूर दूरंतो एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई दुरंतो एक्सप्रेस, नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस, नागपूर-पुणे एक्सप्रेस, मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस, मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्सप्रेस आणि पुणे-नागपूर गरीबरथ एक्सप्रेस या गाडया रद्द करण्यात आल्या आहेत.
मार्ग बदललेल्या गाडया
मुंबई-हावडा गीतांजली एक्सप्रेस, अहमदाबाद-हावडा एक्सप्रेस, मुंबई-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस, गांधीधाम-पूरी एक्सप्रेस आणि नागपूर-अहमदाबाद पुरी एक्सप्रेसचा मार्ग बदलला आहे. नागपूरकडे जाणा-या अन्य दहा गाडयांच्या मार्गातही बदल केला.
रेल्वेचे हेल्पलाइन क्रमांक
>नागपूर ०७१२-२५६४३४३
>बल्लारशाह ०७१२-२४३८६९
>वर्धा ०७१२-२४०२६०
>सेवाग्राम ०७१२-२५४७९८
>बैतुल ०७१४१-२३०७८३
>इटारसी ०७५७२-२४०४४४
>गोंदिया ०९५९५३२८७३७