दरवर्षी येणारी १४ नोव्हेंबर ही तारीख भारतीयांच्या लक्षात असते ती भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आणि त्यानिमित्त होणारा बालदिन.
दरवर्षी येणारी १४ नोव्हेंबर ही तारीख भारतीयांच्या लक्षात असते ती भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आणि त्यानिमित्त होणारा बालदिन. मात्र येत्या गुरुवारी ही तारीख (१४ नोव्हेंबर) निराळ्या विक्रमाची नोंद करणारी ठरणार आहे. त्या दिवशी आपल्या सर्वाचा लाडका सचिन तेंडुलकर त्याची वैयक्तिक द्विशतकी कसोटी मुंबईत घरच्या मैदानावर म्हणजे वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहे. ते पाहता मुंबईच्या क्रिकेट रसिकांसाठी दुग्धशर्करा योगच आहे. त्या दिवशी त्या कसोटीचे तिकीट मिळालेले सकाळपासून वानखेडेकडे वळतील, याउलट तिकीट न मिळालेले घरच्या टीव्हीसमोर ठिय्या मांडून बसतील. काही जण दुकानांच्या टीव्हीसमोर गर्दी करतील तर काही जण इंटरनेटवर लढत पाहण्यात समाधान मानतील. हा योगच दुर्मीळ आहे, कारण सचिन आपली शेवटची कसोटी खेळून निवृत्त होत आहे आणि तीही विक्रमी द्विशतकी.
भारतीय क्रिकेट जगतात विक्रम करणा-या क्रिकेटपटूंची एक परंपरा आहे. त्यात दुलीपसिंह, रणजीतसिंह, सी. के. नायडू, मुश्ताक अली, विजय र्मचट, विजय हजारे, दि. ब. देवधर, लाला अमरनाथ, पॉली उम्रीगर, विजय मांजरेकर, अजित वाडेकर यांच्यासारखे फलंदाज तर सी. एस. नायडू, विनू मंकड, दत्तू शेखर, कपिलदेव आणि अनिल कुंबळे यांच्यासारखे गोलंदाज आहेत. त्यापैकी काही क्रिकेटपटूंच्या नावाने स्पर्धा आयोजित करून भारतीय क्रिकेट बोर्डाने त्यांना गौरवले आहे. अर्थात, त्यात फलंदाजांचे वर्चस्व दिसून येते. मात्र जागतिक विक्रम करणा-या क्रिकेटपटूंचा उदय झाला तो १९७१मध्ये. अशा फलंदाजांमध्ये अग्रणी फलंदाज सुनील गावस्कर. ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ ही म्हण सार्थ ठरवणा-या या सुनीलची कारकीर्द सुरू झाली ती भारताच्या वेस्ट इंडिज दौ-यात. त्या मालिकेत त्याने चार कसोटींत एका द्विशतकासह चार शतके ठोकून ७७४ धावा करण्याचा विक्रम केला. त्यानंतर त्याने एकापाठोपाठ एक शतके ठोकली. त्याने १९८३मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या नवी दिल्लीतील कसोटीत झळकवलेले शतक ऑस्ट्रेलियाच्या डॉन ब्रॅडमनच्या २९ शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करणारे ठरले. त्याच मालिकेत गावस्करने मद्रास (आताचे चेन्नई) येथील कसोटीत ३०वे शतक करून तो विक्रम मोडला. इतकेच नव्हे, आपल्या १७ वर्षाच्या कारकिर्दीत १२५ कसोटी, त्यात १० हजारांवर धावा, ३४ शतके हा तिहेरी विक्रम केला. हा त्याचा विक्रम कोणी मोडणार नाही, असे भाकीत बरेच जण करीत होते. मात्र विक्रम हे मोडण्यासाठीच असतात. ते पाहता रिकी पॉटिंग, राहुल द्रविड, स्टीव्ह वॉ यांच्यासारख्यांनी गावस्करचा तो विक्रम पार केला.
भारतीय क्रिकेट क्षितिजावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर १९८९मध्ये एक नवा तारा चमकू लागला तोच हा सचिन तेंडुलकर. लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे सचिनची बॅटही शालेय क्रिकेटपासून तळपू लागली होती. शालेय स्पर्धेत वैयक्तिक त्रिशतक आणि विनोद कांबळीबरोबर ६०० धावांची भागीदारी ही त्याची कामगिरी लक्षवेधी ठरली. त्यापाठोपाठ धावांचा पाऊस पाडल्यामुळे १९८९मध्ये वयाच्या १६व्या वर्षीच पाकिस्तानच्या दौ-यासाठी त्याची निवड झाली. एवढय़ा कोवळय़ा वयात आपल्या पहिल्या कसोटीत इम्रानसारख्या जलदगती गोलंदाजाचा चेंडू लागल्यानंतरसुद्धा आक्रमकतेने आणि धैर्याने त्याने धावा केल्या. त्यावरून त्याच्या खेळाच्या दर्जाची प्रचिती आली. नंतरच्या कसोटीसह सर्व सामन्यांत धावा करताना आणि शतके ठोकताना ‘आक्रमण हाच बचाव’ हे तत्त्व तो अवलंबत असे. उगवत्या सूर्याची किरणे ही कोमल असतात, पण ती प्रखर होताना असहय़ होतात. मात्र सचिनची खेळी प्रखरच असते. त्यामुळे जगातील सर्व गोलंदाजांची त्याने केलेली धुलाई त्यांची झोप उडवत असे. काही वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवरील सराव सामन्यात चौकार आणि षटकार ठोकून सचिनने केलेले द्विशतक आजही स्मरणात राहते. कारण त्या वेळी शेन वॉर्नच्या गोलंदाजीची धूळधाण उडवून सचिनने वॉर्नला गोलंदाजी विसरायला लावली होती. ती खेळी पाहणारे प्रेक्षक धन्य झाले नसतील तर नवल. इतके असूनसुद्धा प्रतिस्पर्धी खेळाडू त्याच्यावर प्रेम करतात आणि त्याचा आदर करतात. ते पाहता तो अजातशत्रू आहे. गावस्कर आणि सचिन यांची देहयष्टी जरी छोटी असली तरी गावस्करला ‘लिटल मास्टर’ असे संबोधतात, तर सचिनला त्याच्या खेळीमुळे ‘मास्टरब्लास्टर’ म्हणतात. सचिनच्या यशाची कमान शतकामागून शतके करत उंचावत गेली आणि आता शिखरावर पोहोचणार आहे ती येत्या १४ नोव्हेंबरला. सचिनच्या कसोटीतील २००व्या टप्प्यात कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांत १०० शतके, तसेच सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय आणि प्रथम दर्जाच्या सामन्यांत मिळून पन्नास हजारांवर धावा. त्याच्या या विक्रमांच्या जवळपास कोणी पोहोचेल अशी शक्यता वाटत नाही. मोडणे तर दूरच राहो कारण सचिनने हे विक्रम आपल्या २४ वर्षाच्या कारकिर्दीत केले आहेत. मात्र हल्लीच्या क्रिकेटपटूंची कारकीर्द इतकी टिकेल का, आणि त्यात सचिनसारखे सातत्य राहील का, हा प्रश्न सदैव माझ्या मनात येतो. दुसरी याची खासियत म्हणजे क्रिकेटच्या पुस्तकात न बसणारे आणि स्वत:च्या शैलीत सुधारणा करून आत्मसात केलेले अनेकविध फटके. सुधारलेला स्वीपचा फटका, (गोलंदाजास चकित व नामोहरम करणारे) उसळत्या चेंडूस उंच बॅट करून थर्ड मॅनच्या डोक्यावरून सीमेपलीकडे मारण्याचे फटके प्रेक्षकांना आनंद देतात. त्यामुळेच सचिनची खेळी जास्त आकर्षक वाटते. अशा या विक्रमवीर सचिनच्या कसोटी आणि प्रथम दर्जाच्या सामन्यातील खेळी जवळून पाहण्याचा योग आला नसला तरी त्याच्या काही मोजक्या आठवणी लिहिण्याचा मोह मला आवरत नाही.
बहुधा १९९०-९१ साल असावे. तारापूर येथील नवीन क्रिकेट मैदानाच्या उद्घाटनानिमित्त एका महोत्सवी सामन्यात गावस्कर, वाडेकर, वेंगसरकर, सोलकर, पारकर, अझरुद्दीन यांच्यासह कोवळा सचिनही खेळत होता. त्या वेळी पंच म्हणून सचिनची ८० धावांची खेळी जवळून पाहण्यास मिळाली. त्याचे चौकार, षटकार पाहून सर्व जण थक्कच झाले. तसेच त्याने मारलेला एक स्ट्रेट ड्राइव्ह माझ्या जवळून इतका गेला की समोर यष्टय़ा असतानासुद्धा मी उडी मारली मात्र तोपर्यंत चेंडू सीमेपार गेला होता. तेव्हा त्याच्या फटक्याची तीव्रता जाणवली. कपिलदेवच्या एका उसळत्या चेंडूवर त्याने मारलेला हूक सीमारेषा पलीकडे असलेल्या शामियानावरून गेल्यावर मी चकित झालो. पण नॉनस्ट्रायकर असलेला अझरुद्दीन थक्क झाला आणि त्याने सचिनला ‘‘ए छोटे, ये शॉर्ट आर्म पुल के लिये लाँग आर्म कहासे लाया,’’ असे म्हणून त्याच्या फटक्याला दाद दिली.
एक दुसरी आठवण १९९२ सालची. कोल्हापूरला सचिनचे गुरू रमाकांत आचरेकर यांच्या गौरव सामन्यातील २५ एप्रिल या दिवशीची. तेथे आदल्या दिवशी पाऊस पडल्यामुळे सामना रद्द होण्याची शक्यता होती. तरीसुद्धा सचिनसाठी तीस हजारांवर प्रेक्षक सकाळपासून ठाण मांडून बसले होते. १० वाजता सचिन आणि अझरुद्दीन खेळपट्टीवर गेल्यावर प्रेक्षक खूश झाले. बहुसंख्य प्रेक्षकांची निराशा होऊ नये म्हणून सचिन आणि अझरुद्दीनने आम्हा पंचांना मैदानात भुसा आणि ताडपत्री टाकून सामना खेळवण्याची विनंती केली. हे परिश्रम केल्यावर प्रत्येकी २५ षटकांचा सामना खेळण्याचे ठरले. कडक उन्हानंतर १२.१५ वाजता सामना सुरू होण्याचे जाहीर केल्यावर प्रेक्षकांनी जल्लोष केला. अझरुद्दीन संघाने २५ षटकांत २२० धावा केल्यावर सचिनने १० चौकार आणि ६ षटकार झळकवत झंझावाती शतक साजरे केले. त्याच्या फटकेबाजीमुळे सचिन संघाने २२१ धावांचे लक्ष २१ षटकांतच पार केले. सचिनने शतकासह विजयावरही शिक्कामोर्तब षटकाराने केला तेव्हा प्रेक्षकांनी त्यांचे फेटे, टोप्या, रुमाल आणि काहींनी छत्र्या उंच करून सचिनचा जयजयकार केला. तेव्हा मला कोल्हापूरच्या कुस्त्यांच्या फडाची आठवण झाली. त्याचप्रमाणे सकाळी सातपासून तिष्ठत असलेल्या प्रेक्षकांना सचिनचा खेळ पाहण्याचे भाग्य लाभले हे आम्हाला समाधान होते.
आणखी एक सदैव लक्षात राहण्यासारखा प्रसंग म्हणजे २५ एप्रिल १९९३ रोजी नवी मुंबई येथे झालेला माझा गौरवनिधी सामना. त्या सामन्यात गावस्कर आणि प्रकाश केळकर यांच्या पुढाकाराने गावस्करसह वेंगसरकर, वाडेकर, सोलकर, पारकर, चंद्रकांत पंडित, बलविंदर संधू, करसन घावरी, बडोद्याचे अंशुमन गायकवाड, किरण मोरे आणि बंगळूरुचे गुंडाप्पा विश्वनाथ हे खेळले. तरुण क्रिकेटपटू म्हणून सचिन, विनोद कांबळी, अमोल मुजुमदार यांनाही सहभागी केले गेले होते. या सामन्यात फारसा वाव मिळाला नाही, पण मी त्याच्याशी तंबूमध्ये बोलत असताना त्याने फोटोग्राफरला बोलावून माझ्याबरोबर एक फोटो काढून घेतला आणि मला द्यायला लावला. आदल्या दिवशीच्या (२४ एप्रिल) त्याच्या वाढदिवसाची भेट असू दे, असे त्याने म्हटल्यावर मला गहिवरून आले. तो फोटो मी जपून ठेवला आहे.
आता शेवटचा एक प्रसंग सांगतो. शिवाजी पार्क जिमखान्यातर्फे विजय मांजरेकर एकेरी विकेट क्रिकेट स्पर्धा सुरू झाली आणि पहिली काही वर्षे सचिन त्यात सहभागी होत असे. त्या वेळी तो विजेतेपद मिळवल्यावर बक्षिसाची रक्कम क्रिकेटपटूंमध्येच वाटून टाकत असे. केवढा हा दिलदारपणा. अशाच एका स्पर्धेच्या दिवशी दोन व्यक्ती माझ्याकडे आल्या आणि सचिनला भेटायचे आहे तरी अध्यक्ष म्हणून परवानगी द्या, असे त्यांनी म्हटले. त्याबद्दल कारण विचारले असता, चेंबूर येथे दरवर्षी दिग्दर्शक राज कपूर यांच्या नावाने रात्री टेनिस चेंडूची स्पर्धा खेळवण्यात येते, तर त्यामध्ये सचिनला आमंत्रण देण्यासाठी आलो आहे असे त्यांनी सांगितले. त्यावर मी सचिनकडे जाऊन त्याला वस्तुस्थिती सांगितली. मात्र त्याने मला नकार देण्यास सांगितले. कारण त्याला अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये खेळण्याचा सराव नव्हता आणि मुख्य म्हणजे तो दोन आठवडय़ांत विवाहबद्ध होणार होता. ‘‘तुम्ही ज्येष्ठ आणि अध्यक्ष असल्यामुळे कृपा करून त्यांची समजूत घाला व माझा नाइलाज कळवा,’’ अशी त्याने मला विनंती केली. त्या दोघांना मी सचिनचा निरोप दिला आणि ते निराश होऊन परत गेले. सचिनला पुन्हा आपण हे सांगण्यासाठी गेलो तेव्हा सचिनने आभार मानले आणि लग्नाचे आमंत्रण दिले. ‘‘माझ्या लग्नाला मी मोजक्या आणि जवळच्या लोकांनाच आमंत्रण करणार आहे आणि तुम्हालाही पाठवणार आहे, तरी जरूर या,’’ असे त्याने सांगितले. त्याच्या लग्नाला मी आणि रमाकांत देसाई असे दोघे गेलो. त्या वेळी तेथे मोजकेच आमंत्रित होते. सचिनला भेटायला स्टेजवर गेल्यावर त्याने हसतमुखाने हस्तांदोलन केले आणि सौ. व आप्तेष्टांशी आमची ओळख करून दिली. ‘‘हे भारताचे उत्कृष्ट जलदगती गोलंदाज व हे उत्कृष्ट पंच’’ हे त्याचे त्या वेळी उद्गार होते. ते ऐकून मी चकित झालो आणि ते माझ्या अजूनही स्मरणात आहे. अशा या विक्रमवीर सचिनच्या आठवणी लिहिता लिहिता मला एक उत्स्फूर्त कविता सुचली.
फलंदाजीला जाण्यासाठी होई तयार।
मैदानातही प्रवेश करता जाई वर नजर।।
खेळपट्टीवर सज्जही होता पाही चौफेर।
बॅट परजूनी समोरच्यांचा घेण्या समाचार।।
फटक्यांमधूनी पाहूनी त्याचे चौकार, षटकार।
दादही देण्या रसिक करती टाळ्यांचा गजर॥
धावा करून गुंफित जातो शतकांचे धागे।
सिंहावलोकन करताना हा मान फिरवी मागे।।
शतकही आपुले पूर्ण होता वर जाई मान।
देव आणि वडिलांना जणू हा करितो वंदन।।
अंतिम कसोटीत हा जेव्हा प्रवेश करणार।
उभे राहूनी देऊ सलामी, करू जयजयकार।।
शेवटी सचिनला अखेरच्या द्विशतकी कसोटीसाठी आणि त्याच्या उर्वरित आयुष्यासाठी शुभेच्छा देताना मनात विचार येतो की, गावस्कर हा आद्य विक्रमादित्य तर सचिनही सध्या विक्रमादित्य. आता उत्तरेकडे ‘हनुमान चालिसा’ प्रसिद्ध आहे, तर पश्चिमेकडे महाराष्ट्रातही कुणीतरी सचिनच्या ४०व्या वर्षी ‘सचिन चालिसा’ प्रसिद्ध करील का?