नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत सर्वात जास्त त्रास कुणाला झाला असेल, तर तो शालेय विद्यार्थ्यांना. शाळा भरायची वेळ व जोरदार पावसाची वेळ एकच असल्यामुळे अनेक शाळांमध्ये मुले अडकून पडल्याच्या किंवा शाळेत पोहोचूच शकली नसल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अशा परिस्थितीत जोवर सरकारी आदेश येत नाहीत, तोवर शाळांना सुट्टी देता येत नाही किंवा शाळा लवकर सोडण्याचा निर्णय घेता येत नाही. या विषयावर पावसाळी अधिवेशनात गदारोळ झाल्यानंतर आता आपत्कालीन परिस्थितीत शाळा सोडण्याचा किंवा सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार शाळा प्रशासनास देण्यात आला आहे.
खरे तर राज्याच्याच काय, पण मुंबई -उपनगरांच्या देखील विविध भागांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असतो. त्यामुळे ज्या ठिकाणी अधिक अतिवृष्टी होईल, तिथे परिस्थिती पाहून शाळेच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना दिल्याने विद्यार्थी व पालकांना दिलासाच मिळालेला आहे. मात्र, वर्षानुवर्षे पावसाळ्यात शाळा व विद्यार्थ्यांच्या बाबतीत निर्माण होत असलेल्या या अडचणींवर मात करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. साधारणत: राज्यात बहुतांश अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष जून-जुलैला सुरू होऊन, मार्च-एप्रिलपर्यंत संपत असते.
त्यामुळे एप्रिल ते जून हा कालावधी शाळांचा उन्हाळी सुटय़ांचा काळ म्हणून ओळखला जातो. साधारणत: सर्वत्र पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या शाळा जूनमध्ये सुरू होतात व नेमक्या त्याच वेळेस पावसाला सुरुवात होते. पावसाचा हंगाम सप्टेंबपर्यंत राहत असल्याने या काळात मुलांना शाळेत जाण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात मुले शाळेत अडकून पडण्याच्या घटनादेखील नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीत घडलेल्या आहेत. त्यामुळे खरे तर उन्हाळी सुट्टय़ांची परंपरा बदलून मुलांना पावसाळी सुट्टी देण्याची आवश्यकता भासत आहे. यासाठी शैक्षणिक वर्ष सुरू व संपण्याचा कालावधी बदलणे आवश्यक आहे. ऑक्टोबरला शाळा सुरू करून मे अखेर शैक्षणिक वर्ष पूर्ण केल्यास, पावसाळ्यात मुलांचा त्रास व दगदग कमी होईल आणि पालकांनादेखील ब-याच अंशी दिलासा मिळेल.
आर्थिक वर्ष बदलण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेणा-या सरकारला आता हा शैक्षणिक वर्ष बदलाचा सोयीस्कर निर्णयदेखील घ्यायला काहीच हरकत व अडचण असण्याचे कारण नाही. अतिवृष्टी व मुसळधार पावसात मुलांना व पालकांना संरक्षण देण्यासाठी सुट्टी घोषित करण्याच्या निर्णयाचा अधिकार शाळांना देण्याऐवजी संपूर्ण पावसाळी हंगामात शाळांना अधिकृत वार्षिक सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात यावा. काळानुरूप विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात बदल होत गेले, त्याचबरोबर परिस्थिती व वातावरणाप्रमाणे शैक्षणिक वर्ष बदलण्यासाठी जाणीवपूर्वक व ठोस प्रयत्न आवश्यक आहेत.