सागरगोटे हा विशेषकरून मुलींचा खेळ म्हणून ओळखला जातो. यामध्ये दोन किंवा त्याहीपेक्षा अधिक मुली खेळू शकतात. या खेळासाठी लागणारे सागरगोटे एका झाडाला येतात.
सागरगोटे हा विशेषकरून मुलींचा खेळ म्हणून ओळखला जातो. यामध्ये दोन किंवा त्याहीपेक्षा अधिक मुली खेळू शकतात. या खेळासाठी लागणारे सागरगोटे एका झाडाला येतात. पूर्वी हे बाजारात विकत मिळायचे. आता त्याऐवजी वाळूतील सारख्याच आकाराचे गोलाकार गुळगुळीत बोराएवढे दगड वापरले जातात. खेळ खेळताना समोरासमोर बसायचं असतं. खेळणा-याने एका हाताने पाची सागरगोटे जमिनीवर पसरवून टाकावे. त्यानंतर एक सागरगोटा उंच हवेत उडवून तो खाली येण्याच्या आत जमिनीवर असणारा दुसरा सागरगोटा उचलावा आणि उडवलेला सागरगोटा झेलावा, असंच पुढे झेलत उचलत जावे. उचलताना किंवा झेलताना सागरगोटा खाली पडला तर डाव गेला.
यामध्ये पहिल्या डावाला एरखई म्हणतात, दुस-या डावाला दुरखई दुस-या डावात सागरगोटा उंच फेकल्यावर खालील दोन सागरगोटे उचलायचे असतात. असंच पुढच्या डावांमध्ये सागरगोटय़ांची संख्या वाढवत जायची असते. नंतर पुढच्या फेरीत ‘उपली सुपली’ करायची असते. यामध्ये सगळे सागरगोटे एकत्र उडवायचे आणि हाताची उपली करून झेलायचं. पहिल्यांदा एकच हात उलटा करायचा नंतर दोन्ही हात. पाच खडे घेतले असल्यास प्रत्येकी पाच वेळा असं कारायचं. तिस-या फेरीत ‘चिमणी कोंबडय़ांची चोच’ करायची म्हणजे दोन्ही हाताची बोटं एकमेकांत गुंफून अडकवायची आणि फक्त दोन्ही हाताचं पहिलं बोट सोडावं. त्या बोटांनी खाली टाकलेले खडे एक एक करून ओंजळीत टाकायचे. सर्व खडे टाकून होईपर्यंत एकही सागरगोटा खाली पडता कामा नये.
चौथ्या फेरीत हंडी चढवायची असते. म्हणजेच पाच खडय़ांपैकी दोन दोन खडे जोडून जमिनीवर ठेवायचे व पाचवा खडा उंच फेकून, दोन खडय़ांची जोडी उचलायची व वरचा खडा झेलायचा नंतर परत एक खडा वर फेकून जमिनीवरची दुसरी जोडी उचलायची व पहिली जोडी जमिनीवर ठेवायची. असं लागोपाठ करत राहावं म्हणजे तो खेळाडू जिंकतो. एरखई-दुरखई करताना डाव गेल्यावर दुस-याला खेळू द्यायचं. पुन्हा आपला नंबर आला की पुढचा डाव खेळावा. ज्याच्या लवकर फे-या पूर्ण होतील तो जिंकतो.