देशभरात होत असलेल्या शेतक-यांच्या आत्महत्येचा प्रश्न गंभीर असून या संदर्भात सर्वेक्षण करून शेतक-यांच्या आत्महत्येमागील नेमकी कारणे शोधण्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ‘ऑल इंडिया किसान सभे’ने ठरवले आहे.
नवी दिल्ली- देशभरात होत असलेल्या शेतक-यांच्या आत्महत्येचा प्रश्न गंभीर असून या संदर्भात सर्वेक्षण करून शेतक-यांच्या आत्महत्येमागील नेमकी कारणे शोधण्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ‘ऑल इंडिया किसान सभे’ने ठरवले आहे.
मागील २० वर्षात सुमारे तीन लाख शेतक-यांनी आत्महत्या केल्याच्या प्रश्नाकडे ‘किसान सभे’ने सरकारचे लक्ष वेधले आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून शेतक-यांच्या आत्महत्येमागील नेमकी परिस्थिती काय आहे? आत्महत्येमागील नेमकी कारणे काय आहेत? आदी प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न किसान सभा करणार असल्याचे सरचिटणीस हनान मोल्लाह यांनी सांगितले. या सर्वेक्षणात सर्वाधिक आत्महत्या झालेल्या ११ राज्यांतील शेतक-यांच्या २० कुटुंबीयांची भेट घेण्यात येणार आहे.
किसान सभेचे राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील नेते या पथकात असतील. ते आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन २० विविध प्रश्नांद्वारे आत्महत्येमागील कारणांचा शोध घेणार आहेत. याअंतर्गत संबंधित शेतक-याचे नाव, गाव, शेतीचे एकूण क्षेत्रफळ, पिकाचा प्रकार, झालेले नुकसान आणि शेतकरी आत्महत्येस का प्रवृत्त झाला, आदी प्रश्न कुटुंबीयांना विचारण्यात येणार आहेत.
या जुलैअखेपर्यंत ही सर्व माहिती गोळा करून त्याचा अहवाल तयार करण्यात येईल. तसेच या गंभीर प्रश्नाकडे सत्ताधा-यांचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही यशस्वी चर्चा घडवून आणू, असा विश्वासही ‘माकप’तर्फे सांगण्यात आले.
मोदी सरकारविरोधात धरणे आंदोलन
मागील वर्षभरापासून शेतक-यांच्या आत्महत्यांच्या घटनांत मोठी वाढ झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार केवळ आश्वासनांचा बार उडवत आहे. या संदर्भात अखिल भारतीय किसान सभेकडून एक कृती कार्यक्रम तयार करण्याचे काम सुरू असून, याद्वारे सरकारवर दबाव टाकण्यात येणार आहे.
शेतक-यांच्या आत्महत्येचा प्रश्न केवळ स्थानिक पातळीवर लावून धरला जातो. आम्हाला हा प्रश्न राष्ट्रीय स्तरावर न्यायचा आहे. यासाठी आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या सुमारे २०० कुटुंबातील लोकांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत १० आणि ११ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन धरण्यात येणार आहे. संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारवर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न असेल, असेही किसान सभेने म्हटले आहे.