सर्वधर्म समभाव, सर्वजाती-धर्मामध्ये समानता, विविधतेत दडलेली एकता, या देशाची सर्वश्रेष्ठ लोकशाही या विरोधात संघ, भाजपा हल्ला करण्याचा प्रयत्न करीत असून, लोकतंत्र धोक्यात आलेले आहे.
नागपूर- सर्वधर्म समभाव, सर्वजाती-धर्मामध्ये समानता, विविधतेत दडलेली एकता, या देशाची सर्वश्रेष्ठ लोकशाही या विरोधात संघ, भाजपा हल्ला करण्याचा प्रयत्न करीत असून, लोकतंत्र धोक्यात आलेले आहे.
संघ, भाजपाच्या या संविधान आणि देशविरोधी कारवाया हाणून पाडण्यासाठी काँग्रेस पक्ष सामान्य जनतेचा आवाज बुलंद करेल, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी नागपूरच्या कस्तुरचंद पार्कवर संघ, भाजपा आणि मोदी सरकार यांच्याविरोधात रणशिंग फुंकले.
कडक उन्हात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जन्मशताब्दीच्या सोहळयाच्या समारोपानिमित्त काँग्रेसने आयोजित केलेल्या सभेला तुफान गर्दी झाली होती. काँग्रेस पक्ष झिंदाबाद, सोनिया झिंदाबाद, राहुलजी झिंदाबाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, अशा घोषणांनी सारे नागपूर दणाणून गेले होते. महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी झालेल्या या सभेने देशाची आणि महाराष्ट्राची पुरोगामी परंपरा जपण्याचा निर्धार काँग्रेसच्या नेत्यांनी केला.
देशाचे पंतप्रधान चुप्पी साधून का बसले आहेत? असा सवाल करून सोनिया गांधी म्हणाल्या की, ज्यांनी संविधानाचे पावित्र्य टिकवलेले नाही, एका धर्माचे राज्य आणण्याचा प्रयत्न केला आहे. गरीब, आदिवासी महिलांना कुचलून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रशंसक बनलेले आहेत. या त्यांच्या खोटया भूमिकेबद्दल काँग्रेस पक्ष आवाज बुलंद केल्याशिवाय राहणार नाही.
राहुल गांधी गरजले
नागपूर- या देशात दोनच पक्ष आहेत. एक पक्ष आहे मनुवादाचा पुरस्कर्ता. जो जाती-धर्मात भेद करतो. जो माणसामाणसांत भेद करतो. ज्या मनुवादाने डॉ. आंबेडकरांना सार्वजनिक ठिकाणी पिण्याचे पाणी नाकारले तो मनुवाद आणि त्याच्याविरुद्ध दुसरा जो पक्ष आहे तो सर्व धर्माना समान माणणारा आणि सर्व जाती-धर्माना बरोबर घेऊन देश मोठा करणारा.
मनुवादाची कास धरणारा भाजपा आहे आणि त्याला विरोध करणारा काँग्रेस पक्ष आहे. या मनुवादासमोर काँग्रेस पक्ष कधीही झुकणार नाही, अशा शब्दांत आज १५ मिनिटांच्या भाषणात राहुल गांधी यांनी आक्रमकपणे प्रचंड काँग्रेसची भूमिका जाहीर केली. काँग्रेसला हवा तसा नेता राहुलजींच्या आजच्या तडाखेबंद भाषणाने मिळाल्याचे भाव प्रचंड गर्दीच्या चेह-यांवर जाणवत होते.
वेमुल्लाला कोणी मारले? असा थेट हल्ला करून राहुल गांधी म्हणाले की, विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नेमणुका आता सर्व ठिकाणी आरएसएसमार्फत होत आहेत. हे सरकार मोदी चालवत नसून, आरएसएस चालवत आहे. म्हणून मनुवादाचे राजकारण सुरू आहे.
भाजपामधील सदस्य मला सांगतात की, मोदींचे राजकारण एककल्ली आहे. हा पक्ष दलित व गरिबांच्या विरोधात आहे. संविधानाचे तुकडे करायचे आहेत. नवा मनुवाद त्यांना आणायचा आहे. मी मंगळवारी मुंबईला जात आहे आणि मुंबईच्या सराफा आंदोलनातील लोकांना भेटणार आहे. काँग्रेस सर्वाच्या मागे उभी आहे.