अत्यंत हुशारीने लढताना दलाची ‘शून्य’ हानी होईल याचा विचार करावा, असे आवाहन केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) प्रमुख प्रकाश मिश्रा यांनी केले.
नवी दिल्ली- माओवादी आणि घुसखोरीविरोधात लढताना केंद्रीय निमलष्करी दलाच्या जवानांनी शौर्याने लढावे. मात्र अत्यंत हुशारीने लढताना दलाची ‘शून्य’ हानी होईल याचा विचार करावा, असे आवाहन केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) प्रमुख प्रकाश मिश्रा यांनी केले.
शौर्य गाजवणा-या सीआरपीएफच्या ३६ जवानांचा सत्कार मिश्रा यांच्या हस्ते झाला. दलाला शौर्य गाजवणा-या जवान व अधिका-यांची गरज आहे. यंदा दलाला १०० शौर्यपदके मिळतील, अशी मला आशा आहे. ही लढाई करताना दलाची ‘शून्य’ टक्के हानी होईल, याकडे लक्ष द्या. माओवाद्यांशी लढताना अत्यंत हुशारी व चातुर्याने लढा, असेही त्यांनी सांगितले.
देशातील सर्वात मोठ्या निमलष्करी दलाचे प्रमुख असलेले मिश्रा म्हणाले की, माओवाद्यांशी लढताना येणारा ताण कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माओवादी क्षेत्रात काम केलेल्या जवानांची बदली अन्य भागात करण्यात येणार आहे. येत्या जूनपासून या कार्यवाहीला प्रारंभ होणार आहे. जवानांचे जीवनमान सुधारण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील.