बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना बीसीसीआयची निवडणूक न लढवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत माजी प्रशासकांसह क्रिकेटपटूंनी केले आहे.
नवी दिल्ली – बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना बीसीसीआयची निवडणूक न लढवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत माजी प्रशासकांसह क्रिकेटपटूंनी केले आहे. न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी सांगितले.
आपण अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ‘‘श्रीनिवासन यांना बीसीसीआय निवडणुकीस प्रतिबंध केल्याने आनंद झाला. त्यांच्या कालावधीत क्रिकेटला घातक अनेक गोष्टी घडल्यात. श्रीनि यांना बीसीसीआयबाहेर ठेवल्यानंतर अनावश्यक गोष्टींना पायबंद बसेल.
क्रिकेट प्रशासनात प्रचंड बदल करण्याची आवश्यकता आहे,’’ असे पवार यांनी म्हटले. श्रीनि यांच्यावर टीका केली तरी पुन्हा बीसीसीआय अध्यक्ष बनण्याची इच्छा नसल्याचे ते म्हणाले. ‘‘मी किंवा शशांक मनोहर पुन्हा अध्यक्षपदासाठी उत्सुक नाही. मात्र क्रिकेट प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी मदत करण्याची इच्छा जरूर आहे,’’ असे पवार यांनी सांगितले.
बीसीसीआयची निवडणूक लढवण्यास प्रतिबंध केल्यानंतर श्रीनिवासन यांनी आयसीसीचे चेअरमनपदही सोडावे, असे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष ए. सी. मुथय्या यांनी म्हटले आहे. ‘‘बीसीसीआय निवडणूक लढवण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतर श्रीनि यांनी तातडीने आयसीसी चेअरमनपदही सोडावे. देशातील क्रिकेट संघटनेवरून (बीसीसीआय) हटवल्यानंतर श्रीनिवासन आयसीसीच्या चेअरमनपदी कसे राहू शकतात,’’ असा प्रश्न मुथय्या यांनी केला आहे.
बीसीसीआयचे आणखी एक माजी अध्यक्ष आय. एस. बिंद्रा यांनीही पवार आणि मुथय्या यांच्या मताशी सहमती दर्शवली आहे. ‘‘न्यायालयाने श्रीनि यांना फटकारल्यानंतर बीसीसीआयच्या विद्यमान पदाधिका-यांनी यातून बोध घ्यायला. ठोस पुरावे असूनही बीसीसीआयने दोषींवर कारवाई केली नाही. त्याचा फटका त्यांना बसला.
आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी, बीसीसीआयविरुद्ध उभे ठाकलेले याचिकाकर्ता आणि क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य वर्मा यांनी ‘श्रीनिवासन यांची बीसीसीआयमधील कारकीर्द संपुष्टात आल्याचे’ म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने श्रीनि यांना निवडणूक लढवण्यास केलेला प्रतिबंध तसेच बीसीसीआयवरील कडक ताशेऱ्योमुळे बोर्डाचे निर्णय अधिक पारदर्शक होतील,’’ असा विश्वास माजी खजिनदार अजय शिर्के यांनी व्यक्त केला आहे.
आता निर्णय श्रीनिंना घ्यायचा आहे
सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही श्रीनिवासन यांच्यावर कारवाई करण्यास बीसीसीआय धजावत नाही. स्वत:च्या भवितव्याबाबतचा निर्णय श्रीनिंनी स्वत: घ्यावा, असे विद्यमान पदाधिका-यांनी म्हटले आहे. ‘‘न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील पावले उचलण्याबाबत श्रीनिवासन बीसीसीआय पदाधिका-यांशी चर्चा करतील,’’ असे एका पदाधिका-याने सांगितले.
चेन्नई आणि राजस्थानच्या क्रिकेटपटूंचे काय?
चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सवर बंदीची शक्यता असल्याने त्या संघांशी करारबद्ध क्रिकेटपटूंचे भवितव्य अधांतरी आहे. या दोन्ही संघांमधील क्रिकेटपटू असे आहेत.
चेन्नई सुपर किंग्ज – महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, आर. आश्विन, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, फाफ डु प्लेसिस, ड्वेन स्मिथ, आशिष नेहरा, मोहित शर्मा, ईश्वर पांडे, पवन नेगी, सॅम्युएल बद्री, मिथुन मन्हास.
राजस्थान रॉयल्स – शेन वॉटसन (कर्णधार), अजिंक्य रहाणे, स्टुअर्ट बिन्नी,शॉन टेट, ब्रॅड हॉज, ब्रॅड हॉग, केवॉन कुपर, ओवेस शहा, अशोक मेनारिया, सिद्धार्थ त्रिवेदी, दिशांत याज्ञिक, श्रीवत्स गोस्वामी, हरमीत सिंग, जेम्स फॉकनर, फिडेल एडवर्ड्स, कुशल परेरा, सचिन बेबी, संजू सॅमसन, राहुल शुक्ला, प्रवीण तांबे, कुमार बोरेसा, विक्रमजीत मलिक.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा परिणाम अन्य क्रीडा संघटनांवरही होईल
नवी दिल्ली – आयपीएल स्पॉटफिक्सिंग प्रकरणी सुनावणीदरम्यान बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांना निवडणूक लढवण्याच्या निर्णयाचा चांगला परिणाम देशातील अन्य क्रीडा संघटनांवर होईल, असे मत आयपीएल स्पॉटफिक्सिंग चौकशी समितीचे प्रमुख माजी न्यायमूर्ती मुकुल मुदगल यांनी गुरुवारी व्यक्त केले.
Extremely happy with the Hon. Supreme Court judgement on #srinivasan ..always believed that I would be vindicated #IPLVerdict
— Lalit Kumar Modi (@LalitKModi) January 22, 2015