जागतिक स्तरावरील स्मार्टफोन विक्रीत अव्वल स्थानी असलेल्या सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सकडून स्वत:ची ऑपरेटिंग सिस्टीम टायझेनच्या लाँचिंगसाठी भारताची निवड करण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली– जागतिक स्तरावरील स्मार्टफोन विक्रीत अव्वल स्थानी असलेल्या सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सकडून स्वत:ची ऑपरेटिंग सिस्टीम टायझेनच्या लाँचिंगसाठी भारताची निवड करण्याची शक्यता आहे. महिनाभरात या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणारा फोन दाखल करण्यासाठी या कंपनीने हालचाली सुरू केल्याचे याबाबत माहीतगार सूत्रांनी म्हटले आहे. आतापर्यंत सॅमसंगकडून आपल्या पहिल्यावहिल्या लाँचिंगसाठी भारताची निवड केलेली नाही. मात्र दक्षिण आशियाई देशातील ब्रँडकडून निर्माण झालेल्या तीव्र स्पध्रेच्या पार्श्वभूमीवर कंपनीकडून ही योजना आखली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टायझेन फोन हा ४ इंचाचा डिस्प्ले, डयुअल सिम आणि ३.२ मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि ५१२ एमबीची रॅम आणि परवडणा-या किमतीतील असेल. भारतामध्ये ५,००० रुपये ते १५,००० रुपये ही रेंज परवडणारी समजली जाते. मात्र सॅमसंगच्या प्रवक्त्याने हे अंदाज असून त्यावर प्रतिक्रिया देणे टाळले आहे. जागतिक स्तरावर सर्वात मोठी स्मार्टफोन उत्पादक असलेल्या भारत आणि जागतिक पातळीवर मोठया स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. यामुळे कंपनीचा बाजार हिस्सा सातत्याने घटत आहे. जुलै-सप्टेंबर या तिमाही कालावधीत मागील दोन वर्षातील सर्वात कमी उत्पन्नाची नोंद झाली आहे.
प्रत्यक्ष विक्रीचा तपशील ठेवणा-या जीएफकेनुसार, सॅमसंगचा स्मार्टफोन बाजार हिस्सा ऑगस्टमध्ये ३२ टक्क्यांपर्यंत घटला आहे. जो जुलैमध्ये ३२.५ टक्के एवढा होता. पण सप्टेंबरमध्ये भरपाई करताना कंपनीने ३३ टक्क्यांची नोंद केली. परवडणा-या फोनवरील भर कंपनीसाठी फायदेशीर ठरला. अॅपल आणि श्योमी यांनी प्रिमियम आणि परवडणा-या फोनच्या क्षेत्रात चांगला जम बसवल्याने सॅमसंगचे वर्चस्व कमी होऊ लागले असल्याचे बाजारतज्ज्ञांचे मत आहे. तर भारतात मायक्रोमॅक्सच्या स्पर्धेत सॅमसंगची दमछाक होऊ लागली आहे. तज्ज्ञांनुसार अँड्रॉइडकडून टायझेनकडे ग्राहकांना वळणे हे सॅमसंगसमोरील सर्वात मोठे आव्हान राहणार आहे.