प्रजासत्ताक दिनानिमित्त विरोधी पक्षांनी संविधान बचाव रॅलीचे आयोजन करत सत्ताधारी भाजपला इशारा देण्याचा प्रयत्न केला. तर, सत्ताधारी असलेल्या भाजपनेही तिरंगा यात्रेचे आयोजन करत भारतीय राज्य घटनेचा पूर्ण सन्मान करत असल्याचे अधोरेखित करण्याचा प्रयत्न करत विरोधकांना उत्तर दिले.
मुंबई- देशाच्या ६९व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विरोधी पक्षांनी संविधान बचाव रॅलीचे आयोजन करत सत्ताधारी भाजपला इशारा देण्याचा प्रयत्न केला. तर, सत्ताधारी असलेल्या भाजपनेही तिरंगा यात्रेचे आयोजन करत भारतीय राज्य घटनेचा पूर्ण सन्मान करत असल्याचे अधोरेखित करण्याचा प्रयत्न करत विरोधकांना उत्तर दिले. दरम्यान परवानगी न घेतल्याच्या कारणावरून मुंबई पोलीस संविधान बचाव रॅलीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे समजते.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंत्रालयासमोरील पुतळ्याला अभिवादन करून विरोधकांनी संविधान बचाव रॅलीला सुरू केली. ओव्हल मैदानासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ते गेट वे ऑफ इंडियासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या रॅलीचे संयोजन केले होते.
या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, ओमर अब्दुला, सीताराम येचुरी, सुप्रिया सुळे, जेडीयू नेते शरद यादव, खासदार राजीव सातव, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी, तुषार गांधी सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये कोणत्याही नेत्याने भाषण केले नाही.