जगात सर्वाधिक मृत्यू हे तंबाखूच्या सेवनामुळे व त्यातही धूम्रपानामुळे होतात. त्यामुळे उद्भवणा-या आजारांचं प्रमाणही प्रचंड आहे. ८ मृत्यूंपैकी ६ मृत्यू हे केवळ तंबाखूच्या सेवनामुळे होतात, असं सरासरी प्रमाण आहे. दरवर्षी जवळपास ६० लाख लोक धूम्रपानाला बळी पडतात, २०३० पर्यंत हे प्रमाण ८० लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेतर्फे भारतात कार्यरत असलेल्या ‘ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सव्र्हे (global adult tobaco survey) २०१० ’ या संस्थेतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार वर्तवली जात आहे. तंबाखूतील निकोटिनच्या आहारी गेलेल्यांपैकी १० लाख तंबाखू खाणं, सिगारेट वा विडी ओढण्याला तर जवळपास पंधराशे जण तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन करायला चटावलेले असतात. खुद्द सिगारटेच्या पाकिटावर किंवा करण्यात येणा-या जाहिरातीतही ‘तंबाखूमुळे कर्करोग होऊ शकतो’, ही धोक्याची सूचना स्पष्ट शब्दात दिलेली असूनही त्याकडे दुर्लक्ष करणा-यांची संख्या प्रचंड आहे आणि त्यात दिवसेंदिवस भर पडतेय. परिणामी तोंडाचा आतील भाग, श्वसनमार्ग, अन्ननलिका, फुप्फुसं यांचा कर्करोग, क्षयरोग यांमुळे होणारे मृत्यू हे सध्याच्या काळातलं एक मोठं संकट ठरतंय. संपूर्ण भारतात सिगारेटपेक्षाही विडी ओढणा-यांचं प्रमाण जास्त आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यावर बंदी आहे. असं करताना कोणी आढळल्यास त्याला २०० रुपये दंड करण्याचा कायदा भारतात २००८ मध्ये अस्तित्वात आला. परंतु त्याचं पालन किती सक्तीने व काटेकोरपणे होतं, हे आपण आपल्या अवतीभवती पाहतो आणि नाईलाजास्तव अनुभवतोही. या कायद्यात सुधारणा करून दंडाची रक्कम २० हजार रुपये करण्यात यावी, असा प्रस्ताव केंद्रीय आरोग्य खात्याने नेमलेल्या समितीच्या अहवालात आहे. मात्र कायद्यात सुधारणा करून, दंडाची रक्कम वाढवल्याने भीतीपोटी तरी धूम्रपानाला आळा बसेल का, नाहक जाणारे बळी थांबतील का, धम्रपान न करणा-यांसाठी खरोखरंच ‘अच्छे दिन’ येतील का, या प्रश्नांची उकल करण्याचा हा प्रयत्न.
गेली ५० वर्ष माझे बाबा व नंतर मी ही पानाची गादी चालवत आहोत. इथे दैनंदिन आवश्यक गोष्टींसह सिगारेटही मिळते. इतक्या वर्षातलं सिगारेट ओढणा-यांचं प्रमाण पाहता, गेल्या काही वर्षापासून ते ५० टक्क्यांनी घटलं आहे. गिरण्या सुरू असताना गिरणी कामगार मोठय़ा संख्येनं तंबाखूचं सेवन करत असत, पण गिरणी बंद पडल्यामुळे गिरणी कामगार शहराबाहेर फेकला गेला आणि उरलेल्यांनी गावचा रस्ता धरला. त्यामुळे आता जवळपास कोणीही तंबाखू खात नाही, त्यामुळे तंबाखूची विक्री कधीच थांबली. पूर्वी गुमास्ता परवानाधारक वैश्य-वाणी समाज मुंबईत मोठय़ा संख्येनं पानगादी चालवत असे, पण तंबाखूचा, सिगारेटचा खप तसंच दैनंदिन वस्तू खरेदी करणारा कामगार वर्ग संपल्यामुळे त्यांना गाद्या बंद कराव्या लागल्या. गादीवर जे सिगारेट ओढायला येतात, त्यात तरुण वर्ग मोठय़ा प्रमाणात असतो. त्यात ‘चेन स्मोकिंग’ करणारे अगदी थोडे आढळतात. तरुणांना कॉलेजचं शिक्षण, येण्या-जाण्याचा खर्च, मोबाइलचा खर्च असे बरेच खर्च असतात. त्यात सिगारेटचा खर्च त्यांना परवडत नाही. रोज फक्त एक सिगारेट ते ओढतात. त्यांना सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणं, हा गुन्हा आहे, हेही माहीत नसतं. मग, अशा मुलांना दंड झाला, तर तो भरायला त्यांच्याकडे पैसे कुठून असणार? आज सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणा-याला २०० रुपये दंड आहे. पण तोच दंड २० हजार रुपये केला, तर त्यांना तो भरणं अशक्यच आहे. हल्ली लोकांचा पगार तरी २० हजार रुपये असतो का? शिवाय दंडाची रक्कम जास्त आकारून उलट आरोग्य खात्यालाच महसूल मिळेल, त्यातून लोकांना काहीच फायदा होणार नाही. तुम्ही पाहिलं तर आपल्या राज्य किंवा केंद्रीय मंत्रिमंडळातच सिगारेट ओढणा-या आणि तंबाखू खाणा-या मंत्र्यांची संख्या फार मोठी आहे. मग या मंत्र्यांनाही दंड होईल का? आज धूम्रपान आणि तंबाखूविरोधात मोठय़ा प्रमाणात जनजागृती निर्माण झाली आहे. त्यामुळे लोकांमध्ये सिगारेट पिणा-याचं प्रमाण पहिल्यापेक्षा जवळपास ४० टक्क्यांनी कमी झालं आहे, असा माझा अंदाज आहे, पण असं असूनही सिगारेट ओढणारी नवी पिढी तयार होतच असते. त्यामुळे सिगारेटच्या सुट्टय़ा विक्रीवर बंदी घातली किंवा दंडाची रक्कम २०० वरून २० हजारांवर नेली तरी त्यामुळे सिगारेट ओढणं थांबणार नाही. आताही लोक दंड म्हणून ५० रुपये देऊन आपली सुटका करून घेताना दिसतात, तर २० हजार रुपये दंड आकारण्याचा कायदा झाला, तर लोक थोडे जास्त पैसे देऊन सुटतील. लोकांची मानसिकता बदलावी, यासाठी सरकारने अधिक प्रभावीपणे जनजागृती केली पाहिजे. अलिकडे लोकांना स्वत:च्या आरोग्याची काळजी वाटू लागली आहे. पण तरीही सिगारेट ओढणारे सिगारेट सोडायला तयार नाहीत. – किरण किणी, सिगारेटविक्रेते, परळ
धूम्रपानबंदीचा दुहेरी फायदा होईल!
धूम्रपानावर बंदी आणण्याचा मुख्य उद्देश हा धूम्रपान न करणा-यांना फायदा व्हावा असा आहे. आपल्या कुटुंबाला आणि मुलांना त्रास होऊ नये म्हणून घरात धूम्रपान केलं जात नाही. त्यामुळे साहजिकच घराबाहेर म्हणजे ऑफिस, रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, रेस्टॉरंट या ठिकाणी धूम्रपान केलं जातं. पण याच्या परिणामांचा जे विचार करत नाहीत, त्यांच्या आरोग्यावर याचा निश्चितपणे परिणाम होतो. खरं म्हणजे सर्वानाच शुद्ध हवा मिळण्याचा अधिकार आहे, मात्र त्या अधिकारावरच त्यामुळे बंदी येते. दंड आकारल्याने त्यांना त्यांचा अधिकार मिळवून देणं अधिक सोपं होईल. खरं म्हणजे ही मोहीम साधारणत: २००८ पासून सुरू असून त्यानुसार धूम्रपान करण्याच्या प्रमाणात साधारणत: तीन टक्क्यांनी कपात झाल्या असल्याचं दिसून येतं. दंड आकारल्याने ही टक्केवारीत अजून घटेल. याचा धूम्रपान करणा-यांना आणि न करणा-यांना असा दुहेरी फायदा होईल. – डॉ. पंकज चतुर्वेदी, इएनटी, एचओडी, टाटा कॅन्सर हॉस्पिटल
औषधी सिगारेट हा पर्याय!
एका कॉलेजवयीन मुलाची आई या भूमिकेतून आपल्याकडचा कायदा काटेकोरपणे पाळला जाऊन जर सक्तीने दंड आकारला गेला तर सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर नियंत्रण येऊ शकेल, असं मला वाटतं. किंबहुना हे व्हायलाच हवं. ठिकठिकाणी कोणीही अगदी बेधडकपणे धूम्रपान करत असतं. कायद्याने बंदी असूनही त्याचं पालन कोणीही करत नसल्यानं त्याचा त्रास सरसकट सगळ्यांना सहन करावा लागतो. धूम्रपान मानवी आयुष्याच्या हानीला जितकं कारणीभूत आहे, तितकंच ते पर्यावरण आणि स्वच्छता या दोन्हींच्या ऱ्हासालाही कारणीभूत आहे. सार्वजनिक ठिकाणी वावर असलेल्या प्रत्येकालाच त्यातही विशेषत: लहान मुलं, गरोदर स्त्रिया, महिला, रुग्ण, वयोवृद्ध तसंच धडधाकट तरुण, मध्यमवयीन अशा सर्वानाच निष्कारण धूम्रपानातून निघणारा घातक धूर नाकातोंडावाटे शरीरात घ्यावा लागतो. या सगळ्याचं भान बाळगलं जाण्यासाठी तरी सक्तीने दंड आकारणं गरजेचं आहे. संबंधित सरकारी कर्मचारी यांनी या दंडवसूलीमध्ये कोणतीही पळवाट न शोधता, तो ठरलेल्या दंडाच्या रकमेनुसार सक्तीने आकारायला हवा. आताच्या घडीला २० हजार रुपये इतकी रक्कम दंड म्हणून भरणं हे नोकरदार माणसालाही अशक्य आहे. अनेकांचा तर पगारही इतका नसल्याने घरखर्च भागवताना पुरेवाट होते. मग दंड भरायला पैसे येणार कुठून? सिगारेट वा विडी ओढण्याची इतकीच जर हौस असेल किंवा घातक सिगारेटपासून आपल्या प्रियजनांना दूर ठेवायचं असेल तर ‘औषधी सिगारेट’ हा पर्याय उत्तम आहे. यासाठी एका स्वच्छ जाडसर कागदाची सुरळी करून त्यात ओवा भरून ती पेटवून ओढल्याने त्याचा धूर घशात, नाकात गेल्यास उलट तो उपयुक्त ठरेल. अशा प्रकारचं धूम्रपान केल्यास शरीरात साचलेला दूषित, घट्ट कफ शरीराबाहेर पडायला मदत होईल. आमच्या लहानपणी सर्दी, खोकला झाल्यावर अशाप्रकारची विडी तयार करून ती ओढायला दिली जायची. हल्लीच्या व्यसनाधीन तरुण पिढीनेही अशाप्रकारची औषधी सिगारेट ओढल्यास त्याचे स्वत:वरही आणि इतरांवरही दुष्परिणाम होण्याऐवजी नक्कीच उपयोग होईल. – प्रतिभा कोठूरकर, पालक
सरकार आणि तरुणांनी एकत्रितपणे प्रभावी चळवळ चालवावी!
धूम्रपानाचं प्रमाण व त्यामुळे होणा-या त्रासाचा श्वसनमार्गावर होणारा दुष्परिणाम हे आजच्या घडीला एका भयावह पातळीला जाऊन पोहोचलं आहे. प्रत्यक्ष धूम्रपान करणा-या(अॅक्टिव्ह स्मोकर्स)च्या तुलनेत अप्रत्यक्षपणे, नाईलाजास्तव हा विषारी धूर शरीरात जाणा-या सर्वसामान्य लोकांना(पॅसिव्ह स्मोकर्स) कर्करोगाचा धोका सर्वाधिक असतो, हे सिद्ध झालं असल्याचं नुकतंच माझ्या वाचनात आलं. भारतात क्षयरोग (टी.बी.)ग्रस्तांच्या प्रमाणातही खूप वाढ होत आहे. क्षयरोगामध्ये आधीच रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती खालावलेली असल्याने अशा अवस्थेत तो स्वत: धूम्रपान करत असेल किंवा धूम्रपान करणा-या व्यक्तीच्या सहवासात असेल तर त्याची तब्येत अधिक जलद गतीने ढासळते आणि मृत्यूही लवकर येऊ शकतो. कायद्यातल्या तरतूदी कडक करून दोनशे रुपयांऐवजी वीस हजार रुपये दंड आकारला गेल्यास त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही असू शकतात. समजा, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाला कठोर बंदी घातली गेल्यास धूम्रपानाच्या अधीन झालेली करणारी व्यक्ती घरीच बसून धूम्रपान करायला सुरुवात करू शकते. जे सार्वजनिक ठिकाणांवर धूम्रपान करण्यापेक्षाही ते दाटीवाटीनं असलेल्या वस्त्या, झोपडपट्टय़ा, घरं, बंदिस्त वा कोंदट वातावरणात अशा ठिकाणी करणं जास्त घातक आहे. कारण अशा ठिकाणी राहणा-यांचा राहणीमानानुसार आरोग्याचा दर्जा खालावलेला असल्याने क्षयरोगाचा संसर्ग जलद गतीने होण्याचं प्रमाण तुलनेनं जास्त असतं. ध्रूमपानाने क्षयरोगाव्यतिरिक्त न्यूमोनिया, ब्रॉँकायटिस, ब्रॉँकॅटेसिस, श्वसनमार्ग, घशापासून ते अन्ननलिकेपर्यंतच्या मार्गाचा कर्करोग होण्याची तीव्र शक्यता असते. अशा आजारांमुळे प्रतिकारशक्ती ढासळल्याने क्षयरोग होण्याचा सर्वाधिक धोका असतो. याबद्दल विविध माध्यमांतून जागृती होत असूनही व संभाव्य धोके दिसत असतानाही ताण-तणाव घालवण्यासाठी, टाइमपास वा चैन म्हणून धूम्रपान काही बंद होत नाही. आता तरुण मुली व महिलावर्गाचीही यात भर पडली आहे, जे येणा-या पुढील पिढीसाठी अत्यंत चिंताजनक आणि धोकादायक बाब आहे. यासाठी कायदा करून भलामोठा दंड जरूर आकारला गेला पाहिजे, पण सरकार आणि जास्तीत जास्त तरुणांनी एकत्र येऊन अशी मोहिमा वा प्रभावी चळवळ सुरू करायला हवी, ज्यातून व्यसनी आणि निव्र्यसनी असा प्रत्येकजण सकारात्मकतेने धूम्रपानाला दूर ठेवेल. – डॉ. राजेंद्र ननावरे, वैद्यकीय अधीक्षक, क्षयरोग रुग्णालय समूह-शिवडी, मुंबई
स्वत:वरच जाणिवपूर्वक निर्बंध घालायला सुरुवात करा!
दंडाची रक्कम २०० रुपये, २० रुपये नाहीतर २० हजार रुपये असू दे, तो अमलात आणला गेला पाहिजे. कारण हा कायदा आहे आणि तो पाळला जायलाच हवा. मी स्वत:देखील अनेकदा धूम्रपान न करण्याची विनंती करत असते. जिथे-जिथे मी शूटिंग करत असते, त्या ठिकाणी धूम्रपान न करण्याची विनंती मी आवर्जून करते. कारण कामाच्या ठिकाणी वा सार्वजनिक ठिकाणी बहुतेकांना ‘पॅसिव्ह स्मोकिंग’चा त्रास हा सहन करावा लागतो. शिवाय कोणालाही असलेली व्यसनाची आवड ती व्यक्ती स्वत:पुरती ठेवत असेल तर ठीक. समजा, कोणाला च्युइंगम खाण्याची आवड असेल, तर ती सर्वस्वी त्या व्यक्तीपर्यंत मर्यादित राहते. पण धूम्रपानाचं तसं नाही, कारण आवड जोपासणा-या व्यक्तीच्या आरोग्याच्या हानीसोबतच इतरांच आरोग्यही धोक्यात येतं. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी यावरच सर्वाधिक भर द्यायला हवा. बरं, सराईतपणे धूम्रपान करणा-यांना पकडायला आपल्या सरकारकडे पुरेसं मनुष्यबळ आहे का, याचा विचार करता, अशा व्यक्तींवर कटाक्षानं लक्ष कोण ठेवणार, हा प्रश्न निर्माण होतो. शिवाय आपण सुजाण नागरिक म्हणून कर्तव्य बजावतानाही अनेक मर्यादा तर येतात आणि शेवटी आपण कुठे-कुठे पुरे पडणार, हाही प्रश्न आहेच. सार्वजनिक ठिकाणी ‘मला सिगारेट ओढताना कोणी बघणार नाही’ किंवा ‘मी पोलिसांची नजर चुकवून कशाप्रकारे धूम्रपान करू शकेन’, इतका स्वार्थी विचार करून भागणार नाही. तर खरोखरंच माझ्या धूम्रपान करण्यानं माझ्यासह अनेकांचं आयुष्य मी धोक्यात घालतंय आणि हा गुन्हा असल्याची जाणीव होऊन कुठेतरी स्वत:वर निर्बंध घालायला सुरुवात करणं, हेच धूम्रपान नियंत्रित आणण्याच्या दिशेनं यशस्वी पाऊल ठरू शकेल. – सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री
सक्तीने दंड आकारावा!
धूम्रपानावर जो दंड आकाराला जात आहे, तो जर अतिशय काटेकोरपणे वसूल केला गेला तर धूम्रपानाचं प्रमाण नक्कीच कमी होऊ शकेल. कारण जेव्हा खिशातून अधिक पैसे विनाकारण जात असल्याचं लक्षात आलं तर साहजिकच धूम्रपानाला आळा बसेल. पण हे सगळं प्रत्यक्ष कृतीत उतरायला किती वेळ लागेल, हे सांगता येत नाही. कारण व्यसन लागलं की, त्यातून पूर्णत: बाहेर पडायला काही कालावधी लागणारच. व्यसन करणारी माणसं कित्येक वर्षापासून त्याच्या आहारी गेलेली असतात. यातून पूर्णपणे बाहेर पडायला वेळ द्यायलाच हवा, पण सक्तीनं दंड आकारला गेल्यास धूम्रपानाचं प्रमाण नक्कीच कमी होऊ शकेल. – रमेश चव्हाण, ज्येष्ठ नागरिक
दंड असायलाच हवा!
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणा-यांवर दंड आकारला तर जे धूम्रपान करत नाहीत, त्यांना विनाकारण होणारा त्रास कमी होईल. विशेषत: लहान मुलं, महिला आणि वृद्धांना इतरांच्या धूम्रपानाचा निष्कारण त्रास होत असतो. फक्त सिगारेट ओढणा-यांनाच दंड बसू नये, तर रस्त्यावर सिगारेटची अर्धवट जळलेली थोटकं टाकणा-यांना, रिकामी पाकीटं रस्त्यावर टाकणा-यांना, थुंकणा-यांना दंड बसायलाच हवा. असं केल तरंच धूम्रपानाचं प्रमाण कमी होईल. – पद्मश्री राव, प्रमुख, ब्रॅँड अॅडिक्शन
संकलन
प्रियांका चव्हाण
शब्दांकन
अदिती पराडकर, श्रद्धा कदम पाटकर,