गेल्या काही दिवसांपासून राज्यात, देशांतील काही राज्यांत तसेच आखाती देशांत नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ने धुमाकूळ घातला आहे. नायक, नायिका, सहनायक, खलनायक, विदूषक अशा परिघाभोवती, मिथकांभोवती भारतीय चित्रपट घुटमळताना दिसतो. सैराटही त्याला अपवाद नाही. असे असताना एका चित्रपटाला ऐवढी प्रसिद्धी का मिळावी? त्याने तिकीट विक्रीचे विक्रम का मोडावेत? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ शकतात. पण ही उत्तरे शोधताना आजच्या परिप्रेक्ष्यातून समाजमनाला हळुवारपणे हात घालण्याचे काम या चित्रपटाने केले आहे. त्यामुळेच हा चित्रपट अनेकांना त्यातील जातवास्तवामुळे भावतो, काहींना गाण्यामुळे आवडतो तर ब-याच जणांना त्यातील परशा, आर्चीच्या विशुद्ध प्रेम प्रकरणामुळे हा सिनेमा अपील होतो. त्यामुळेच की काय हा सिनेमा आता १०० कोटींच्या तिकीट विक्रीचा उच्चांक गाठतो आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी हा चमत्कारच म्हणावा लागेल. या चित्रपटातील यश नागराज मंजुळे यांच्यासाठी आगामी चित्रपट बनवताना आव्हान असणार आहे. मंजुळे यांना यापुढची कलाकृती तितकीच ताकदीची सादर करावी लागणार आहे.
जातवास्तव भारतीय चित्रपटांतून गेल्या सत्तर-ऐंशी वर्षात प्रखरपणे मांडण्यात आलेले आहे. ‘अच्छुतकन्या’ असो वा ‘सुजाता’ या हिंदी चित्रपटांतून हे वास्तव अधिक ठसठशीतपणे मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्याला त्या त्या काळातील प्रेक्षकांनी उचलूनही धरलेले आहे. पण ज्या हेतूसाठी हे चित्रपट बनवण्यात आले, तो हेतू काही साध्य झालेला नाही, असे खेदाने म्हणावेसे वाटते. त्यामुळेच मंजुळे यांना अजूनही सैराटच्या माध्यमातून एकविसाव्या शतकातही जातवास्तव मांडावे लागत आहे. हा दोष मंजुळेचा की समाजातील या वण्र्यवर्चस्ववादी, जातीधिष्ठीतपणाचा याची उत्तरे शोधावी लागतील. ही उत्तरे शोधताना आपल्याला कुठेतरी परशा व आर्ची या दाहक समाजवास्तवात होरपळताना दिसेल. त्यांची ही होरपळ असहय्यपणे पाहण्याव्यतिरिक्त आपल्या हातात काहीच नसते. अशी अवस्था होते, तेव्हाच पुन्हा सैराटचे बीज एखाद्या मंजुळेंच्या मनात अंकुरत राहते.
‘सैराट’बाबत समाजात दोन प्रतिक्रिया कानावर येतात. त्यातील पहिली प्रतिक्रिया-‘या सिनेमात खास असे काय आहे? लोक तो डोक्यावर का घेतात? दुसरी प्रतिक्रिया काहीशी चित्रपटानुनयी असते, ‘या चित्रपटातून नागराजने जातवास्तवाचा पर्दाफाश केलेला आहे.’ अशा या दोन प्रतिक्रिया व्यक्त होत असताना काही प्रेक्षक रूपवादी पद्धतीने चित्रपट एन्जॉय करतात. त्यांना या दोन्ही प्रतिक्रियांशी काही देणे-घेणे नसते. अशावेळी शंभर वर्षापूर्वी कविवर्य केशवसुत यांनी –
‘ब्राह्मण नाही, हिंदू नाही
नच मी एक पंथाचा
तेच पतित की जे
आखडती प्रदेश साकल्याचा’
या लिहून ठेवलेल्या काव्यपंक्ती बरेच काही सांगून जातात. साकल्याचा प्रदेश आखडणा-यांना कोणत्या भाषेत उत्तर द्यावे, याचे छान विश्लेषण सैराटने केलेले आहे. हा चित्रपट तुम्हाला काही सांगण्याच्या भानगडीत पडत नाही. पण त्यातून कळत- नकळत जे माणुसकीचे झरे वाहत असतात, त्यातून बरेच काही घेण्यासारखे आहे.
भौतिकसुखाला चटावलेल्या भारतीय प्रेक्षकांना खरेतर गंभीर घाटणींच्या कलाकृती आवडत नाहीत. त्यामुळेच गंभीरपणे चित्रपट वा इतर ललितकृती सादर करणा-यांची चांगलीच ससेहोलपट होत असते. नागराज मंजुळे यांनी समाजातील वास्तव दाखवताना त्याला कर्णमधुर संगीताचे कोंदण दिले आहे. त्यामुळे या चित्रपटाचे यश कशात मोजायचे, याचे एक कोडेच आहे. त्याचे उत्तर प्रत्येकाने आपल्या कुवतीनुसार सोडवायचे आहे, असेच म्हणता येईल.