अनेक गर्दीच्या ठिकाणी, वाहतुकीमुळे होणा-या अडचणींवर मात करण्यासाठी तसेच महामार्गावर रस्ता ओलांडण्यासाठी करोडो रुपये खर्च करून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने शेकडो स्कायवॉक बांधले. यामुळे ब-याच ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे होणारा त्रास कमी झाला. मात्र, काही ठिकाणी योग्य नियोजनाअभावी किंवा लोकांची गरज लक्षात न घेता ‘स्कायवॉक’ बांधण्यात आले. त्यामुळे संबंधित स्कायवॉकमुळे निर्माण होणा-या अनेक अडचणींना सर्वसामान्य जनतेला रोजच सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे स्कायवॉक नेमके कोणासाठी हा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहत नाही.
रस्त्यावर बसणा-या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे, सतत वाढणा-या लोकसंख्येमुळे, तसेच रस्त्यावर वाहनांचे प्रमाण रस्त्यांच्या क्षमतेपेक्षा वाढल्यामुळे सध्या रस्त्यावरून चालणे म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखे झाले आहे. अशा अवघड रस्त्यांवरून चालणा-या नागरिकांना ब-याच प्रमाणात त्रास सहन करावा लागतो.
काही ठिकाणी महामार्गावर रस्ता ओलांडणे फारच धोकादायक असते म्हणून अशा ठिकाणीही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबईत अनेक ठिकाणी शेकडो कोटींचे ‘स्कायवॉक’ बांधले. पण या स्कायवॉकचा खरोखरच चालणा-यासाठी वापर होतो आहे का? हा विचार अनेकांच्या मनात येत असेल.
स्कायवॉकवर निर्माण होणा-या तशा अनेक अडचणी आपल्या लक्षात येतील. त्यातील पहिली अडचण म्हणजे प्रेमीयुगुलांची. मुंबईत असे अनेक स्कायवॉक आहेत, ज्यांचा अत्यंत कमी प्रमाणात जनता उपयोग करते. अर्थातच असे स्कायवॉक पादचा-याविना रिकामे असल्यामुळे मग त्या स्कायवॉकचा उपयोग अनेक प्रेमीयुगुले आपल्या भेटीच्या ठिकाणाकरिता करताना दिसतात. असे अनेक ‘लव्हर स्पॉट’ आज मुंबईत ठिकठिकाणी आहेत.
अनेक कॉलेज तरुण-तरुणी ‘गप्पांचा कट्टा’ म्हणूनही स्कायवॉकचा वापर करताना दिसतात. शाळकरी विद्यार्थीही आता या स्कायवॉकवर मोठया प्रमाणात दिसू लागले आहेत. शाळा सुटली की, थेट स्कायवॉकवर भेटायचे. मग तिथेच पुढील दिवसाचा कार्यक्रम ठरवून आपापल्या घरी जायचे, हा तर अनेक शाळकरी विद्यार्थ्यांचा दिनक्रम ठरला आहे. स्कायवॉकवरून प्रवास करणारे अनेक नागरिक यामुळे नाराजी व्यक्त करताना दिसतात. स्कायवॉक उभारणीचा मुख्य उद्देशच या अशा घटनांमुळे असफल झाल्याचे मतही अनेकांकडून व्यक्त होताना दिसते.
फेरीवालेही यात मागे आहेत असे नाही. या अडचणी निर्माण करणा-यामध्ये दुस-या क्रमांकावर दिसतात ते फेरीवाले. जिथे रिकामी जागा मिळेल तिथे आपला स्टॉल मांडायचा, अशा आवेशात अनेक फेरीवाले या स्कायवॉकवर आपले स्टॉल मांडतात. चालण्याची अर्धीअधिक जागा ते आपल्या स्टॉलने व्यापून टाकतात. त्यामुळे स्कायवॉकवरून चालणा-या पादचा-याना त्याचा मोठया प्रमाणात त्रास होतो. परिणामी गर्दीच्या वेळी या स्कायवॉकवरून चालणे शक्य होत नाही.
अनेक वेळा पालिका अधिका-याना तसेच स्थानिक पोलिसांना याबाबत तक्रारी करूनही त्याचा काहीच फायदा होत नाही. अर्थातच त्यामागे बरीच ‘अर्थ’पूर्ण कारणे लपलेली असतात. अनेक ठिकाणी हे अनधिकृत स्टॉल लावण्याकरिता हप्ते घेतले जातात.
अगदी पन्नास रुपयांपासून ते ७०० रुपयांपर्यंतचे हे हप्ते या स्टॉलला अभय देणा-या या अधिका-याच्या खिशात रोज जातात. त्यामुळे अशा अनधिकृत स्टॉलवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. झालीच तर ती तात्पुरत्या वेळेसाठी होते. दुस-या दिवशी हे स्टॉलधारक पुन्हा आपल्या जागेवर हक्काने स्टॉल लावताना दिसतात. त्यामुळे स्कायवॉकवर अनधिकृतपणे ठाण मांडणा-या या फेरीवाल्यांवर कारवाई होणे अतिशय आवश्यक आहे.
स्कायवॉकवर मोठया प्रमाणात दिसणारी तिसरी अडचण म्हणजे बॅनरबाजी. अनेक ठिकाणी स्कायवॉकवर मोठया प्रमाणात बॅनरबाजी झालेली दिसते. स्कायवॉक म्हणजे जणू यांचे हक्काचे बॅनर लावण्याचे ठिकाण आहे असे समजून अनेक महाभाग या स्कायवॉकचा उपयोग बॅनर लावण्याकरिता अगदी बिनधास्तपणे करताना दिसतात. अनेक नेते मंडळींच्या वाढदिवसांचे फलक मोठया प्रमाणात स्कायवॉकवर लावलेले दिसतात.
शहराचे विद्रुपीकरण होऊ नये, यासाठी बेकायदेशीररित्या फलक लावण्यावर कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने राज्यातील सर्व महापालिकांना दिले होते. मात्र या आदेशांकडे कानाडोळा करत आजही अनेक ठिकाणी स्कायवॉकवर बेकायदेशीररित्या बॅनर लावण्याची जणू स्पर्धाच लागलेली दिसत आहे. या स्कायवॉकमुळे ब-याच ठिकाणी वाहतुकीची कोंडी सुटायलाही मदत झाली, त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. मात्र अनेक अडचणींमुळे काही स्कायवॉक नेहमीच वादाचा विषय बनले.
ब-याच ठिकाणी गर्दुल्ले किंवा भिकारी या स्कायवॉकचा राहण्यासाठी सर्रास वापर करतात. अनेक भिकारी रात्री झोपण्याकरिता स्कायवॉकचा उपयोग करतात. मात्र पालिकेकडून किंवा संबंधितांकडून अशा प्रकारे अनधिकृतरित्या स्कायवॉकचा वापर करणा-यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. अनेक ठिकाणी स्थानिक नागरिकांकडून पोलीस किंवा चौकीदार नेमण्याची मागणी होत असतानाही, या मागणीवर समाधानकारक पावले उचलल्याचे कुठेही दिसत नाही.
काही ठिकाणी खासगी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत. मात्र ते वयोवृद्ध असल्यामुळे तरुण-तरुणी किंवा अनधिकृत फेरीवाले त्यांना अजिबात जुमानत नाहीत. त्यामुळे ब-याच ठिकाणी स्कायवॉकचे फायदे होत असले तरी त्यामुळे निर्माण होणा-या अडचणी लक्षात घेणेही आवश्यक आहे. अर्थातच त्या अडचणी काही फार मोठया आहेत असेही नाही. पालिकेकडून त्यावर ठोस पावले उचलली गेली तर या अडचणींवरही अगदी सहज मात करता येऊ शकेल. आवश्यकता आहे ती ठोस पावले उचलण्याची.