या विषयावरील पहिल्या भागात आपण थोडक्यात जाणून घेतलं की स्वसंभाषण म्हणजे काय. विचार आणि स्वसंभाषण यात फरक काय आणि स्वसंभाषणाचा आपल्या आयुष्यात सहभाग कसा आहे ते. या भागात आपण याच गोष्टींचा अधिक सखोल अभ्यास करणार आहोत.
स्वसंभाषण ही एक वर्तुळाकार प्रक्रिया आहे असं म्हणता येईल. पहिल्या भागात आपण चर्चा केली की आपल्या आयुष्यात स्वसंभाषणाचा पाया लहानपणापासून रचला जातो. वयानं मोठय़ा लोकांची शिकवण, संस्कार, समवयस्कांसोबत केलेली संभाषणे, शिक्षण आणि याव्यतिरिक्त अनोळखी जगात आलेले अनुभव या सगळ्यांमधून आपल्या मनात आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि वर्तणूक या गोष्टींतून आपल्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असते. याच आधारावर आपल्या विचारांचा आणि स्वसंभाषणाचा पॅटर्न तयार होतो. स्वसंभाषणाचा परिणाम आपल्या कृती आणि प्रतिकृती म्हणजेच अॅक्शन आणि रिअॅक्शनवर होतो. आपल्या अॅक्शन आणि रिअॅक्शनच्या आधारावर कोणत्याही सिच्युएशनचा रिझल्ट समोर येतो जो आपल्यासाठी एक चांगला किंवा वाईट अनुभव असतो आणि शेवटी हाच अनुभव पुन्हा आपल्या स्वसंभाषणाचं खाद्य म्हणून काम करत असतो. याचा व्यापकपणे विचार केला तर आपल्या स्वसंभाषणावर आपल्या आयुष्यातील समृद्धी, यशापयश, नातेसंबंध आणि अशा सगळ्याच महत्त्वाच्या गोष्टी टिकून असतात.
या सर्व लॉजिकला जोड म्हणून एक अभ्यास तुमच्यासमोर मांडतो. जगातील अनेक विख्यात लेखकांनी लिहिलेल्या स्वसहाय्य म्हणजेच सेल्फ हेल्प पुस्तकांमध्ये काही गोष्टी या समान सापडतात. त्यातली एक म्हणजे यशस्वी लोकांची विचारसरणी आणि त्यांच्या सवयी. यशस्वी व्यक्तीआपल्या दिनचय्रेत सतत सकारात्मक स्वसंभाषणाचा अगदी उत्तम उपयोग करतात. तशी त्यांना सवयच असते असं म्हणावं लागेल. कोणताही दिवस किंवा काम सुरू करण्याआधीच यशाची खात्री मनात बाळगण्याचं काम त्यांचं स्वसंभाषण प्रत्येक वेळेस अगदी सहज करत असतं. आपल्या कार्यक्षमतेबद्दल आणि यशाबद्दल त्यांना नेहमीच खात्री असते आणि म्हणूनच त्यांच्याकडून प्रत्येक काम उत्तमरित्या पार पडतं. याच्या बरोबर उलट मन:स्थिती अयशस्वी किंवा साधारण व्यक्तींची असते. त्यांना त्यांच्या कलागुणांवर, कार्यक्षमतेवर आणि यशावर कधीच विश्वास नसतो. या अविश्वासाचा त्यांच्या कामावर विपरीत परिणाम होतो आणि क्षमता, ज्ञान असूनही नेहमी अपयश किंवा कमी यश पदरात पडतं. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल हवे आहेत, मग तुम्हाला तुमच्या स्वसंभाषणात बदल करावे लागतील. ते कसे हे पाहुयात.
सकारात्मक स्वसंभाषण अधिक प्रबळ बनवण्याचे उपाय सांगण्याअगोदर एक महत्त्वाची सुचना, सर्वप्रथम आपल्यासोबत सतत जवळ ठेवता येईल या आकाराची डायरी घ्यावी आणि ती २४ तास स्वत:सोबत ठेवायची सवय लावावी. या डायरीचं काय करायचं हे पुढे सांगतो.
सकारात्मक स्वसंभाषण बनवण्याचे उपाय
स्वत:चा आदर : सर्वप्रथम तुम्हाला स्वत:चा आदर करणं शिकलं पाहिजे, कारण त्याशिवाय या उपायांचा फरक पडणं जवळजवळ अशक्य आहे. आपण जे आहोत, जसे आहोत, जे मिळवलंय त्याबद्दल कमीत कमी स्वत:च्या मनात आदर असणं अत्यंत गरजेचं आहे. स्वत:बद्दल आदर असल्यावरच आपण इतरांकडून आपल्याला आदर मिळण्याची अपेक्षा करू शकतो आणि आपल्या सभोवती सकारात्मकतेसाठी पोषक वातावरण बनवू शकतो.
मानसिक तयारी आणि इच्छाशक्ती : त्यानंतर तुम्हाला हा बदल हवा आहे अशी स्वत:च्या मनाची तयारी व्हायला हवी. पूर्ण इच्छाशक्तीनिशी हे उपाय आत्मसात करण्याचा मानस मनी बाळगायला हवा. हे करण्यासाठी तुम्ही तुमच्या स्वप्नांची आणि आयुष्याच्या ध्येयाची मदत घेऊ शकता.
निरीक्षण : स्वसंभाषणाचं बारकाईनं निरीक्षण आणि प्रामाणिक अभ्यास करणं ही सगळ्यात महत्त्वाची कृती असेल. आपले दिवसभरातील विचार आणि त्यांचा होणारा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम हा या अभ्यासातील महत्त्वाचा घटक ठरेल.
थांबा, स्वत:ला ओळखा, बदल करा आणि मग पुढे जा : आपल्या स्वसंभाषणाचं निरीक्षण झाल्यावर आपणास कोणत्या नकारात्मक गोष्टींवर काम करावं लागेल, याचा एक सर्वसाधारण अंदाज येईल. ही यादी मनाशी बाळगून तिथून पुढे आपण वेगवेगळ्या परिस्थितीत कोणते विचार करतो आणि स्वत:शी काय बोलतो यावर बारीक नजर ठेवा आणि जेव्हाही एखादा नकारात्मक विचार मनात डोकावेल त्याला वेळीच थांबवून त्या जागी एक सकारात्मक विचार रुजवायचा प्रयत्न करा. एवढय़ा वर्षाची मनाची घडण बदलणे अवघड आहे; पण अशक्य नाही. फक्त या प्रक्रियेचं सातत्य हे सतर्क मनानं काही दिवस ठेवलात की नवीन सवय आपोआप लागेल.
तुमचं सकारात्मक स्वसंभाषण : तुम्ही आयुष्यात आज कुठे आहात आणि स्वत:ला कुठे पाहू इच्छिता त्यावरून तुम्ही तुमचं स्वसंभाषण बनवू शकता. पण त्यातल्या त्यात तुम्ही काही कॉमन म्हणजे सर्वानाच लागू पडतील अशी सकारात्मक वाक्ये वापरू शकता. जसं ‘मी खूष आहे’. ‘मी माझ्या आयुष्यात मिळालेल्या सर्वच गोष्टींसाठी समाधानी आहे’, ‘माझ्या सभोवताली खूप आनंद पसरला आहे.’ ‘मी सगळ्यांवर प्रेम करतो/ करते आणि सगळेच माझ्यावर प्रेम करतात’, ‘मी श्रीमंत आहे.’ यातील बरीच वाक्ये तुमच्या आजच्या परिस्थितीच्या विरूद्ध असतील, पण तुम्ही जितक्या जास्त वेळा या गोष्टी स्वत:ला मनापासून सांगाल तितक्या लवकर तुमच्या आयुष्यात चांगला बदल व्हायला सुरुवात होईल.
गमतीशीर उपाय : कोणतीही नवीन गोष्ट करायला घेतल्यावर सगळ्यात अवघड चॅलेंज समोर असतं ते म्हणजे सातत्य बाळगणे. आपण ब-याचदा चांगल्या गोष्टी सुरू केल्यावर काही दिवसांतच त्याबाबतीत असलेली उत्सुकता हळुहळू मावळू लागते. चांगल्या स्वसंभाषणाबाबतीत तुमच्याकडून असं होऊ नये म्हणून हे काही छोटे उपाय : तुमचं दिवसभरात ज्या वस्तूंकडे सगळ्यात जास्त लक्ष जातं त्या वस्तूंनी तुम्हाला स्वसंभाषणाची आणि तुमच्या ध्येयाची आठवण करून द्यायला हवी. उदा. घराच्या भिंती, आरसे बेडरूममधील छत, मोबाइल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, हातातील घडय़ाळ यांवर स्वसंभाषणाची वाक्ये किंवा त्यांची आठवण करून देणारी काही खूण असल्यास तुमचं काम अधिक सोपं होईल.
विचारांना खाद्य : काही दिवस रोज एकच पदार्थ खाऊन किंवा एकाच रंगाचे कपडे घालून कोणीही कंटाळेल. चांगल्या स्वसंभाषणाबाबतीतही असं होऊ शकतं. म्हणून वेळोवेळी यात नावीन्य आलं पाहिजे. त्याकरीता आपल्या मदतीला बाजारात असंख्य प्रोत्साहनपर पुस्तके, ऑडिओ सीडीज, इंटरनेटवर व्हीडिओ, लेख, सेमिनार्स असे अनेक उपाय उपलब्ध आहेत. आपल्याला आवडेल तो पर्याय निवडून आपल्या स्वसंभाषणात पटतील ते घटक समाविष्ट करून सातत्य बाळगू शकतो. खडतर ध्येयसिद्धी होईपर्यंत आणि ती टिकवण्यासाठी हे आपण करू शकतो. आणि हो आधी सांगितलेल्या डायरीमध्ये या सर्व उपायांचा अवलंब करताना महत्त्वाचे मुद्दे वेळोवेळी नमूद करायची सवय लावलीत तर तुमची स्वसंभाषणाची प्रक्रिया अधिक बळकट आणि सुंदर होईल. तुमचं आयुष्य बदलवण्यासाठी याच डायरीचा मोठा उपयोग होऊ शकतो. सुखी, समृद्ध, हसरं आयुष्य सर्वानाच हवं असतं, पण मग स्वत:च्याच विचारांमध्ये गरिबी, कटूता आणि दु:ख का? तुमच्याकडे चांगलं आणि वाईट यामधील एक निवडण्याची संधी असेल तर वाईट का निवडावं? कमीत कमी स्वत:शी बोलताना छान सकारात्मक आणि श्रीमंत विचार निवडू शकता ना? विचार करायला कोण अडवतंय तुम्हाला?