यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते वेटलिफ्टिंगने. डोपिंगसाठी नेहमीच गाजलेल्या भारतीय वेटलिफ्टरनी यंदा कामगिरी ‘लिफ्ट’ करून दाखवली. त्यातही ठसा महाराष्ट्राचा जास्तकरून कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड गावाचा उमटला. गणेश माळी, ओंकार ओतारी आणि चंद्रकात माळी यांनी वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदके मिळवत कुरुंदवाड गावाला ओळख निर्माण करून दिली. आता नेमबाजी, कुस्तीप्रमाणेच वेटलिफ्टिंगकडे भविष्यात हमखास पदके मिळवून देणारा खेळ म्हणून पाहता येईल यात शंका नाही. दस्तुरखुद्द भारतीय वेटलिफ्टिंग संघटनेनेही ही बाब मान्य केली आहे.
भारताच्या वेटलिफ्टरकडून यंदाच्या राष्ट्रकुलमध्ये मिळवलेल्या पदकांची संख्या १२ होती. त्यात तीन सुवर्ण, चार रौप्य आणि पाच कांस्यपदकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्यांनी ही कामगिरी करताना नवी दिल्लीत २०१०मध्ये झालेल्या पदकांना मागे टाकले. त्यावेळी घरच्या प्रेक्षकांसमोर खेळल्याने भारताच्या वेटलिफ्टरनी चांगली कामगिरी केली होती, अशी टीका झाली होती. मात्र यंदा परदेशात भारताच्या वेटलिफ्टरनी विक्रमी नोंद करून दाखवली. त्यातच सतीश शिवलिंगमने तर ७७ किलो वजनी गटात राष्ट्रकुलमधील विक्रम नोंदवत सुवर्ण कामगिरी केली. त्याशिवाय सुखेन दे आणि के. संजिता चानू यांनीदेखील सोनेरी कामगिरी केली.
वेटलिफ्टर म्हणजे डोपिंग अशीच गेली काही वर्षे भारतात ओळख निर्माण झाली आहे. त्यात भर पडली ती २००९मध्ये भारताचे सहा वेटलिफ्टर डोपिंग चाचणीत दोषी आढळले तेव्हा. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने तेव्हा नियमानुसार भारतीय वेटलिफ्टिंग संघटनेवर तीन कोटी रुपयांचा दंड ठोठावला, जर दंड भरला नसता तर भारताच्या वेटलिफ्टरना किमान दोन वर्षासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धाना मुकावे लागले असते. अखेरीस भारतीय वेटलिफ्टिंग संघटनेने तीन कोटींचा दंड भरल्याने नवी दिल्लीत २०१०मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टरना प्रवेश मिळाला होता. त्यापूर्वी म्हणजे २००४ आणि २००६मध्येही डोपिंगमध्ये मोठया संख्येने वेटलिफ्टर आढळल्याने भारतीय वेटलिफ्टिंग संघटनेला बंदीच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते. मात्र आता ग्लासगोमधील यशानंतर भारतीयांचा वेटलिफ्टिंगकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल असे भारतीय वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष बिरेंद्र प्रसाद बैश्य यांचे
मत आहे.
‘‘गेली पाच वर्षे मी भारतीय वेटलिफ्टिंग संघटनेचा अध्यक्ष आहे. माझ्या कारकीर्दीत मी डोपिंग दूर ठेवण्यात यशस्वी झालो आहे. भारताने यंदा वेटलिफ्टिंगमधून मिळवलेली पदके हे डोपिंग मुक्त खेळ केल्याचे उदाहरण आहे. त्यातच यंदा वेटलिफ्टर डोप चाचणीत दोषी आढळू नये म्हणून त्याच्या आहाराची आखणी करुन देण्याचे कामही आम्ही बजावले. उत्कृष्ट नियोजन, अचूक संघनिवड, शिस्त आणि वेटलिफ्टरची खेळावरील निष्ठा हेदेखील मुद्दे महत्वाचे ठरतात.
भारताच्या वेटलिफ्टरनी यंदा ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वी खूप आधी म्हणजे २३ जूनला मायदेशातून प्रयाण केले होते. त्यांना बर्मिगहॅम येथे उच्च दर्जाच्या सोयीसुविधांचा सरावासाठी फायदा घेता यावा यासाठी आम्ही संघटनेनेच त्यांना लवकर पाठवले. अर्थातच सरकारनेही त्यासाठी आर्थिक मदत दिली. ते पाहता मी सरकारचा आभारी आहे,’’ असे बैश्य यांनी सांगितले. यंदादेखील वेटलिफ्टिंगमध्ये डोपिंगचे प्रकरण समोर आले होते मात्र ते परदेशी वेटलिफ्टरमधून. त्याचा फायदा भारताला झाला तो ५३ किलो गटात स्वाती सिंगला कांस्यपदक मिळवून देण्यात. ५३ किलो गटातील १६ वर्षीय वेटफिल्टर चिमा आम्लाहा डोप चाचणीत दोषी आढळल्याने तिचे सुवर्णपदक काढून घेण्यात आले होते. त्या वजनी गटात कांस्यपदक जिंकलेल्या भारताच्या संतोषी मात्साला रौप्यपदक मिळाले. एकंदरीत पुन्हा एकदा भारतीय वेटलिफ्टरचे नशीब फळफळले.
वेटलिफ्टिंग हा जास्तकरून गरीबांचा खेळ म्हणून ओळखला जातो. आताच्या राष्ट्रकुलमध्येदेखील पदके जिंकणारे वेटलिफ्टर हे गरीब घरातून आलेले आहेत. त्यातील मोठया स्तरावर पदके जिंकणा-यांना सरकारी नोक-या आहेत. मात्र प्रशिक्षणाचा खर्च पाहता त्यांना प्रायोजकांची गरज भासते. अर्थातच वेटलिफ्टिंगसारख्या खेळांना कॉपरेरेट पाठिंबा देत नाहीत. भारतीय वेटलिफ्टिंग संघटना या स्थितीकडे लक्ष वेधत आता केंद्र सरकारकडे प्राधान्य देणा-या खेळांमध्ये वेटलिफ्टिंगचा समावेश करावा, अशी मागणी करणार आहे. जेणेकरून सर्वाधिक निधी भारताच्या वेटलिफ्टरना तयारीसाठी मिळू शकेल.
आता दोन महिन्यांवर आशिया स्पर्धा आली आहे. त्यानिमित्ताने पुन्हा एकदा भारताच्या वेटलिफ्टरना वर्चस्व गाजवण्याची संधी आहे. अर्थातच दोन वर्षानी होणा-या २०१६ रिओ ऑलिंपिकवर भारतीय वेटलिफ्टरच्या नजरा असतील. आतापर्यंत ऑलिंपिकमध्ये वेटलिफ्टिंगमधून एकमेव पदक दिले आहे ते २०००मध्ये करनाम मल्लेश्वरीने. मात्र भारतीय वेटलिफ्टिंगचा ज्या योग्य दिशेने प्रवास सुरू आहे ते पाहता रिओ ऑलिंपिकमध्ये वेटलिफ्टिंगमधूनही भारताला निश्चित पदक मिळेल, असे अभिमानाने म्हणावेसे वाटते.
राष्ट्रकुल स्पर्धेवर यंदा कुरुंदवाड गावाने ठसा उमटवला. गणेश माळी, ओंकार ओतारी आणि चंद्रकात माळी यांनी वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदके मिळवत कुरुंदवाड गावाला ओळख निर्माण करून दिली. मात्र त्यांना घडवण्यात ज्यांचा हात आहे ते प्रशिक्षक प्रदीप पाटील यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. १९७८पासून ते जिमचे प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी गावात ‘हर्क्युलस जिम’ स्थापन करून तेथील छोटया मंडळींना एकप्रकारे वेटलिफ्टिंगकडे आकर्षित केले.
विशेष म्हणजे ही जिम चालवण्यासाठी ते मुलांकडून पैसे घेत नाहीत. त्याचेच फळ त्यांना मिळाले ते या त्यांच्या तीन विद्यार्थ्यांच्या पदकांनी. ‘‘गणेश, ओंकार आणि चंद्रकांतकडून मला हे यश अपेक्षित होते. वेटलिफ्टिंगसाठी लागणारी गुणवत्ता त्यांच्यात ठासून भरली आहे. अतिशय गरीब घरातून आलेली ही तीन मुले आहेत.
जोडीला खेळावर असलेली निष्ठा त्यांना हे यश मिळवून देऊन गेली. कुरुंदवाडसारख्या गावात क्रीडा संकुलांप्रमाणे सोयीसुविधा नसतानाही त्यांनी येथे खेळाचा पाया भक्कम केला. आता त्यांच्याकडून ऑलिंपिकमध्ये मला पदकांची अपेक्षा आहे. त्यांच्यासारखे विद्यार्थी हे माझे आहेत हे सांगताना मला अभिमान वाटतो. खेळातील यश त्यांना सरकारी नोकरी मिळवून देऊन गेले याकडेही लक्ष वेधतो, ’’ असे प्रदीप पाटील म्हणाले. २०२०च्या ऑलिंपिकमध्ये ‘हक्र्युलस जिम’चा एखादा वेटलिफ्टर पदक जिंकून देईल, अशी आशाही प्रदीप पाटील यांनी व्यक्त केली.
वेटलिफ्टिंग आणि डोपिंग याबद्दल पाटील सरांची मते रोखठोक आहेत. ‘‘वेटलिफ्टर मुले गरीब घरातून आलेली असतात. मात्र डोपिंग करू नये हे त्यांना लहान वयातच त्यांच्या प्रशिक्षकांनी ठासवून सांगण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे परीक्षेत तुम्ही कॉपी करून मार्क मिळवू नयेत, असे म्हटले जाते तसेच डोपिंगचा मार्ग अवलंबून पदके जिंकू नयेत हे मी सांगतो. जर वेटलिफ्टिंगमध्ये तुम्ही प्राविण्य मिळवत असाल तर डोपिंगची गरजच काय असा माझा प्रश्न आहे. डोपिंग दूर करण्यासाठी भारतीय वेटलिफ्टिंग संघटना जे प्रयत्न करत आहे त्याला यश येत आहे असे मी यानिमित्ताने म्हणेन,’’ याकडे पाटील सरांनी लक्ष वेधले.