समाज हा अनेक घटकांचा मिळून होतो. वेगवेगळया क्षेत्रातल्या लोकांच्या एकत्रित सहभागाने या समाजाचा विकास होतो. आपल्यावर या समाजाची काही जबाबदारी आहे असं मानणारे मात्र दुर्दैवाने फार कमी लोक आढळून येत असतात. भारतात त्यातही कलाकारांना तर आपण समाजापेक्षा नेहमीच वेगळे आहोत, असं वाटत असतं.
समाज हा अनेक घटकांचा मिळून होतो. वेगवेगळया क्षेत्रातल्या लोकांच्या एकत्रित सहभागाने या समाजाचा विकास होतो. आपल्यावर या समाजाची काही जबाबदारी आहे असं मानणारे मात्र दुर्दैवाने फार कमी लोक आढळून येत असतात. भारतात त्यातही कलाकारांना तर आपण समाजापेक्षा नेहमीच वेगळे आहोत, असं वाटत असतं.
समाजाने त्यांच्यावर भरभरून प्रेम करायचे आणि त्यांनी समाजापासून दूर पळायचे अशा काहीशा विचित्र कोंडीत हे कलाकार अडकलेले असतात. मात्र काही कलाकार यालाही अपवाद असतात. आपलं काम अगदी चांगल्याप्रकारे करत असतानाच समाजाचीही काळजी त्यांना असते. त्याविषयी संवेदना असते. आपण समाजासाठी काही ना काही करू शकू याचाही विचार त्यांच्या मनात असतो.
महाराष्ट्राचं एक भाग्य असं आहे की, आपल्याकडे अशा प्रकारे समाजाचं ऋण मानणा-या कलाकारांची एक मोठी फळी आहे. त्यांची या समाजाशी चांगलीच नाळ जुळलेली आहे. आपल्या भुतकाळाचं त्यांना भान आहे. आपणही इतर लोकांप्रमाणेच एक आहोत याची ते जाणीव तर ठेवतातच ठेवतात, त्याचबरोबर आपल्याला मिळालेले यशही या समाजाची देणगी आहे याचीही जाणीव त्यांच्या मनात असते. अशाच प्रकारचा एक कलाकार म्हणजे मकरंद अनासपुरे.
यावर्षी राज्यात दुर्दैवाने कमी पाऊस पडला. त्यामुळे महाराष्ट्रातल्या काही भागांत पाण्याचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला. या राज्याची शेतीही या पावसामुळे व इतर कारणांमुळे काहीशी धोक्यात आली. त्याचा फटका या राज्यातल्या गरीब शेतक-यांना बसला. त्यामुळे पावसाच्या सुरुवातीच्या काळातच खासकरून मराठवाडयात शेतक-यांच्या आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ झाली. या बातम्या अनेकांनी ऐकल्या. ज्यांनी शेतक-यांसाठी या आधीच काही ठोस उपाययोजना करायला हव्या होत्या त्यांनी या शेतक-यांसाठी आंदोलन करण्याचा अभिनय केला.
मात्र नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे या अभिनेत्यांनी मात्र या शेतक-यांचा प्रश्न व तो सोडवण्यासाठी काय करता येईल याची एक योजनाच तयार केली. यासाठी या दोघांनी मिळून नाम फाऊंडेशनची स्थापना केली. या त्यांच्या फाऊंडेशनला लोकांनीही चांगलाच प्रतिसाद दिला. काही दिवसांमध्येच त्यांच्याकडे जवळ जवळ सात कोटी रुपये जमा झाले.
मकरंद हा स्वत:च मराठवाडयाचा. अभिनय क्षेत्रातही तो लोकांमधून आला. महाविद्यालयीन जीवनात त्याने गावोगावी जाऊन अनेक पथनाटय़े केली आहेत. त्यामुळे तिथल्या सर्वसामान्य लोकांशी, शेतक-यांशी त्याची एक खास अशी जवळीक आहे. त्यांचे प्रश्न त्याला माहीत आहेत.
एक संवेदनशील व्यक्ती म्हणून त्यांच्या भल्यासाठी काय करता येईल याचाही विचार तो करतो. त्यांच्या दैनंदिन समस्या, त्यांची होणारी पिळवणूक, तिथली विभिन्न राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थितीची त्याला चांगलीच जाण आहे. त्याचबरोबर लहानपणापासूनच या लोकांसाठी आपण काय करू शकतो असा विचार करणारा तो एक युवक असल्यामुळे यावेळी जेव्हा तिथली परिस्थिती भीषण बनली तेव्हा मकरंद तिथे धाऊन गेला.
या आधीही मराठवाडयाचा काही भाग हा कायम दुष्काळी म्हणूनच गणला गेला आहे. त्या ठिकाणचं पर्जन्यमानही फार कमी आहे. आतापर्यंत इथल्या पाणी प्रश्नावर म्हणावं तितक्या वेगाने व विचाराने काम झालेले नाही, असं इथल्या लोकांचं मत आहे. त्याचा फटका इथल्या शेतक-यांना बसत असतो. त्यांना अनेकदा शासनाच्या माध्यमातून मदत केली जाते. सरकारी अनास्थेमुळे व इतर अनेक कारणांमुळे ही मदत योग्य त्या शेतक-यांपर्यंत पोहोचत नाही, असा अनुभव आहे.
केवळ पाऊस हा एकच प्रश्न शेतक-यांपुढचा नसून मालाला योग्य भान न मिळणे, तयार उत्पादन खरेदी करण्यात दलालांची होणारी अरेरावी, निकृष्ट प्रतीचं बियाणं व त्याची विक्री करणारी व्यवस्था या व इतर अनेक कारणांमुळे यातल्या अनेक शेतक-यांनी आत्महत्येसारखा गंभीर मार्ग निवडला आहे. या त्यांच्या आत्महत्यांनी या दोन्ही कलाकारांना विचलित केलं.
आपल्याला मिळणा-या अर्थातला काही भाग तर त्यांनी यासाठी दिलाच दिला, त्याचबरोबर आपल्या प्रसिद्धीचा व या दोन्ही कलाकारांकडे असलेल्या व्यवस्थापन कौशल्याचाही फायदा त्यांनी या शेतक-यांना मिळवून दिला. त्यांना केवळ आर्थिक मदत दिली की आपली जबाबदारी संपली अशा पद्धतीने राहण्यापेक्षा, त्यांच्यात जगण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्यही त्यांनी दिले.
लोकांना आजकाल कोणतीही आर्थिक मदत करताना ती करणा-या यंत्रणेवरचा विश्वास कमी झाला आहे. त्यांच्याकडून हव्या त्या प्रमाणात पारदर्शिकताही जपली जात नाही. या सा-या गोष्टींचा विचार करून या दोघांनी आपल्या नाम फाऊंडेशनची कार्यप्रणाली निर्माण केली आहे. जी अधिक आश्वासक अशी आहे. त्यामुळेच की काय लोकांनी अगदी रांगा लाऊनही त्यांना देणग्या दिल्या. आपण देत असलेल्या पैशांचा ही मंडळी अगदी योग्य असा विनियोग करतील असा विश्वास या दोघांनी निर्माण केला जे फार महत्त्वाचे आहे.
मकरंद अनासपुरे यांनी या कामासाठी केवळ पैसाच उभा केला नाही तर आपल्या व्यग्र अशा दिनक्रमातून एक मोठा वेळ या कामासाठी दिला. त्यासाठी ते अनेक लोकांमध्ये गेले. लोकांना त्यांनी आवाहन केले. आपल्या स्वत:च्याच व्यवसायातल्या इतर बांधवांकडूनही त्यांनी मदत गोळा केली. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनही अनेकांनी या शेतक-यांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे ही भावना त्यांनी सर्वसामान्यांमध्ये रुजवली. जी आतापर्यंत कोणालाही रुजवता आली नव्हती.
शेतक-यांना जाहीर होणारी मदत म्हणजे काही खास लोकांच्या तुंबडया भरण्याचे एक साधन झाले आहे अशी सर्वसामान्यांची भावना तयार झालेली असताना अशा प्रकारे समाजात एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचं एक ऐतिहासिक कार्य या दोघांनी केलं आहे.
मकरंद यांच्याशी जेव्हा जेव्हा वेगवेगळया संदर्भात चर्चा होत असे तेव्हा त्यांच्यातला संवेदनशील कलाकार जाणवत असतो तितकीच त्यांच्यातली माणुसकी जाणवत असते. त्यांनी एक व्यवसाय म्हणून जरी काही व्यावसायिक चित्रपटांमध्ये कामं केली असली तरी खास लोकांना संदेश देणा-या चित्रपटांमध्येही आवर्जून कामं केली आहेत.
ग्रामीण भागातल्या भ्रष्टाचारावर आधारित असलेल्या त्यांच्या ‘कायद्याचं बोला’सारखा चित्रपट केला. या भागातल्या राजकारणावर आधारित असलेल्या गोष्ट छोटी डोंगराएवढी सारख्या एका संवेदनशील अशा चित्रपटाची निर्मिती केली. आपल्या वागणुकीतून अशा प्रकारे आपलं वेगळेपण दाखवणारा व समाजाचा एक जबाबदार नागरिक असल्याची जाणीव ठेवणारा कलाकार विरळाच.
मकरंद अनासपुरे यांना तितकीच मोलाची साथ नाना पाटेकर यांनीही दिली आहे. समाजाचा एक सक्रिय घटक असल्याची जाणीव त्यांनी या आधीही आपल्याला अनेक वेळा करून दिली आहे. जे पटेल ते बोलणारा एक स्पष्ट वक्ता म्हणूनही नाना ओळखला जातो. बाबा आमटे यांच्या कामातही आपला सक्रिय सहभाग नोंदवणारा नाना पाटेकर हा नेहमीच एक बिनीचा कार्यकर्ता राहिलेला आहे. त्यामुळे शेतक-यांच्या आत्महत्यांनी तो संवेदनशील झाला. त्याच्या स्वभावानुसार त्याने हे कार्य अधिक आक्रमकपणे केलेलं आहे. त्यासाठी समाजात जाऊन मिसळण्यातही त्याने मागे-पुढे पाहिलं नाही. नाना पाटेकर याने अभिनयाबरोबरच गेल्या काही वर्षात शेतीतही रस घेतला आहे. त्यामुळे
आपल्यासारख्याच इतर शेतक-यांची व्यथा त्याला चांगलीच माहीत आहे. अनेक राजकीय मतप्रवाहांबद्दलची अचूक माहिती त्याच्याकडे असते. त्यामुळे आता या समाजासाठी काय करायला पाहिजे याची एक खास योजना त्याने आखलेली आहे. त्याच्याच आधारावर नाम फाऊंडेशनचे कार्य उत्तरोत्तर वाढत चालले आहे. त्यांच्या या कार्याने एक कलाकार समाजासाठी काय करू शकतो याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला आहे.
त्यांच्या या कामात अक्षय कुमारसारख्या आणखी एका कलाकारानेही स्वत:ला जोडून घेतलेले आहे. त्यानेही या भागातल्या शेतक-यांसाठी लगोलग जवळ जवळ कोटी रुपयांची मदत केली आहे. त्याचेही विचार व सर्वसामान्यांबरोबर जोडून घेण्याचा त्याचा स्वभाव या आधारावर त्याने केलेल्या या कार्याचा आदरच करायला हवा. सध्या करमणूक विश्वात कोटयावधी रुपयांची उलाढाल होत असते. हा पैसा यानिमित्ताने समाजातल्या गरजूंपर्यंत पोहोचू शकतो.
आतापर्यंत सरकारी पातळीवर हा प्रश्न सोडवण्यासाठी अशाच प्रकारे अब्जावधी रुपये खर्च झालेले आहेत. त्या मानाने हे पैसे कमी असले तरी या पैशांचं काम दिसून येतं. ते जाणवतं, त्याचा फायदा झालेल्या लोकांना समाज ओळखू शकतो.
शेतक-यांच्या आत्महत्यांचे गेल्या काही दिवसांमध्ये कमी झालेले प्रमाण या सा-या गोष्टी या कलाकारांच्या संवेदनशीलतलेला मिळालेलं यशच दाखवतात. अशाच प्रकारची संवेदनशीलता जर या देशातल्या सर्वानीच जपली तर हा देश खरोखच महासत्ता सहज बनू शकेल असा विश्वास यानिमित्ताने निर्माण झाला ही महत्त्वाची बाब आहे. त्यांच्या या कार्याला प्रहार परिवाराच्याही शुभेच्छा आहेतच. या वर्षीच्या प्रहारच्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे मकरंद अनासपुरे हे प्रमुख पाहुणे आहेत याचा आम्हाला अभिमान आहे.