एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री उभी असते तसेच आता स्त्रीला यशस्वी करण्यासाठी पुरुषांनी पुढे येण्याची गरज आहे.
कर्जत- ‘महिलांना पुरुषांकडून सन्मान मिळण्याची अपेक्षा असते; परंतु तसे होत नाही. तिने कमावलेले पैसे खर्च करण्याचा साधा अधिकारही तिला काही ठिकाणी नसतो. त्यासाठी तिच्यावर दडपण असते. महिलांना पुरुषांपेक्षा जास्त दैवी देणग्या मिळाल्या आहेत, मात्र त्या सिद्ध करण्याची जबाबदारी स्त्रीवरच असते. महिला एकाच वेळी अनेक कामे करू शकते. आता केवळ चूल आणि मूल इतकी ती सीमित राहिली नसून, सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहे. एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री उभी असते तसेच आता स्त्रीला यशस्वी करण्यासाठी पुरुषांनी पुढे येण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन पेण येथील अहिल्या महिला मंडळाच्या अध्यक्ष अश्विनी गाडगीळ यांनी येथे केले.
कोकण ज्ञानपीठ कर्जत अभियांत्रिकी महाविद्यालयातील सेमिनार हॉलमध्ये महिलादिनाचे आयोजन करण्यात आले होते. अॅड. अनुप्रिता वैद्य यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून समारंभाचे उद्घाटन झाले. या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे सचिव प्रदीप शृंगारपुरे, प्राचार्य डॉ. मधुकर लेंगरे उपस्थित होते.
स्वागत समारंभ झाल्यानंतर प्राचार्य लेंगरे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर रसिका अत्रे, नेहा वप्रे, दीपाली महाजन, मयुरी जाधव, दीप्ती अध्यापक, स्नेहा बराटे, कीर्ती भगत, अक्षय वायकर, शुभम ठाले, हार्दिक सावे या विद्यार्थ्यांनी स्त्रीभ्रूण हत्या, वृद्धाश्रम, महिलांना मिळणारी वागणूक या विषयावर आधारित नाटिका व कविता सादर केल्या. जयश्री रानडे यांनी सादर केलेल्या महिलांविषयीच्या गीताने उपस्थितांचे डोळे पाणावले.
प्
रमुख पाहुण्या अॅड. अनुप्रिता वैद्य यांनी महिलांच्या कायद्याविषयी माहिती देऊन कायदा आपल्यासाठी असला तरी त्याचा दुरुपयोग करू नये. अनेक कायदे आहेत, त्यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. ‘निर्भया’सारख्या घटना घडू नयेत म्हणून विशेषत: महिला पालकांनी आपल्या मुलींपेक्षा मुलांना चांगले संस्कार देण्याची गरज आहे, असे स्पष्ट केले. सचिव प्रदीप शृंगारपुरे यांनी समारोपाचे मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन नेहा वप्रे व ऐश्वर्या मोरे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. केसकर यांनी केले. या प्रसंगी प्रा. गिरीश गलगटे, सुषमा दातार, विनया देव आदींसह विद्यार्थिनी व शिक्षिका मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.