मुंबई – नववर्षांच्या निमित्ताने शहरातील समुद्रकिनारे, रस्ते, उपाहारगृहे गर्दीने खचाखच भरलेले असतानाच उच्चभ्रूंचे पब, बार आणि उपाहारगृहांमध्ये मात्र शुकशुकाट होता. कमला मिलमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर महापालिकेने दोन दिवसांत हजाराहून अधिक पब, उपाहारगृहांची केलेली झडती आणि सातशेहून अधिक अनधिकृत बांधकामांवर टाकलेला हातोडा यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी सजलेल्या पब आणि बारचा व्यवसाय थंड होता. पालिकेने सुरू केलेल्या कारवाईचा धसका घेत अनेक पब आणि बारमालकांनी पाटर्य़ाचे नियोजन रद्द केले होते.
कमला मिलमध्ये घडलेल्या दुघर्टनेच्या पार्श्वभूमीवर पालिकेने रविवारीही हॉटेलांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू ठेवल्याने नववर्षाच्या स्वागत पाटर्य़ाचा उत्साह मावळला होता.
रघुवंशी मिलमधील पिनाकिन, फ्युमस-शिशा लाऊंज यांच्यासह बार आणि पब मालकांनी आगाऊ स्वरूपात केलेले पाटर्य़ाचे आरक्षण रद्द केले. तसेच आयोजनानिमित्ताने ग्राहकांकडून घेण्यात आलेली अनामत रक्कमही त्यांना पुन्हा देण्यात आली होती. त्यामुळे मध्य मुंबईतील पब आणि बारमध्ये पार्टी करण्याच्या उत्साहात आलेल्या लोकांना माघारी जावे लागले. मात्र उपनगरातील अंधेरी आणि वांद्रे येथील काही पब आणि बारमध्ये नववर्षांच्या स्वागताचा उत्साह दिसत होता. कारवाईचा हातोडा न पडलेल्या येथील पब आणि बारमालकांनी पाटर्य़ाचे जंगी आयोजन केले होते. त्यामुळे दक्षिण मुंबईत हिरमोड झालेल्या उत्साही मंडळींनी उपनगर गाठले होते.
पब आणि बारमालकांनी पाटर्य़ाचे आयोजन ऐन वेळी रद्द केल्याने त्याचा फायदा उपाहारगृहांना झाला. नवीन वर्षांच्या स्वागतासोबत विविध खाद्यपदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी लोकांनी उपाहारगृहांबाहेर गर्दी केली होती. विशेषत: पर्यटनस्थळे आणि समुद्रकिना-यांच्या परिसरात असलेल्या उपाहारगृहात गर्दी लोटली होती. मॉलमध्येही लोकांनी गर्दी केली होती. यात सामान्य मुंबईकरांनी मात्र पर्यटनस्थळांना भेट देऊन नववर्षाचा उत्साह साजरा केला. त्यामुळे मुंबईतील प्रमुख पर्यटनस्थळी गर्दी झाली होती.
गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह, वांद्रे कार्टर रोड, बॅण्ड स्टॅण्ड, जुहू चौपाटी, शिवाजी पार्क परिसर घराबाहेर पडलेल्या लोकांनी भरून गेला होता. कोणी ‘केक’ कापून, तर कोणी त्याच ठिकाणी छोटेखानी पार्टी करून नववर्षाच्या स्वागताचा आनंद लुटत होता. तसेच गेटवे ऑफ इंडिया येथेही पोलीस पर्यटकांची तपासणी करून त्यांना या परिसरात प्रवेश देत होते.