घराबाहेर पडल्याबरोबर क्षणाक्षणाला तडजोड करत माणूस जगत असतो. भूक लागली म्हणून काहीही खावं लागतंच. वेगवेगळया वातावरणात राहावं लागतं. धूळ भरल्या शहरात वावरावं लागतं. आणि मग कुठेतरी अॅलर्जी गाठते. ती समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण तिचा संबंध हा दैनंदिन जीवनाशी आहे. अॅलर्जी असणं ही बाब साधी वाटत असली तरी ती शरीराला घातक ठरू शकते.
एखादी न मानवणारी गोष्ट आपल्या शरीराच्या संपर्कात आली तर शरीराची प्रतिकारशक्ती त्या वस्तूला बाहेर काढण्यासाठी म्हणून जे काही प्रयत्न करते, त्याचं निदर्शक म्हणजे अॅलर्जी. सूर्य आणि सूर्याच्या खाली धूळ, धूर, धुकं, धुरकं यांसारखे जेवढे काही पदार्थ आहेत त्या सर्व गोष्टींनी अॅलर्जी होते.
अॅलर्जीचे प्रकार
- ज्या ज्या अवयवांवर अॅलर्जीचा प्रादुर्भाव झालेला आहे त्याप्रमाणे अॅलर्जी होते.
- नाकाला अॅलर्जीचा प्रादुर्भाव झाला तर नाक गळतं. सर्दी होते.
- फुफ्फुसं आणि श्वासनलिकेला अॅलर्जीची लागणं झाली तर श्वास घेताना त्रास होतो. दम्यासारख्या व्याधी जडतात. त्वचेवर अॅलर्जी आली तर तिच्यावर मोठमोठया प्रकारचे चट्टे येतात. पुरळ येते. चट्टे येतात. खाज सुटते. काही वेळा इसब येतो. त्वचा जाड होते. कधी कधी पांढरे, काळे तसंच लाल रंगाचे डागही येतात.
अॅलर्जीची कारणं :
- अनुवंशिकता.
- सूर्यप्रकाश.
- सेंट, परफ्युर्मस, पावडर, मेकअपची उत्पादनं.
- प्लास्टिक, चामडी, रबरी पादत्राणं
- फुलं, परागकण.
- लोकरीचे नाहीतर सिंथेटिक किंवा पॉलिएस्टर या कापड प्रकारात मोडणारे कपडे.
- दही, ताक, इडली डोसा, बंगाली मिठाई, माव्याचे पदार्थ, दुधासारखे पदार्थ, शेंगदाणे, चीज पनीर यांसारखे प्रथिनयुक्त पदार्थ.
- सॅनिटरी पॅड्स, नॅपकिन, डायपर्स, यांच्यामुळेही अॅलर्जी होऊ शकतात.
- धातूच्या वस्तू.
- चायनीज तसंच लोकरीची खेळणी.
- रंग.
- इंग्रजी पद्धतीचे बाथरूम्स, कमोड्स.
- अतिस्वच्छता हेही अॅलर्जीचं कारण असू शकतं. कारण त्यामुळे शरीरातील उपकारक जिवाणूंची संख्या कमी होते.
कोणाला कशाची अॅलर्जी होऊ शकेल?
- लहान मुलं: डायपर्सची, चायनीज खेळणी, लोकरी वस्त तसंच खेळणी
- शाळेत जाणारी मुलं: खडू, मैदानातील माती, चप्पला.
- नोकरदार मंडळी : धातू, रबर, परफ्युम्स, सौंदर्यप्रसाधनं.
- गृहिणी: धूर, धुळ, धातू तसंच कांदा, लसूण आणि टोमॅटो यांसारख्या खाण्याच्या वस्तू.
- कष्टकरी वर्गातील मंडळी : सिमेंट, विटा, माती, रबर.
- वृद्धमंडळी: लोखंडी काठया, रबर, फुलं, देवपूजेचं साहित्य, मफलर, स्वेटर.याशिवाय या सर्वाना खाद्यपदार्थातूनही अॅलर्जी होऊ शकते.
कोणत्या ऋतूमध्ये वाढतं?
- अॅलर्जीचं प्रमाण पावसाळयापेक्षा उष्ण, कोरडय़ा तसंच दमट हवामानात वाढतं. थंडीत आणि उन्हाळयातही वाढतं.
अॅलर्जी टाळण्यासाठी आपल्या आपल्याला कुठल्या पदार्थाची अॅलर्जी आहे याचं बाराकाईने निरीक्षण करावं. त्या पदार्थाचा संपर्क टाळावा. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.