२००९च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात दुस-या क्रमांकाचे मताधिक्य घेऊन विजयी झालेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यंदा लाखाचे मताधिक्यही घेऊ शकल्या नाहीत.
पुणे- २००९च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात दुस-या क्रमांकाचे मताधिक्य घेऊन विजयी झालेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यंदा लाखाचे मताधिक्यही घेऊ शकल्या नाहीत. सुळे यांना पाच लाख ६९ हजार ८२८ मते, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जाणकर यांनी सुळे यांना चांगली लढत देत तब्बल चार लाख ५२ हजार ५३१ मते घेतली. ‘आप’च्या सुरेश खोपडे यांनी २६ हजार ४६२ मते घेतली.
सुळे यांचा अवघ्या ६९ हजार ५४३ मतांनी विजय झाला. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना अनपेक्षितपणे मते मिळाल्याने पवारांचे राजकीय भवितव्य पणाला लागले असल्याचे बोलले जात आहे. बारामतीमधून विरोधी उमेदवाराला प्रथमच इतक्या मोठया प्रमाणात मते मिळाली आहेत. सुप्रिया सुळे यांना गतवेळी चार लाख ८७ हजार ८२७ मते मिळाली होती. तर भाजपच्या कांता नलावडे यांना फक्त एक लाख ५० हजार ९९६ मते मिळाली होती. त्यामुळे सुप्रिया सुळे या तब्बल सवातीन लाखाच्या मताधिक्क्याने निवडून आल्या होत्या. यंदा मात्र त्यांना हा आकडा गाठण्यात अपयश आले. इथून पुढे गाफिल राहून चालणार नाही, याचीच त्यांना या निकालाने आठवण करून दिली. विरोधक आतापर्यंत बारामतीत निवडून येण्याचे ध्यानीमनीही आणत नव्हते. सुळेंचे घटते मताधिक्य राष्ट्रवादीसाठी आणि एकूणच पवारांसाठी ती आगामी विधानसभा निवडणुकीसाठी धोक्याची सूचना आहे. कारण बारामतीचा निकाल हा कायमच पवारांच्या बाजूने राहिला आहे. मात्र, या वेळी महायुती आणि आप या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांमुळे प्रचारात अपेक्षेपेक्षा जास्त रंगत आली. विरोधी पक्षांनी विरोधात आरोपांचे रान उठविल्यामुळे राष्ट्रवादीला यावेळी पहिल्यांदाच प्रचारासाठी पळापळ करावी लागली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचार संपल्यानंतर मासाळवाडीत जाऊन पाण्याची मागणी करणार्या गावकर्याना केलेल्या दमबाजीची व्हिडिओ क्लिप राष्ट्रवादीच्या अंगलट आली. मात्र, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी प्रचाराच्या सांगता सभेत बारामतीकरांना केलेल्या आवाहनानंतर चित्र पालटले. बारामतीत मतदानाचा टक्का वाढला. या मतदारसंघात ५९.४१ टक्के मतदान झाले होते. हे वाढलेले मतदान म्हणजे जाणकर यांनी निर्माण केलेल्या वातावरणाची पावतीच म्हणावी लागेल.
जाणकर यांचे चिन्ह कपबशी होते. कपबशी ऐवजी त्यांचे ‘कमळ’ चिन्ह असते, तर जाणकरांचा विजय निश्चित होता. कारण कपबशी सर्वच मतदारांपर्यंत पोहोचले, तरी लक्षात राहिलच असे नव्हते. त्याचा परिणाम जाणकरांचे मतदान घटण्यावर झाला. परिणामी सुळेंचा विजय झाला. मात्र, ‘कमळ’ चिन्ह असते तर सुळेंना ही लढत सोपी नव्हती, असे नागरीकांचे मत आहे.