रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणी काँग्रेससह विरोधी पक्षांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणींवर निशाणा साधल्यानंतर भाजपाने आता रडीचा डाव सुरू केला आहे.
नवी दिल्ली – रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणी काँग्रेससह विरोधी पक्षांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणींवर निशाणा साधल्यानंतर भाजपाने आता रडीचा डाव सुरू केला आहे. या प्रकरणात इराणी यांनी खोटी माहिती पुरवल्याचा आरोप करत काँग्रेसने त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्याची तयारी चालवली असताना भाजपानेही मंगळवारी आगपाखड केली.
वेमुला प्रकरणात काँग्रेसचे लोकसभेतील सदस्य ज्योतिराजे शिंदे यांनी केंद्रीयमंत्री बंडारू दत्तात्रेय यांची बदनामी करणारे वक्तव्य केल्याचा आरोप करत भाजपानेही ज्योतिराजेंविरोधात हक्कभंग आणण्याची तयारी चालवली आहे. या प्रकरणी सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याने संसदेत प्रचंड गदारोळ झाला. स्मृती इराणी आणि केंद्रीय राज्यमंत्री रामशंकर कठेरिया यांच्या वक्तव्यावरून विरोधकांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केल्याने राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले.
जेएनयू आणि रोहित वेमुला प्रकरणांत स्मृती इराणी यांनी संपूर्ण देशवासीयांची दिशाभूल केली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांत त्यांनी दिशाभूल करणारे वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्याचा प्रस्ताव काँग्रेसकडून गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेत ठेवला. दुसरीकडे केंद्रीय राज्यमंत्री रामशंकर कठेरिया यांनी विहिंप नेत्याच्या हत्येवरून ‘मौत का बदला मौत’असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. हा मुद्दा विरोधकांनी लावून धरत कठेरिया यांच्या वक्तव्यावर स्तगन प्रस्ताव देण्यात आला. या प्रकरणात भाजपाने कठेरिया यांच्याकडे खुलासा मागवला असून त्यांना क्लिन चीट देण्याची तयारी चालवल्याचे बोलले जाते.
काँग्रेस नेत्या शैलजा कुमारी यांनी हरियाणातील मुरथलमधील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणी चौकशीची मागणी करताना राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याची टीका केली. त्यानंतर ‘वी वॉन्ट्स जस्टिस’च्या घोषणा देण्यात आल्याने संसदेत प्रचंड गदारोळ उडाला.