विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी हे अधिवेशन अनिश्चितकाळासाठी स्थगित केल्याचे संसदीय कामकाज मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी सांगितले.
नवी दिल्ली- लोकसभेत बहुमत असूनही अनेक विधेयकांवर राज्यसभेत विरोधकांनी मोदी सरकारचे मनसुबे हाणून पाडल्याने अखेर सरकारला अनिश्चितकाळासाठी संसदेचे हिवाळी अधिवेशन स्थगित करावे लागले. मात्र विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी हे अधिवेशन अनिश्चितकाळासाठी स्थगित केल्याचे संसदीय कामकाज मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी सांगितले.
या हिवाळी अधिवेशन काळात विरोधी पक्षाने देशहीत न पहाता, अदूरदर्शीपणा दाखवत राज्य सभेत प्रत्येक वेळी विरोध केल्याने सरकारला महत्त्वाची विधेयके मंजूर करता आली नाहीत, असा आरोप नायडू यांनी केला.
राज्यसभेत काँग्रेससह तृणमूल काँग्रेस, जनता दल युनायटेड आणि समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी विविध विधेयकांवरून मोदी सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध केला. राज्यसभेच्या कामकाजाचा आढावा घेतला तर २४ नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या या हिवाळी अधिवेशनात कामकाजाच्या २२ दिवसातील १६ दिवस विरोधकांनी गोंधळ घालून कामकाजात व्यत्यय आणल्याने कोणतेही कामकाज झाले नाही. तर लोकसभेतही पाच दिवस कोणतेही कामकाज होऊ शकले नाही.
लोकसभेत मागच्या अधिवेशन काळात १२ तर यावेळी १८ विधेयके मंजूर करण्यात आली. तर राज्य सभेत फक्त १२ विधेयकांनाच मंजूरी देण्यात आली. लोकसभेने मंजूर केलेली सहा विधेयके मात्र राज्यसभेत मंजूर झाली नाहीत, असे ते म्हणाले.
आमचे लोक सभेत बहुमत आहे. मात्र राज्य सभेत विरोधकांची संख्या जास्त आहे. यामुळे आम्ही ठोस निर्णय घेण्याचे ठरवले तरी त्याचे राजकारण करुन राज्य सभेत जाणीवपूर्वक विरोध केला जातो, असा आरोप नायडू यांनी केला आहे.