सगळ्या प्रकारचा सुकामेवा पोषक असतो. परंतु त्यातील विविध प्रकारांच्या आगळ्या-वेगळ्या चवींनुसार, सुकामेव्यातही आवडता आणि तुलनेनं नावडता असे भाग खवय्यांकडूनच पाडले जातात. सुकामेव्यातील शिल्लक राहिलेल्या जर्दाळू, पिस्ते आणि चारोळी या प्रकारांविषयी आजच्या लेखात जाणून घेऊया.
ही सुकी फळं काश्मीर, सिमला अशा थंड हवामानाच्या प्रदेशात मिळतात. अशा थंड प्रदेशात या फळझाडांना पोषक हवामान मिळतं. ओल्या जर्दाळूंवर कारखान्यांमध्ये प्रचंड विद्युत दाबाखाली ती सुकवली जातात. परंतु, या प्रक्रियेनंतरही या फळातील गुणधर्मात फरक पडत नाही. सुके जर्दाळू हे तसं महाग फळ आहे. सहा वर्ष वयाच्या मुलापासून ते सत्तरीच्या पुढील वयोगटापर्यंत या सुक्या जर्दाळूंची दिवसातून दोन सुकी फळं बारीक चावून (सुकल्यावर थोडे कडक व चिवट होत असल्याने) किंवा कोमट पाण्यात भिजत घालून ते मऊसर झाल्यावर खाणं उत्तम.
चवीला गोड आणि किंचित आंबट असणारं हे फळ जीवनसत्त्वांनी परिपूर्ण आहे. यात मुबलक प्रमाणात असणारं तांबं (कॉपर – सीयू), हे मेंदूच्या विकासासाठी आणि बौद्धिक वाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. शिवाय तंतुयुक्त पदार्थही यात असल्याने मलावरोधाची तक्रार असलेल्यांनी हे जरूर खावेत. विविध प्रकारच्या भारतीय तसंच आंतरराष्ट्रीय पाककृती, कोशिंबिरी वा डेझर्ट्समध्ये जर्दाळूचा प्रामुख्यानं वापर केला जातो. हाडांना बळकटी देणारे आणि स्मरणशक्तिवर्धक गुणधर्मही यात आहेत.
पिस्ते
टणक कवचाच्या आत दडलेल्या हिरवटसर रंगाच्या लांबटसर बीच्या आकाराचे असलेले पिस्ते, हे बहुतेक सूकामेवा प्रिय असलेल्यांना काजूइतकेच आवडतात, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. हे शेंगदाण्यांप्रमाणे भाजताना कढईत मीठ टाकून भाजल्यावर खा-या शेंगदाण्यांसारखेच चविष्ट लागतात. यामध्ये उच्च प्रमाणात सर्व जीवनसत्त्वांशिवाय कॅल्शिअम, लोहतत्त्व, उत्तम दर्जाची प्रथिनं आणि तंतुयुक्त पदार्थ यांचा एकत्रित समावेश असलेलं असं हे फळ.
काही आधुनिक वैद्यकशास्त्रातील डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की, हृदयाला बल देणारे तत्त्व पिस्त्यांमध्ये असते. पिस्ते भिजत घालून, ते बारीक वाटून त्याची खीर, हलवा, बर्फी असे मिष्टान्नाचे अनेक प्रकार बनवले जातात. नाही तर कोजागिरी पौर्णिमेला किंवा वर्षभर केव्हाही मसाले दुधात घातल्या जाणा-या इतर सुकामेव्यासह पिस्त्यांच्या स्वाद हा हमखास चाखायला मिळतो.
छोटय़ा चपटसर आकाराचं तुरीच्या डाळीच्या आकारासारखं आणि तांबूससर रंगाचं दिसणारं हे एक फळ. ही फळंदेखील जर्दाळूप्रमाणेच उच्च विद्युत दाबाखाली सुकवली जातात आणि मग बाजारात आपल्याला दाणेदार चारोळ्या उपलब्ध होतात. या चवीला रुचकर आणि खुसखुशीत लागतात. मात्र त्या इतर सुकामेव्याप्रमाणे नुसत्या खाल्ल्या जात नाहीत. या विपुल प्रमाणात स्निग्धांश असतो. परंतु यात हृदय संरक्षक तत्त्वही असतं. शिवाय कॅल्शियमही भरपूर प्रमाणात असतं आणि त्या बुद्धिवर्धकही आहेत.
श्रीखंड, बासुंदी, वेगवेगळ्या प्रकारच्या खिरी, पीयूष अशा काही ठरावीक गोडाच्या पदार्थामध्ये चारोळीचा आवर्जून आणि सढळ हस्ते वापर होत असे. पण आता बाहेरून विकत आणलेल्या श्रीखंड आणि बासुंदीतून चारोळ्या हा सुकामेव्याचा प्रकार जवळपास हद्दपारच झालेला दिसतो. पण थोडे कष्ट घेऊन हेच पदार्थ घरी बनवल्यास या चारोळीयुक्त पदार्थाचा मनमुराद आनंद लुटता येईल.
हे अवश्य करा..
» कोणताही सुकामेव्याचा प्रकार हा हवाबंद बरण्यांमध्ये आणि डीप फ्रीजरमध्ये ठेवावा. तो दीर्घकाळ ताजा राहतो.
» चारोळ्या जास्त दिवस ठेवल्यास त्यांना खवट गंध येतो. म्हणून त्यांचा गरजेपुरताच साठा करावा.
जर्दाळू-पिस्ते मोरंबा
साहित्य : १ वाटी सुके जर्दाळू, १ वाटी साखर, १० ते १२ केशराच्या काडय़ा, १ चमचा वेलची पूड.
कृती : जर्दाळू अर्धा तास पाण्यात भिजत ठेवावे. मग ते कुकरमध्ये बटाटे उकडतात, त्याप्रमाणे पाणी न घालता कोरडेच उकडून घ्यावेत. एका पातेल्यात जर्दाळूचा वाफवलेला गर आणि साखर एकत्र करून हे मिश्रण आटवत ठेवावं. सतत ढवळत राहावं, कारण साखर वितळल्यावर मिश्रण लागू शकतं. मिश्रणातील पाण्याचा अंश पूर्णपणे निघून ते घट्टसर होईपर्यंत परतत राहावं. मग केशराच्या काडय़ा आणि वेलची पूड घालावी. थोडा वेळ परतून गॅस बंद करून, मिश्रण पुन्हा थोडावेळ परतत राहावं. पूर्ण थंड झाल्यावर तयार मोरंबा हवाबंद काचेच्या बरणीत टिकवण्यासाठी भरून ठेवावा. मोठय़ा प्रमाणावर मोरंबा बनवायचा असल्यास हे प्रमाण दुप्पट करावं.