इंग्रजी भाषा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे आल्यास गुणवत्तेत निश्चितच वाढ होईल, असा आशावाद माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी कुडाळ येथील सिंधू एज्युकेशन एक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला.
कुडाळ- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी दहावी, बारावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करतात. मात्र हे यश स्पर्धा परीक्षेत दिसत नाही, आपल्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेतही उज्ज्वल यश संपादन केले पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी विशेष प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगत शिक्षकांनी मुलांवर चांगले संस्कार घडवावेत, तसेच इंग्रजी भाषा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे आल्यास गुणवत्तेत निश्चितच वाढ होईल, असा आशावाद माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी कुडाळ येथील सिंधू एज्युकेशन एक्स्पोच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या वतीने कुडाळ येथे आयोजित केलेल्या सिंधू एज्युकेशन एक्स्पो २०१८चे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या हस्ते झाले.
यावेळी खा. नारायण राणे यांनी सांगितले की, एक आगळा वेगळा व स्तुत्य व यशस्वी जीवन जगण्यासाठी अतिशय आवश्यक असा हा कार्यक्रम जिल्हापरिषदेने राबविला असुन कौतुकास्पद आहे. सर्वांनी या कार्यक्रमाचे महत्त्व जाणुन घेतले पाहिजे. आपल्याला काय व्हायचे आहे, हे ठरवुन आपली स्वप्ने पुर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत केली पाहीजे. विद्यार्थ्यांनी शिक्षण कोणते घ्यावे, काय घडायचे आहे ते ठरवा. शिक्षण क्षेत्रात हजारो आधुनिक व प्रगत क्षेत्रे असुन विद्यार्थ्यांंनी त्या क्षेत्राकडे ही वळले पाहीजे. सर्व क्षेत्रामध्ये यशस्वी होण्याच्या मुळ पाया हा शिक्षण आहे. महत्त्वाकांक्षा पुर्ण करण्यासाठी शिक्षण घ्यावे लागते. चांगले बनायला मेहनत, त्याग, परिश्रम करावे लागतात. त्यामुळे चांगले शिक्षण घ्या असे आवाहन विद्यार्थ्यांना करीत भविष्यात सर्व क्षेत्रात येथील विद्यार्थी चमकले पाहिजेत असे सांगत या जिल्ह्यातुन मी एकच मुख्यमंत्री होवुन चालणार नाही तर, तुमच्यातुन अनेक जण मुख्यमंत्री झाले तरच ख-या अर्थाने या एक्स्पोचा उद्देश सिध्द झाला असे वाटेल असे मत त्यांनी व्यक्त केले.
खा. राणे म्हणाले, तुमची स्वप्ने पुर्ण केल्यानंतर विनम्रता ठेवा, घमेंड ठेवु नका तरच तुम्ही पुढे जावुन यशस्वी व्हाल असा कानमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. दहावी बारावीत निकालात आपला जिल्हा पुढे आहे. मात्र स्पर्धा परिक्षेत का मागे, यश का टिकत नाही? कुठे चुकते ते शोधले पाहिजे. त्यासाठी शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्याबरोबरच लोकप्रतिनिधीनीही प्रयत्न केले पाहिजेत असे ही राणे यांनी सांगितले.
शिक्षणच राज्य आणि देश पुढे नेऊ शकतो. खरे चीज व्हायचे असेल तर तुम्ही शिक्षणात घडले पाहीजे. मुलांच्या शिक्षणाकडे पालकांनी विशेष लक्ष द्यावे. समाज घडवा, यशाचे सातत्य टिकवा, आदर्श लोकप्रतिनिधी निर्माण व्हा. युवा पिढी बिघडु नये व संस्कार पासुन दुर जावु नये या करीता शिक्षकांनी विद्यार्थ्यांंवर चांगले संस्कार घडवावे. मुंबई कोकणात असुन लाखोंची उलाढाल मुंबईत होते मात्र यामध्ये जिल्ह्यातील व्यक्ती दोन टक्केच आहे. अशी ही खंत त्यांनी बोलुन दाखविली.
यावेळी बोलताना सतीश सावंत यांनी सांगितले की, देशाची प्रगती ही देशाच्या कृषी व शिक्षण विभागाचा होत असलेल्या विकासावर अवलंबुन असते. त्यामुळे आपल्या जिल्ह्याचा विकास झपाट्याने होण्यासाठी जिल्हा परीषदेच्यावतीने कृषी व शिक्षण विभागामध्ये विविध उपक्रम राबवित असुन नाविण्यपुर्ण उपक्रम राबविणारी राज्यातील ही एकमेव जिल्हा परीषद आहे असे सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षणपध्दती ही विकासित असुन येथील विद्यार्थी हे खुप हुशार आहेत. मात्र स्पर्धा परीक्षेत येथील मुले कमी पडतात अशी खंत के. मंजुलक्ष्मी यांनी व्यक्त करीत मुलांना स्पर्धा परीक्षेत उतरवा, मुंलाच्या स्वप्नावर पालकांनीही विश्वास ठेवुन त्यांची स्वप्ने पुर्ण करण्यासाठी प्रयत्नशील रहा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार जिल्हा परिषदचे शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांच्या हस्ते करण्यात आला. तर माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा सत्कार जि. प. अध्यक्षा रेश्मा सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक, पालक, जिल्ह्यातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नारायण राणे यांच्याकडे विकासाची दृष्टी- आ. नितेश राणे
आमदार नितेश राणे यांनी सांगितले की, प्रगत शैक्षणिक सिंधुदुर्ग होण्यासाठी जि. प. च्या माध्यमातून अनेक उपक्रम सुरू आहेत, याचा खूप आनंद वाटत आहे. शिक्षण क्षेत्रात विकास होतो, याचे सारे श्रेय नारायण राणे यांना आहे. कारण त्यांच्याकडे विकासाची दुरदृष्टी आहे. देशाचे भविष्य आजचे तरुण आहेत. त्यांना आकार कोणता द्यावा हे महत्त्वाचे आहे. जिल्हा शैक्षणिक क्षेत्रात भविष्यात आणखी प्रगत होण्यासाठी या एक्स्पोचा वापर यापुढे करून घेतला पाहिजे. दर्जेदार मार्गदर्शक येथील मुलांना कसे लाभतील, यासाठी आपले प्रयत्न असणार आहेत, असे सांगितले.