श्रीलंकेच्या सागरी हद्दीत प्रवेश केल्याच्या आरोपावरुन श्रीलंकन नौदलाने मंगळवारी २५ भारतीय मच्छीमारांना अटक केली.
कोलंबो – श्रीलंकेच्या सागरी हद्दीत प्रवेश केल्याच्या आरोपावरुन श्रीलंकन नौदलाने मंगळवारी २५ भारतीय मच्छीमारांना अटक केली. उत्तर जाफनामधील समुद्रातून मंगळवारी पहाटे २५ मच्छीमारांना ताब्यात घेतल्याचे श्रीलंकन नौदलाचे प्रवक्ते कोसाला वारनाकुलासूर्या यांनी सांगितले.
श्रीलंकन नौदलाने सहा मच्छीमारी ट्रॉलरही जप्त केले आहेत. या मच्छीमारांना कांकेसंतुराई बंदरावरील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गेल्या आठवडयात भारत दौ-यावर आलेले श्रीलंकेचे मंत्री रंजिता सेनारत्ने आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यामध्ये नवी दिल्लीत झालेल्या भेटीमध्ये दोन्ही देशांच्या अटकेत असलेल्या मच्छीमारांच्या मुद्यावर चर्चा झाली होती.
यावेळी दोन्ही देशांनी परस्परांच्या तुरुंगात असलेल्या ४०० मच्छीमारांची सुटका करण्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत दोन्ही देशांनी ५२ मच्छीमारांची सुटका केली आहे. आकडेवारीनुसार २४० भारतीय मच्छीमार श्रीलंकेच्या तुरुंगात आहेत तर, १६० श्रीलंकन मच्छीमार भारतीय तुरुंगात आहेत. दोन्ही देशांच्या अटकेत असलेल्या मच्छीमारांची लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या २७ जानेवारीला होण्या बैठकीपूर्वीच भारतीय मच्छीमारांना अटक झाली आहे.