एस. टी. कर्मचा-यांचा बहुचर्चित वेतनकरार तब्बल एक वर्षानंतर मार्गी लागला. हा वेतनकरार पुढील चार वर्षासाठी लागू होणार आहे. वेतनकरारानुसार कर्मचा-यांना १३ टक्के पगारवाढीमुळे वाढीव शिलाईभत्ता, धुलाईभत्ता, महागाईभत्ता, घरभाडे यांचा लाभ होणार आहे.
एस. टी. कर्मचा-यांचा बहुचर्चित वेतनकरार तब्बल एक वर्षानंतर मार्गी लागला. हा वेतनकरार पुढील चार वर्षासाठी लागू होणार आहे. वेतनकरारानुसार कर्मचा-यांना १३ टक्के पगारवाढीमुळे वाढीव शिलाईभत्ता, धुलाईभत्ता, महागाईभत्ता, घरभाडे यांचा लाभ होणार आहे. या वेतनवाढीमुळे कर्मचा-यांना दीड हजार ते सहा हजार रुपयांपर्यंत वेतनवाढ मिळणार आहे. मात्र या सर्व गोष्टींमुळे एस. टी. महामंडळावर वर्षाला ४५२ कोटी तर चार वर्षासाठी १,६५० कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.
वेतनकरार झाल्याचे सर्वत्र स्वागत होत आहे. कर्मचा-यांनाही दिलासा मिळाला आहे. मात्र हा करार होत असताना एस. टी. महामंडळाने आणि सर्व कर्मचा-यांनी महामंडळाचे उत्पन्न कसे वाढेल, याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. सध्याची एस. टी. महामंडळाची स्थिती पाहता करारातील अटींची अंमलबजावणी करणे, मागील थकबाकी देणे, वाढत्या डिझेलच्या दरांचा सामना करणे हे सर्व अवघड होऊन बसणार आहे.
यावरील एकमेव उपाय म्हणजे उत्पन्न वाढवणे. त्यामुळे सध्या झालेल्या करारात एस. टी. चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी मोठय़ा चातुर्याने उत्पादनवाढीच्या मुद्दय़ाचा समावेश करारामध्ये करून घेतला आहे. यापुढे कर्मचा-यांना एस. टी. चे उत्पन्न वाढवणे बंधनकारक राहणार आहे. शिवाय यापुढील होणारे वेतनकरारदेखील त्यावेळच्या एस. टी. च्या आर्थिक परिस्थितीनुसार होणार आहेत.
एस. टी. महामंडळाची आर्थिक परिस्थिती सध्या बिकटच आहे. २०१०-११ या आर्थिक वर्षात एस. टी. चे उत्पन्न ४,९८१ कोटी रुपये होते. तर झालेला खर्च ४,९४० कोटी रुपये एवढा होता. २०११-१२ या वर्षात एस. टी. चे उत्पन्न ५,६०० कोटी रुपये होते. तर झालेला खर्च हा ५५४० कोटी रुपये एवढा होता. पण सध्याच्या वेतनकरारानुसार वर्षाला पगारापोटीच ४५२ कोटींचा अतिरिक्त भार एस. टी. महामंडळाला सोसावा लागणार आहे.
त्याचबरोबर नवीन कर्मचा-यांची भरती, डिझेल दरवाढ यांचादेखील जवळपास ५०० कोटींचा अतिरिक्त भार एस. टी. महामंडळाला पडणार आहे. म्हणजे वर्षाला जवळपास १,००० कोटींचा खर्च एस. टी. महामंडळाच्या माथ्यावर आहे. अशा स्थितीत केवळ ६० कोटी रुपये महामंडळाच्या हाताशी असतील. तर सर्वाच्या जवळच्या असणारे एस. टी. महामंडळ कसे चालणार, हा प्रश्न आहे. त्यामुळे उत्पन्न वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. त्यादृष्टीने महामंडळाने आतापासूनच तयारीला लागणे गरजेचे आहे.
महामंडळाकडून राज्य सरकारला बाराशे कोटींचा तर केंद्र सरकारला दोनशे कोटींचा कर तसेच महापालिकांना आठ कोटींचा कर असे जवळपास एकूण चौदाशे पन्नास कोटींचे कर महामंडळाला द्यावे लागतात. या करारातून सूट कशी मिळेल, याबाबतदेखील महामंडळ प्रशासनाने कसोशीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करत असताना खासगी वाहतूक कंपन्यांसोबत एस. टी. महामंडळाला स्पर्धाही करावी लागणार आहे. त्यामुळे एस. टी.ची सेवा कशी दर्जेदार होईल, या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. मुंबई-पुणे दरम्यान चालवल्या जाणाऱ्या वातानुकूलित शिवनेरी बसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतोय, ही सेवादेखील उत्तम पद्धतीने सुरू आहे. या मार्गावर खासगी वाहतुकदारांच्यादेखील गाडय़ा चालतात.
पण प्रवाशांचा कल हा शिवनेरी बसमधून प्रवास करण्याकडेच असतो. याच धर्तीवर अन्य ठिकाणीदेखील महामंडळाने अशाच पद्धतीचे प्रयोग करावे. जेणेकरून महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होईल. कर्मचा-यांनीही महामंडळ आपले आहे, या भावनेपोटी काम करणे गरजेचे आहे. अनेक कार्यालयांमध्ये कर्मचारी काम करताना टाळाटाळ करू लागले आहेत.
आपले कोणीही बिघडवू शकत नाही, या आविर्भावात ते वागतात. त्यांच्या या वागण्याचा फटका हा अप्रत्यक्षपणे एस. टी.लाच बसतो. त्यांनी ही वृत्ती बदलणे गरजेचे आहे. जेव्हा एकात्मिक भावनेतून महामंडळाचे काम होईल, तेव्हाच हे महामंडळ स्वत:च्या पायावर उभे राहील, नाहीतर ते खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल करेल, असे म्हटले तर वावगे ठरू नये.