शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक कुठे उभारलं गेलं पाहिजे, यावरून मोठी खलबते चाललीय. स्मारकाची जागा निश्चित करण्यासाठी राजकारणातील महर्षी समजले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जबाबदार सोपवण्यात आली. त्यानंतर राज्यात भाजपा-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली समिती या स्मारकाच्या जागेचा शोध घेण्यासाठी नेमली. समिती जागेचा शोध घेत आहे; पण या समितीकडून वेगळ्या काही जागेचा शोध लागलेला नाही. फिरून फिरून पुन्हा शिवाजी पार्क येथीलच महापौर निवासास्थानीच स्मारकाचा विषय थांबतोय. महापौर निवासाच्या जागेवरच बाळासाहेबांचं स्मारक बनवलं जाणार आहे. हाच उत्तम मार्ग असल्याचं सांगत शोधकर्त्यांनी हातातील पेन खाली ठेवलं. त्यामुळे महापौर निवासस्थानीच स्मारक उभारलं जाणार, हे निश्चित आहे. याची औपचारिक घोषणा १९ जून रोजी शिवसेनेच्या वर्धापनदिनी सोहळ्यात होणार होती; पण पावसाने असा काही दणका दिला की, घोषणाच काय तर कार्यक्रमही रद्द करण्याची वेळ शिवसेनेवर आली. पावसामुळे त्यानंतर भाजपा मंत्र्यांच्या एकेका प्रतापानंतर याची फारशी चर्चा झाली नसली तरी स्मारकासाठी जी जागा निश्चित करण्यात आली आहे, त्यामुळे स्मारकाचं कोडं सुटले नाही. त्यातूनही महापौर निवासाचा अट्टाहास धरला जात आहे.
शिवसेनाप्रमुखांचं स्मारक मुंबईत व्हायलाच हवं आणि ते प्रशस्तही असायला हवं; पण त्यासाठी ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महापौर निवासस्थानाची वास्तूची ओळखच मिटवून टाकणे योग्य नाही. शिवसेनाप्रमुखांचं स्थान प्रत्येक मराठी नव्हे तर मुस्लीम व इतर धर्मीयांच्या अंतकरणातही त्यांना तेवढी जागा आहे. बाळासाहेबांबद्दल आदर, प्रेम बाळगणारे आणि प्रसंगी जीव ओवाळून टाकणारे आजही आहेत. केवळ शिवसैनिकच नव्हे तर तमाम जनतेचं बाळासाहेबांशी एक घट्ट नातं होतं आणि आहे. हे नाते काय आहे, हे त्यांच्या निधनानंतर निघालेल्या महाप्रचंड अंत्ययात्रेत प्रत्येकानं पाहिलंय. रस्तोरस्ती माता, भगिनी ढसाढसा रडत होत्या. पुरुषांनाही अश्रू आवरता येत नव्हते. समुद्राच्या लाटेवर स्वार होत हेलकावे घेत एखाद्या बोटीने मार्गक्रमण करावं तसं त्यांच्या अत्यंयात्रेचं चित्र होतं. कोणीतरी आपल्याच कुटुंबातील व्यक्ती गेल्याचा शोक घराघरांत होता. त्यामुळे बाळासाहेबांच्या आदराविषयी, प्रेमाविषयी शंका उपस्थित करण्याची गरज नाही. पण बाळासाहेबांवरील हेच प्रेम पिढय़ानपिढय़ा पुढेही ठाकरे कुटुंबीयांवर राहावं, यासाठी जनतेच्या भावनांचा विचार उद्धव ठाकरेंनी करायला हवा.
बाळासाहेबांच्या नावाला आजवर कोणीही मग ती व्यक्ती असो वा राजकीय पक्ष असो, कोणीही विरोध केला नव्हता. त्यामुळेच बाळासाहेबांचे अत्यंसंस्कार शिवाजी पार्क मैदानावर होऊ शकले. त्यांचं स्मृतिस्थळ शिवाजी पार्क मैदानावर बनवलं गेलं. पण बाळासाहेबांच्या नावावर मन मानेल, तसा कारभार जर शिवसेना करायला निघाली असेल तर ते योग्य ठरणार नाही. समुद्राच्या विशाल लाटांच्या साक्षीने हे स्मारक व्हायला हवं,अशी जर शिवसेनेची इच्छा असेल तर मग पार्क क्लब आहे ना! महापौर निवासस्थानाशेजारी आहे. महापालिकेचाच हा भूखंड आहे. महापौर निवासस्थानाला अगदी जोडूनही आहे. हवं तर महापौर निवासाचे लॉन त्याला जोडलं जावं. पण ऐतिहासिक वारसा असलेल्या महापौर निवासाच्या जागी ते उभारलं जाऊ नये. केवळ त्यांचा सहवास म्हणून जर या ठिकाणी स्मारक उभारलं जाणार असेल तर मग ज्याप्रमाणे स्वर्गीय पंतप्रधान पंडित नेहरू आठवण चिरंतन राहावी म्हणून अलाहाबाद येथील त्यांच्या निवासस्थानाला संग्रहालय बनवण्यात आलं. त्याप्रमाणे बाळासाहेबांचं वास्तव्य असलेल्या ‘मातोश्री’वर असं संग्रहालय अथवा स्मारक बनवलं जावं, अशी मागणी करण्यात काही गैर नाही. तसंही करता येत नसेल तर सावरकर स्मारकाशेजारी बनवण्यात आलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या कलादानाच्या ठिकाणी त्यांचं स्मारक बनवलं जावं. तसं पाहता बाळासाहेब हे या चळवळीचे एक सैनिकच होते. त्यामुळे ही जागाही उत्तम ठरू शकेल.
महापौर म्हणजे मुंबईचा प्रथम नागरिक. आज २३ ते २५ वष्रे मुंबईची सत्ता शिवसेनेकडे आहे. आजवर त्यांचेच महापौर या निवासस्थानात राहून गेले. १९३१-३२ मध्ये मुंबईचे पहिले महापौर जे. बी. बोमन बनले असले तरी प्रत्यक्षात त्यांच्यासाठी शिवाजी पार्कमधील चार एकरवरील हा बंगला १९६२मध्ये महापौर निवासस्थान म्हणून घोषित झाला. त्यानंतर १९६४-६५मध्ये महापौर बी. पी. देवगी हे या बंगल्यात राहायला आलेले पहिले महापौर होते. शिवसेनेची स्थापना ही १९६६ची. म्हणजे शिवसेनेच्या स्थापनेआधीपासून महापौरांचे निवासस्थान आहे. मुंबईच्या महापौरांची एक शान म्हणून हा बंगला ओळखला जातो. या बंगल्याशी बाळासाहेबांचं एक वेगळं नातं आहे. प्रत्येक महापौरांनी ते अनुभवलंय. ते याचे साक्षीदार आहेत आणि या सर्व माजी महापौरांना तिथे स्मारक व्हावं, हे रुचणारंही नाही. स्वत: बाळासाहेबांनाच हे आवडलं नसतं. ते ते त्यांच्या नावावर खपवलं जातंय याचंच अतिव दु:ख होतंय.
बाळासाहेबांची चितेवरील निखारे विझले नाही, तेच माजी खासदार मनोहर जोशी यांनी बाळासाहेबांचे स्मारक शिवाजी पार्कमध्येच होईल, असं जाहीर केलं. पण ते कुठं केलं जाणार, हे त्यांनी सांगितलं नाही. पण या विषयाला तप्त चितेच्या साक्षीने भडाग्नी देण्याचे काम मनोहर पंतांनी केलं होतं. आज स्मारकाच्या जागेचा शोध सुरू आहे आणि हे मनोहर पंत, स्मारकावरून शिवसेनेची होत असलेल्या या धावपळीची मजा लुटत आहेत; पण असं कधीही पुढे येऊन सांगत नाहीत की, ‘शिवसेना भवनमोरच माझा ‘कोहिनूर स्वेअर’ उभा राहतोय. त्याच्या दुस-या, तिस-या मजल्यावर बाळासाहेबांचं स्मारक बनवलं जावं. त्यासाठी मी ही जागा देतोय.’ आज बाळासाहेबांनी एवढं म्हणून जे काही दिलंय, त्यांचं ऋण फेडण्याची ही संधी होती. जर कोहिनूरच्या जागेत स्मारक उभं राहिलं तर शिवसेना भवनाला जोडून पूल बांधता आला असता आणि या दोन वास्तूत शिवसैनिकांना ये-जा करता आली असती. बरं ही जागा स्मारकाला दिली म्हणून पंतांचं नुकसान होणार नव्हतं तर त्या बदल्यात त्यांना ‘एफएसआय’चा लाभ मिळाला असता; पण आजवर गोळा करण्याची प्रवृत्ती असणा-यांना एकदाही हात सोडून देत आलं नाही, याचं दु:ख अधिक आहे.
आज मुंबईत काही रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, शाळा, उद्याने यांना बाळासाहेबांचे नाव देण्यात आलेले आहे. वांद्रय़ातील दिवंगत आमदार बाळा सावंत यांनी शिवाजी पार्क स्मशानभूमीत बाळासाहेबांच्या नावावर पाणपोई बसवली. आमदार वांद्रय़ाचे. काम कुठे तर दादर स्मशानभूमीत. तेव्हाचे स्थानिक आमदार मनसेचे; पण त्यांनी याला विरोध केला नाही. बाळासाहेबांमुळे सर्व क्षमापित. पण या पुढे बाळासाहेबांवरील प्रेमाची आणि सहानुभूतीची परीक्षा पाहिली जाऊ नये. बाळासाहेबांनी तमाम जनतेलाच अभिमान बाळगायला शिकवलाय. स्वाभिमान गहाण ठेवायला नाही. त्यामुळे बाळासाहेबांचे स्मारक असं उभं राहायला हवं की, जनतेलाही याचा अभिमान वाटला पाहिजे आणि त्याचं मस्तक तिथं झुकलं पाहिजे. त्यामुळे जनतेला अभिप्रेत असं स्मारक उभ राहिलं पाहिजे, याची काळजी शिवसेनेने घ्यायला हवी.