कोकणचा पाऊस..
लग्न झाल्यावर संसारात गुंतून जातो तसा
एकदा सुरुवात झाली की, शेवटपर्यंत धो धो धो ऽऽऽ पडतो..
नाशिकचा पाऊस
दरोडेखोर आहे
एकदा पडला तर अख्खा सराफ बाजार आणि भांडी बाजार लुटून नेतो
विदर्भाचा पाऊस
एका प्रेयसीसारखा..
सारखी वाट पाहायला लावणारा
वेळ कधीच नाही पाळणार..
आला तर प्रेयसीसारखा
झुळुक दाखवून भर्रकन जाणार
अन् पुन्हा वाट पाहायला लावणार..
अन् मुंबईचा पाऊस
प्रेयसीच्या बापा व भावासारखा..
कधी येऊन टपकेल
धो धो आपल्याला धुऊन निघून जाईल सांगता येत नाही..
मराठवाडय़ातला पाऊस
म्हणजे लफडं..!
जमलं तर जमलं नाहीतर सारंच हुकलं..!!
पुण्याचा पाऊस बायकांसारखा..
त्या चिडल्या की धड स्पष्ट बोलत नाहीत
नुसती दिवसभर पिरपिर चालू
पाऊस पण धड रपरपा पडत नाही..
दिवसभर पिरपिर रिप रिप भुरभुर चालू असते.
नुसता वैताग!
मी पावसाला विचारलं तुझं वय काय?
पावसानं मला सुंदर उत्तर दिलं,
जर तू पावसात सैरवैरा
आनंदात धावत असशील
तर माझं वय १०
जर तू पावसात
कविता लिहीत असशील
तर माझं वय १६
जर तुला पावसात
विरह जाणवत असेल
तर माझं वय १८
जर तुला पावसात
ट्रेकिंगला जावंसं वाटत
असेल तर माझं वय २४
जर तुला पावसात
गजरा घ्यावासा वाटत असेल
तर माझं वय ३०
जर तुला मित्रांसोबत
पावसात भिजत भजी
खावी असं वाटत असेल
तर माझं वय ४०
मग मी पावसाला म्हणालो
अरे, एक काय ते वय सांग,
शब्दात गुंतवू नकोस!
पाऊस स्मितहास्य करत म्हणाला,
पाऊस तू जसा अनुभवशील
तेच माझं वय!!