विधानसभा निवडणुकासाठी जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर नेमण्यात आलेल्या हजारो कर्मचा-यांना वेळत बॅलेट पेपर न मिळाल्याने त्यांना मतदानाला मुकावे लागले.
ठाणे- विधानसभा निवडणुकासाठी जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर नेमण्यात आलेल्या हजारो कर्मचा-यांना वेळत बॅलेट पेपर न मिळाल्याने त्यांना मतदानाला मुकावे लागले. लोकसभा निवडणुकीतही असाच प्रकार पोलिस कर्मचारी व निवडणुकासाठी नेमण्यात आलेल्या विविध आस्थापनांतील कर्मचा-यांबाबत घडला होता. बुधवारी ज्या हजारो कर्मचा-यांना मतदानापासून वंचित राहावे लागले, त्याला जिल्हा प्रशासनाच्या भोंगळ कारभार कारणीभूत आहे.
जिल्ह्यातील १८ विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी झालेल्या निवडणुकीसाठी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान केंद्र अधिकारी अशा तब्बल २८ हजार ४७९ जणांची तसेच ७ हजार शिपायांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर १३ हजार पोलिसांचा ताफा मतदानासाठी तैनात करण्यात आला होता. जे पोलिस कर्मचारी व इतर आस्थापनातील अधिकारी व कर्मचारी मतदानाच्या कामासाठी आहेत, त्यांना बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान करता येणार होते. त्या त्या आस्थापनांना जिल्हा प्रशासनाकडून हे पेपर वाटण्यात आले होते. ते भरून जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करायचे होते. पण अनेक कर्मचा-यांना बॅलेट पेपर मिळाले नसल्याने हजारो कर्मचारी मतदानापासून वंचित राहिले.