सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५२ हजार कोटी रुपयांचे कर्ज काढणार असल्याची घोषणा केली.
मुंबई – सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५२ हजार कोटी रुपयांचे कर्ज काढणार असल्याची घोषणा केली. राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे कारण पुढे करत मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर कुणी कर्ज देते का कर्ज असाच नारा दिला आहे.
शपथविधीनंतर फडणवीस यांनी मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारला. त्यानंतर आयोजित राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. सरकारला अनेक अपूर्ण कामे पूर्ण करावी लागणार आहेत. त्यातच राज्याची आर्थिक स्थिती चांगली नाही. हे पाहता सर्वात प्रथम ५२ हजार कोटींचे कर्ज काढण्याची घोषणा नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
काही नवी योजना किंवा धोरण फडणवीस जाहीर करतील मात्र ही अपेक्षा पूर्णत: फोल ठरली. एकीकडे राज्यावर आर्थिक संकट घोंगावत असल्याचे सांगणा-या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शाही शपथविधी सोहळय़ावर झालेल्या कोटय़वधी रुपयांच्या खर्चावर बोलणे मात्र टाळले. यापुढे आर्थिक काटकसर केली जाईल, असेही ते म्हणाले.
राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत सेवा हमी विधेयक आणण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार जनतेला मिळणा-या प्रत्येक सेवा कायद्यानुसार मिळतील, असे फडणवीस यांनी सांगितले. यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली असून महिनाभरात ते विधेयकाचा मसुदा मंत्रिमंडळाला सादर करतील.
सर्व विभागाच्या गरजा काय आहेत. त्यांचे उद्दिष्टय़ काय याबाबत प्रत्येक विभागाला प्रात्यक्षिक द्यावी लागतात असेही ते म्हणाले. राज्यात सुरू असलेली अपूर्ण कामे पूर्ण करणे, कागदावर असलेल्या कामांना गती देण्याचे काम करणार असल्याचेही ते म्हणाले.
मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज
मंत्रिमंडळाचे खातेवाटप शनिवारी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांसह सात कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्र्यांनी पदाची शपथ घेतली आहे. सर्वच मंत्र्यांना चांगले खाते मिळावे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर शिवसेनेबरोबर अद्याप वाटाघाटी सुरू आहेत. त्यामुळे खातेवाटप करताना सावधगिरी बाळगली जाणार आहे.