महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून घरात लावलेला वीज मीटर धिम्या गतीने सुरू असल्याने ३ लाख ८० हजार रुपये दंड भरावा लागेल असे वीज ग्राहकाला धमकावले.
भिवंडी – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून घरात लावलेला वीज मीटर धिम्या गतीने सुरू असल्याने ३ लाख ८० हजार रुपये दंड भरावा लागेल असे वीज ग्राहकाला धमकावले. अंबाडी येथील विद्युत कार्यालयाच्या कनिष्ठ अभियंत्याने ७० हजारांवर तडजोड केली.
त्यापैकी उरलेल्या १७ हजार रुपयांची लाच घेताना कनिष्ठ अभियंत्यासह दोघा खासगी इसमांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी सायंकाळी सापळा लावून अटक केली आहे.
कनिष्ठ अभियंता नितीन कांबळे (३५ ), योगेश भोईर (३५) व राहुल राजाराम भोईर (२४) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील कनिष्ठ अभियंता नितीन कांबळे यांनी दोन महिन्यांपूर्वी अंबाडी नाका येथील वीज ग्राहक संध्या शांताराम गोडसे यांच्या बंगल्यावर जाऊन मीटरची तपासणी केली व तुमचा वीज मीटर धिम्या गतीने चालत असल्याने तुम्हाला ३ लाख ८० हजार रुपये दंड भरावा लागेल. असे सांगितले.
त्यानंतर कांबळे यांनी ७० हजार रुपयांवर तडजोड करून महिन्याभरापूर्वी ५३ हजार रुपये लाच म्हणून स्वीकारले होते. उरलेले १७ हजार रुपये लवकर द्या. नाहीतर दंडाची नोटीस लावेन अशी अडवणूक करून पैशांसाठी त्याने संध्या यांचे पती शांताराम गोडसे यांच्याकडे तगादा लावला होता. त्यामुळे अखेर गोडसे यांनी ठाणे येथील लाचलुचपत विभागाशी संपर्क करून तक्रार दाखल केली होती.
कनिष्ठ अभियंता नितीन कांबळे यांनी अंबाडी नाका येथील बॅटरी दुकान मालक योगेश भोईर (रा.वारेट) यांना गोडसे यांच्या घरी जाऊन पैसे घेण्यास सांगितल्याने योगेशने कामगार राहुल भोईर (रा. पहारे) यास संध्या गोडसे यांच्या घरी पाठवून पैसे आणण्यास सांगितले.
त्यावेळी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक दिलीप विचारे यांनी पथकासह सापळा लावून राहुल यास रंगेहात पकडले. त्यानंतर योगेश व कनिष्ठ अभियंता नितीन कांबळे यांना ताब्यात घेऊन अटक केली. या लाच प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.