मॅडम म्हणाल्या, ‘तुमच्यासोबत प्रोजेक्ट चालू होता तेव्हा माझी बढती तोंडावर आली होती. तुमच्या तक्रारीनं ती रोखली गेली असती. पण तू ती तक्रार ड्रॉवरमध्ये ठेवलीस.’
आमच्या संस्थेचा एक मोठा प्रकल्प चालू होता. सारं युनिट एक होऊन प्रकल्पाशी जोडलं गेलं होतं. मायक्रो प्लॅनिंग ही संकल्पना तेव्हा नुकतीच रुजू लागली होती तेव्हाची गोष्ट.. साधारण पंधरा दिवसांचा अवधी देऊन एक काम.. किंवा कामाचा एक छोटासा भाग माझ्यावर सोपवला गेला होता. आमची सहा-सात जणांची टीम होती. आम्ही हा हिस्सा अगदी हसत हसत दहा दिवसांच्या आत पूर्ण केला.
त्यासाठी आमच्या प्रकल्पप्रमुख शीला मॅडमनी सांगितलेली रीती-पद्धतीच अवलंबली, पण एक छोटासा शॉर्ट-कट मारला होता. झालेलं काम मॅडमना दाखवायचं, त्यांची शाबासकी मिळवायची आणि कौतुकाने त्यांच्याकडून पुढची जबाबदारी स्वीकारायची आम्हाला घाई झाली होती. सारी टीम इतकी अधीर झाली होती की कुणीतरी मुद्दाम जाऊन मॅडमना आमच्या हॉलमध्ये बोलावून आणलं.
मॅडम आल्याआल्या गर्जायलाच लागल्या.
‘दहा दिवसात काम उरकायची घाई कशाला? गुणवत्ता घसरली म्हणजे, शॉर्ट-कट मारायला कुणी सांगितला.. वगैरे वगैरे. मला मध्ये बोलण्याची संधीच मिळाली नाही. सारी टीम हिरमुसली. सा-यांच्या माना खाली गेल्या. मी झालेलं काम बघा, असं सांगायचा प्रयत्न केला, पण मॅडमनी काहीच ऐकून घेतलं नाही. ताडताड बोलून त्या निघून गेल्या. शॉर्टकटची कल्पना माझीच होती. माझ्यामुळे सगळय़ांचा अपमान झाला म्हणून मीही गप्प झाले.’
दुस-या दिवशी मी कामावर पोहोचले तेव्हा सर्वानी एक निवेदन तयार ठेवलं होतं. त्यात कामाविषयी वस्तुस्थिती लिहून, झाल्या अपमानाचा सौम्य निषेध केला होता. टीमचं म्हणणं बरोबर होतं. त्यांनी ते सौम्य शब्दांत मांडलं होतं. पण असं लेखी काही वर पाठवावं असं मला आतून वाटेना. तेही नव्या प्रोजेक्टच्या सुरुवातीलाच. अशानं आपल्याच अडचणी वाढण्याची शक्यता असते. सहका-यांची किंवा वरिष्ठांची मनं बिघडली तर काम मंदावतंच.
मी तो कागद माझ्याच जवळ ठेवला.
सहकारी प्रतिक्रियेची वाट पाहात होते. त्यांना वाटलं वरिष्ठांनी दखल नाही घेतली. सारे पुन्हा कामात बुडून गेले. यथावकाश प्रकल्प पूर्ण झाला, आम्ही सारे पांगलो.
खरी गोष्ट अशी होती, ज्या दिवशी मॅडम आम्हाला खूप रागावल्या त्याच दिवशी सकाळीच त्यांच्या पतीला काही दुर्धर आजार आहे असं मला कळलं होतं. मॅडम जेव्हा रागावून निघून गेल्या तेव्हा जाताना त्या ताडताड पावलं टाकत ताठ मानेनं गेल्या. मी खिडकीतून पाहात होते. त्या आमच्या हॉलमधून बाहेर पडल्या. पोर्चमधून खाली उतरल्या. आता समोरच्या बिल्डिंगमध्ये जाताना त्यांचा जोश पूर्ण निमाला होता. खांदे पडले होते. पावलं हळूहळू पडत होती. जणू संकटाचं ओझं खांद्यावर घेऊन एक पल्ली हळूहळू चालत आहे असंच मला वाटलं. त्यांचा राग हा या परिस्थितीचंच दृश्य रूप असणार याची खात्री पटली आणि मी तो कागद पुढे पाठवायचा नाही, मॅडमविषयी लेखी तक्रार वर जाऊ द्यायची नाही असं ठरवलं. आपण स्त्रियांनीच एकमेकींना समजून घेतलं पाहिजे. न बोलता, न सांगता.. अशीच भावना त्यापाठी होती माझी.
परवा अचानक मुंबईच्या विमानतळावर मॅडम भेटल्या. एकटय़ाच मुलाकडे चालल्या होत्या. थोडय़ा गप्पा झाल्या. अजूनही त्या त्याच संस्थेत काम करत होत्या. निवृत्ती जवळ आली होती. आमच्यासारखी उमेदवार मंडळी घेऊन वेगवेगळे प्रकल्प त्या करतच होत्या. मी म्हटलं, ‘तुम्ही मला ओळखलंत, कौतुक आहे तुमचं’
मॅडम म्हणाल्या, ‘का नाही ओळखणार, तुमच्यासारखी समजदार माणसं किती कमी असतात जगात. सगळीकडे स्पर्धा, शर्यत आणि इर्षा भरली आहे.’
आता आश्चर्य करण्याची माझी पाळी होती. मला काही उमगेना, त्या काय म्हणत आहेत. माझा हात हातात घेऊन मॅडम म्हणाल्या, ‘तुमच्यासोबत प्रोजेक्ट चालू होता तेव्हा माझी बढती तोंडावर आली होती. तुमच्या तक्रारीनं ती रोखली गेली असती. पण तू ती तक्रार ड्रॉवरमध्ये ठेवलीस.’ माझा चकित चेहरा पाहून त्या म्हणाल्या,‘प्रोजेक्ट संपल्यानंतर तुझ्या टेबलच्या सर्वात खालच्या ड्रॉवरमध्ये तो कागद सापडला. बरं झालं भेटलीस, मला तुला धन्यवाद द्यायचेच होते. पण मला सांग, तू तक्रार पुढे का पाठवली नाहीस?’
मी हळूच म्हटलं, ‘मॅडम तुमच्यावरच्या संकटाची मला कल्पना होती.. म्हणून म्हटलं, आपण बाकी काही करू शकत नाही निदान समजून तरी घ्यावं’
आमच्या दोघींच्या डोळय़ात पाणी होतं. त्यांना माझ्या समजुतदारपणाचं कौतुक वाटलं तर मला त्यांच्या मनाच्या मोठेपणाचं. दहा-बारा वर्षानी एका ज्युनियरला आठवणींनी धन्यवाद देणं ही दुर्मीळ गोष्ट आहे. पण असे दुर्मीळ क्षणच नात्यांचे पूल बांधतात. त्या अदृश्य बंधनातली ताकद आपल्याला जाणवून देतात आणि माणसांसोबत जगण्याचा आपला विश्वास वाढवतात, नाही का?