दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाडा, विदर्भाला यंदा पावसाने चांगलेच झोडपले. कोकणासह संपूर्ण राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक वर्षाची आकडेवारी मोडीत काढली. अतिवृष्टी आणि ओसंडून वाहणारी धरणे, नदी-नाले यामुळे अनेक गावांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मुसळधार पावसामुळे हजारो घरांची पडझड झाली, तर अनेकांचे बळी गेले. लाखो हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. तर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पूर आसवांचा..
वर्ष १९९४.. १९ वर्षापूर्वीचा पावसाळा.. प्रचंड कोसळणारा पाऊस अन् पुराचा धिंगाणा. नद्या, नाल्यांचे पाणी गावागावात शिरलेले, हजारो लोक बेघर, कित्येकांचे जीव गेले, शेकडो जनावरे मृत्यूमुखी पडलेली. राष्ट्रीय महामार्गापासून कित्येक रस्ते अनेक दिवस बंद. प्रचंड नासधूस आणि हाहाकार! तब्बल १९ वर्षाच्या कालावधीनंतर अशीच स्थिती पुन्हा भंडारासह पूर्व विदर्भावर आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने प्रचंड कहर केला आहे. आता पाऊस थांबला, पूर ओसरला. तरी आसवांचा पूर वाहतोय, उद्ध्वस्त शेतकरी आणि निवारा हरवलेल्या बेघरांच्या डोळ्यातून.
जूनच्या पहिल्या आठवडय़ापासूनच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि अन्य काही जिह्यांत पावसाचा कहर सुरू झाला तो आजपर्यंत कायम आहे. जून आणि जुलै या दोन महिन्यांच्या काळात या भागात सरासरी ६५० मिमी तर ऑक्टोबर अखेपर्यंत ९३०० मिमी पाऊस पडतो. मात्र, या वर्षी दोन महिन्यांतच १०७० मिमीच्या सरासरीने ७४९४ मिमी पाऊस कोसळला. नंतरच्या आठवडय़ात तर पावसाची सरासरी १२७७.७ मिमीवर जाऊन पोहोचली. संपूर्ण पावसाळ्याची कसर दोन महिन्यांतच भरून काढणा-या मुसळधार पावसाने पूर्व विदर्भात प्रचंड नुकसान केले आहे. वैनगंगा, बावनथडी, चुलबंद, सूर, गाढवी, वर्धा, वेना, कन्हान नद्यांना आलेल्या पुराने भंडारा आणि गोंदिया या जिह्यांत थैमान घातले होते.
पुजारीटोला, कालीसराड, शिरपूर, संजय गांधी, गोसे, ईरई अशा धरणांचे पाणी सोडल्यानेही नद्या फुगल्या आणि धरणांच्या खालच्या भागातील शेकडो गावांसह हजारो हेक्टर शेतीला फटका बसला. पुराचे पाणी अनेक गावांत विशेषत: सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरांमध्ये घुसून जनजीवन विस्कळीत झाले. घरात घुसलेल्या पाण्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा लागला, त्यांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले. अतिवृष्टी आणि पुरामुळे पूर्व विदर्भात शेती, घरेदारे आणि अन्य मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले. एकटय़ा भंडारा जिह्यात साडेतीन हजारांवर घरांची हानी झाली. शेकडोने घरे जमीनदोस्त झाली. अनेकांचा निवारा हरवला, कित्येक कुटुंबे बेघर झाली. पावसामुळे जीर्ण झालेल्या भिंती कोसळून भंडाऱ्यात दोन बालकांचा मृत्यू झाला. पुराच्या पाण्यात शेकडो जनावरे वाहून गेली, पूल ओलांडताना दोघांचा, तर वीज कोसळल्याने चार महिलांचा मृत्यू झाला.
दोन महिन्यांच्या कालावधीत पूर आणि अतिवृष्टीमुळे सर्वाधिक फटका बसला तो शेतक-यांना, सुरुवातीच्या काळात पावसामुळे भाताच्या नर्सरीची कामे लांबली. नंतर भात लावणीला विलंब झाला. पाऊस सुरू असल्याने भाताची लावणी वाहून गेली तर काही भागात सडली. परिणामी, शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागली. संकटाचे असेच चक्र चालू होते आणि तिस-यांदा केलेली पेरणीही वाया गेली. भाताबरोबरच तूर, सोयाबीन, ऊस, कापूस, भाजीपाला आणि अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले. भंडा-यात खरिपाचे क्षेत्र दोन लाख हेक्टर असून, जवळपास ६० हजार हेक्टर शेतीत धान्याचा एक दाणाही उगवणार नाही, अशी स्थिती आहे. हीच परिस्थिती आजूबाजूच्या गोंदिया, चंद्रपूर व अन्य जिह्यातील शेतीची आहे.
भंडा-यासह पूर्व विदर्भात तलावांची संख्या सर्वाधिक आहे. मच्छीमारांचे जीवन यावरच अवलंबून आहे. पण, अतिवृष्टीमुळे अनेक तलाव फुटून मत्स्यबीजे, आणि मासोळ्या वाहून गेल्याने मच्छीमारांवर आर्थिक संकट कोसळले आहे. दरम्यान, शेतक-यांना भरपाई मिळावी म्हणून विदर्भातील खासदार व मंत्र्यांनी केंद्र सरकारकडे धाव घेतली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि केंद्रातील मंत्र्यांचा एक गट विदर्भाच्या दौ-यावर येणार आहे. हा दौरा महापुराने उद्ध्वस्त झालेल्या शेतक-यांना लाभदायक ठरतोय का, याकडे सर्वाचे डोळे लागले आहेत.
सिंधुदुर्गात पावसाचा विक्रम..
सिंधुदुर्ग आणि पाऊस याचे सख्य शतकानुशतके असल्याचे आपणास दिसते. पावसाळय़ात बेसुमार पाऊस, हिवाळ्यात भरपूर थंडी, आणि उन्हाळय़ात कडक ऊन.. तीनही ऋतू जे जे निसर्गाकडून देता येईल ते ते भरभरून देण्याची परंपरा. यामुळे ही भूमीही तशीच! या वर्षी गेल्या २० वर्षाचा विक्रम पावसाने मोडीत काढला आहे. शुक्रवापर्यंत सिंधुदुर्गात दोन हजार ८८१ .१५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून गेल्या २० वर्षामध्ये ही सर्वाधिक नोंद आहे.
महाराष्ट्रात अतिवृष्टीचे सावट पडले आहे. पण कोकणात सर्वाधिक पाऊस पडूनही नुकसानीची आकडेवारी तेवढीशी मोठी नाही. अतिवृष्टीलाही सामोरे कसे जायचे, हे कोकणला चांगलेच माहीत आहे. तरीही पावसाने या वर्षी सहा बळी घेतले. तर तीनशेंहून अधिक घरांचे नुकसान झाले. शेती कित्येक तास पाण्याखाली राहिल्यामुळे हजारो एकर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले. परंतु कोकणातील शेतक-यांची पावसाविषयी तक्रार नाही.
राज्यातील अन्य भागांप्रमाणे कोकणमधील शेतकरी छोट्यामोठ्या गोष्टींसाठी सरकारकडे हात पसरतात. निसर्गाशी थेट सामोरे जात आपणच कसे सावरू याचा ते प्रयत्न करत असतात. जिल्ह्यात जुलै महिन्यामध्ये पडलेल्या सर्वाधिक पावसात सर्वाधिक नुकसानही झाले आहे. आतापर्यंत खासगी व सरकारी मालमत्तेचे मिळून एक कोटींहून जास्त नुकसान झाले आहेत. जिल्ह्यात पुरामुळे २४३ गावे बाधित झाली असून, ५९८ कुटुंबांचे नुकसान झाले आहे.
पावसामुळे जिल्ह्यात तालुकावार या नुकसानीची आकडेवारी लक्षात घेता कुडाळ तालुक्यात ४८, सावंतवाडी तालुक्यात ३९, दोडामार्गात १६, देवगड तालुक्यात ३०, वैभववाडी तालुक्यात नऊ, कणकवलीत ४२, वेंगुर्लेत ३५ गावे, तर मालवण तालुक्यात २४ गावांना पुराचा फटका बसला होता.
सर्वाधिक पाऊस २०१३ मध्येच
या वर्षी पडलेल्या पावसाने गेल्या १० वर्षातील सर्वाधिक सरासरी गाठली असल्याचे आपल्या आकडेवारीतून दिसून येते. २६ जुलैपर्यंत २०१३ पर्यंत जिल्ह्यात ३०४१.०० पावसाने मिलिमीटरचा पल्ला गाठला होता. म्हणजे या वर्षी गेल्या १० वर्षाचे रेकॉर्ड ब्रेक होण्याची शक्यता आहे. एक कोटीँहून जास्त नुकसानही २०१३ मध्येच झालेले आहे. पावसाने सध्या अल्पशी विश्रांती घेतली आहे. यामुळे हिरवेगार कोकण अतिवृष्टीच्या सावटाखाली असूनही सावरले आहे. शेती पुन्हा डोलू लागली आहे. पाण्याखाली गेलेल्या घरांची डागडुजी करण्यात शेतकरी व्यस्त आहेत.
शेती नापीक होण्याची चिंता
मागील पन्नास वर्षात म्हणजे सन १९६२ नंतर जिल्ह्यात संपूर्ण वर्षाच्या सरासरीइतका पाऊस जुलै महिन्यापर्यंत झाला. या पावसाने जिल्ह्यातील खरीप पिकांना मोठी हानी झाली. असून सोयाबीन या पिकावर खूप मोठा फटका बसला आहे. तर त्याचबरोबर हजारो हेक्टर जमिनीवरील माती पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेली आहे. त्यामुळे शेतजमीन नापीक होण्याची समस्या निर्माण झाली आहे. तसेच चक्क ३०० मीटर रेल्वेमार्ग पावसाने वाहून नेला होता. यामुळे मुंबई-कोलकाता हा रेल्वेमार्ग पावसामुळे तीन दिवस बंद पडल्याची घटना दीडशे वर्षाच्या रेल्वे इतिहासात याच पावसाळ्यात पहिल्यांदा घडली.
शेत जमिनीला मोठा फटका
शेतीमध्ये ५० टक्क्यांच्या आत ३० हजार ९१५.३० हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर ५० टक्क्यांवर ४० हजार ९४४.४० हेक्टर जमिनीवर शेतीपिकांचे नुकसान झालेले आहे. या पावसामुळे १० जणांना जीव गमावावा लागलेला आहे. तर आठ व्यक्ती जखमी झाल्या असून चार हजार २८३ घरांचे अंशत: नुकसान झालेले आहे. तसेच ९३ छोटी तर ६७ मोठी जनावरे या पावसामुळे दगावली आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. १९ जुलै २०१३ रोजी झालेल्या पावसाने िहगणघाट, समुद्रपूर, सेलू या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.
धरणे भरली तुडुंब
वर्धा जिल्ह्यात सरासरीपेक्षाही अधिक पाऊस पडल्यामुळे जिल्ह्यातील सर्व धरणे शंभर टक्के भरली असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. निम्न वर्धा प्रकल्पामध्ये अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे ३१ दरवाजांपैकी २८ दरवाजे पाच इंचापर्यंत उघण्यात आले असून, ७३७ क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. निम्न वर्धा प्रकल्पातून वर्धा नदीत पाणी सोडण्यात येत असल्यामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अप्पर वर्धा प्रकल्पाचे सात दरवाजे उघडण्यात आले असून, त्यातून ४३४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. एरवी पूर्ण पावसाळा उलटून गेला तरी न भरणाऱ्या बोरसिंचन प्रकल्पातही ९४ टक्के जलसाठा संचय झाला आहे. या प्रकल्पाचे चार दरवाजे १५ सेंटिमीटर, नांद प्रकल्पाचे सात दरवाजे २५ सेंटिमीटर, बेंबळा प्रकल्पाचे दोन दरवाजे ५० सेंटिमीटर, लाल नाला प्रकल्प व नांदप्रकल्पाचे दोन दरवाजे २५ सेंटिमीटर, डगाव प्रकल्पाचे सात दरवाजे २५ सेंटीमीटर, वर्धा कार नदीप्रकल्पाचे १४ दरवाजे उघडण्यात आले असून, अजूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील वीसही लघु प्रकल्प शंभर टक्के भरले असून त्यापैकी सोळा प्रकल्पांतील पाणी सरासरी पाच ते सात सेंटिमीटरने सांडव्यावरून वाहात आहे.
अतिवृष्टी व पुरामुळे १४ व्यक्तींचा मृत्यू
जिल्ह्यात जून व जुलै महिन्यात अतिवृष्टी, पूर तसेच वीज पडून १४ व्यक्ती दगावल्या आहेत. त्यापैकी १२ मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना १७ लाख २५ हजार रुपयांची मदत जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दीड लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे पशुधनाचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून जिल्ह्यात १६० जनावरे दगावली आहेत.
पावसामुळे ४४५ गावे, ४४३ घरांचे नुकसान
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात चार हजार ७२६ घरांचे अंशत: व पूर्णत: नुकसान झाले आहे. त्यामध्ये ४४३ घरे पूर्ण पडले असून अंशत: चार हजार २८३ घरांचे नुकसान झाले आहे. वर्धा तालुक्यातील ५८६ घरांचे अंशत: व पूर्णत:, देवळी ७६१, सेलू, एक हजार ७८४, आर्वी ८५६, आष्टी २२७, कारंजा १४, िहगणघाट २१४, तर समुद्रपूर तालुक्यातील २८२ घरांचा समावेश आहे. अतिवृष्टी व पुरामुळे ४४५ गावे, ४४३ घरांचे नुकसान झाले आहे.
गडचिरोलीत शेती पाण्याखाली
अतिवृष्टी व जिल्ह्यातील विविध नद्यांना आलेल्या पुरामुळे गडचिरोलीतील सुमारे २२ हजार हेक्टर (५७ हजार एकर) क्षेत्रावरील धान (भात) व विविध पिके नष्ट झाली आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सहा ऑगस्ट २०१३ पर्यंत केलेल्या सर्वेक्षणानुसार व संकलित केलेल्या माहितीनुसार नुकसान झालेल्या २५ हजार ९०५ हेक्टर क्षेत्रापैकी १६ हजार ३९८ हेक्टर क्षेत्रामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. तर सात हजार ५०६ हेक्टर क्षेत्रामध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात नुकसान झाले आहे.सहा ऑगस्टपर्यंत अतिवृष्टी व पुरामुळे आठ जणांना जीव गमवावा लागला. पावसामुळे पीक वाया गेल्याने शेतक-यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
पुरामुळे मुलचेरा तालुक्यातील अतिदुर्गम गरंजी गावाला जोडणारा रस्ता वाहून गेला. या गावात अद्याप विद्युत मीटर बसवण्यात न आल्याने गावकऱ्यांना अंधारात राहावे लागत आहे. अतिवृष्टीमुळे अनेक शेतक-यांनी केलेली लावणी वाहून गेली. अहेरी तालुक्यातील देवलमरी भागात तीन वेळा आलेल्या पुराचा मच्छीमारांना मोठा फटका बसला आहे. पुराच्या पाण्यात त्याच्या नावा वाहून गेल्याने त्यांच्या समोर उदरनिर्वाहाचे मोठे संकट उभे राहिले आहे.
कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा परिसरातील सिन्देवाही, खामतळा, आंबेटोला, फुलकोडे येथील १० विद्युत खांब अतिवृष्टीमुळे वाहून गेल्याने फुलकोडे, सिन्देवाही, आंबेटोला, या गावांचा विद्युतपुरवठा २८ जुलैपासून बंद आहे. तसेच या भागातील कातलवाडा, चरवीदंड, दामेश्वर, फरीकसारी, धनेगाव, देवसरा, जयसिंग टोला, खामतला, सिन्देवाही, उपदल्ली, मूरआडी, सूरमुंडी या गावांना पुराच्या पाण्याने वेढले होते. धानोरा तालुक्यातील रस्ते, पिके व घरांचे कोटय़वधींचे नुकसान झाले आहे.
४०१४ घरांची पडझड
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे आतापर्यंत चार हजार १४ घरांची पडझड झाली आहे. तर, आतापर्यंत केवळ ५८५ पूरबाधित लोकांना केवळ एक लाख ७१ हजार ९५० रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यात तीन हजार ८२३ घरे अंशत: तर १९१ घरे पूर्णत: कोसळली. चामोर्शी या एकाच तालुक्यात ९०७ घरांची पडझड झाली आहे. त्याशिवाय, गडचिरोली (२३), धानोरा (५९), कोरची (७५), कुरखेडा (२१), देसाईगंज (४), आरमोरी (६) घरे कोसळली.
अमरावतीत हजारो बेघर
पुरामुळे अमरावती विभागात सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले, तर ६० जणांचा बळी गेला. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक २९ नागरिक मृत्युमुखी पडले. एकटय़ा वाशीम जिल्ह्यात १४ हजारांपेक्षा अधिक कुटुंबांना बेघर होण्याची वेळ आली आहे.
जून व जुलै या दोन महिन्यांत पावसाने अमरावती विभागाची दयनीय अवस्था केली. अमरावती विभागात गेल्या दोन महिन्यांत पडलेल्या पावसामुळे एकटय़ा यवतमाळ जिल्ह्यात तब्बल दोन कोटी ८९ लाख ७१ हजार २४ रुपयांच्या सार्वजनिक सुविधांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे १ लाख ९१ हजार ८२४ हेक्टर शेत जमिनीवरील पिके खराब झाली आहेत. १२ हजार २३४.७५ हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. पावसामुळे दोन महिन्यांत ६० जणांचा बळी गेला, यातील सर्वाधिक २९ बळी यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. त्यानंतर अमरावती १५, अकोला पाच, बुलडाणा आठ व वाशीम येथे तीन जणांचा मृत्यू झाला. पावसामुळे २१ हजार ५२५ कुटुंबे बाधित झाली आहेत. तर, ७५ हजार ८७६ जणांना पावसाचा फटका बसला. १० हजार १०८ पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. विभागातील १ हजार ६६१ गावे बाधित झाली, तर २७ नागरिक पावसामध्ये झालेल्या अपघातात जखमी झाले. पावसामुळे अनेक जनावरे दगावली. २४ हजार ८८३ घरांचे नुकसान झाले.
निम्म्या मराठवाड्यात ओला दुष्काळ
नांदेडसह परभणी, हिगोंली, बीड या चार जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली आहे. पैनगंगा, गोदावरी नदीच्या पुरामुळे १५० हजार हेक्टर पिके वाहून गेली आहेत. या संकटामुळे चार जिल्ह्यांतील लाखो शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रशासनाने उशिरा का होईना, मात्र पुरामुळे नुकसान झाल्याची कबुली देत सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. तर, या चार जिल्ह्यांत ओला दुष्काळ जाहीर करून त्वरित मदत देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
गोदावरी ,पैनगंगा नदीला तीन वेळा पूर आला. या पुरामुळे हजारो हेक्टर जमिनीवरील पिके खुरडून गेली, या जमिनीत आता दुबार पेरणीही शक्य नाही. इतकेच नाही तर या जमिनीत पुढे रब्बीचे पीक घेणेही शक्य नाही. मराठवाडय़ातील चार जिल्ह्यांत वार्षकि सरासरीच्या दीडपट पाऊस आताच झाला आहे. मोठय़ा धरणांतील पाणीसाठा ३३ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. मात्र, मध्यम व लघु प्रकल्पांतील पाणीपातळीत काही वाढ झालेली नाही. या प्रकल्पांमध्ये अद्याप २७ ते २८ टक्केच पाणी आहे. यंदा मोठय़ा पावसाची नोंद झाली आहे. दोन महिन्यांत ९१ टक्के पाऊस झाला असून, िहगोलीत पाच वेळा अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आल्याने शेती खुरडून गेली. सखल भागातील पिकांमध्ये पावसाचे पाणी चार ते पाच दिवस साचून राहिल्यामुळे पिके पिवळी पडली आहेत. दरम्यान, विदर्भातही जादा पाऊस झाल्यामुळे पैनगंगा नदीला पूर आल्याने या पुरात शेती वाहून गेली आहे. शेती वाहून गेल्याने हिमायतनगर आणि रायपूर तांडा येथील दोन शेतक-यांनी आत्महत्या केली.
जालन्यात जवळपास सर्वच तालुक्यांत समाधानकारक पाऊस झाला असतानाही २४ लघु तर चार मध्यम प्रकल्पांतील पाणीपातळी ही जोत्याखाली असल्याचे लघुपाटबंधारे विभागाने जारी केलेल्या अहवालात नमूद केले आहे. जिल्ह्यात ४९३ मिमी पाऊस झाला आहे. जालन्यात एकीकडे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत सरासरीच्या ५० टक्के पाऊस झाला आहे, असे असताना कल्याण मध्यम प्रकल्प, अप्पर दुधना प्रकल्प, धामना जीवरेखा, या प्रकल्पांची पातळी जोत्याच्या खाली आहे. जालना तालुक्यातील वाकी, दरेगाव, जामवाडी, नेर, निरखेड तांडा, िपपळवाडी, कुंभेफळ यातील नेर तसेच पिंपळवाडी हे तलाव कोरडे आहेत. बदनापूर तालुक्यातील आन्वी सोमठाणा, राजेवाडी या तलावांची पातळी जोत्याखालीच आहे. जिल्ह्यातील किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर या चार तालुक्यांत पावसाने कहर केला असून या तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षा अधिक शेतीचे नुकसान झाले आहे.
कुठे पाऊस, कुठे दुष्काळ
पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील आघाडीच्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात आज निम्म्याहून अधिक पावसाळा झाला असताना दोन परस्परविरोधी चित्रे दिसून येत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगा लगतच्या शाहूवाडी-आजरा-चंदगडसह गगनबावडा या तालुक्यांत आता पावसामुळे ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी होत आहे. चंदगड तालुक्यातील दोन दुर्गम खेडेगावांमध्ये, तर चेरापुंजीहून अधिक पावसाची विक्रमी नोंद करण्यात आली. जिल्ह्यात आज अखेर १७ हजार ७७६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याउलट परिस्थिती सांगली जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यात आडपाटी, जत, कवठे महाकाळ, म्हसवड या गावांमधील दुष्काळी परिस्थितीमुळे सुरू झालेल्या जनावरांच्या चारा छावण्या अद्याप सुरू आहेत. येत्या १५ ऑगस्टपर्यंत त्या सुरू असल्या तरी गवत उगवेपर्यंत या चारा छावण्या सुरूच ठेवाव्यात, अशी मागणी येथील शेतकरी व ग्रामस्थ करत आहेत. याशिवाय सांगली जिल्ह्यात अद्याप २२० टँकरने ८५हून अधिक दुर्गम खेडेगावांना पाणीपुरवठा करावा लागत आहे.