कित्येकांची तक्रार ही असते की वेळ कमी पडतो. खरं तर वेळ हा तसा तुमच्या आयुष्याशीच बांधलेला असतो. त्यामुळे उपलब्ध वेळ हाच तुमचं आयुष्य असतो. मग याच क्षणांचा सुयोग्य वापर करून आयुष्य सुंदर बनवता येणं सहज शक्य आहे.
आपल्या संपूर्ण दिवसभरात कमीत कमी एकदा तरी थोडया वेळासाठी आपण शून्यात हरवून जातो. प्रत्येकाच्या त्या वेळेस असणा-या मन:स्थितीनुसार तो शून्य वेगवगेळ्या गोष्टी समोर आणून सोडतो आणि आपण त्या विचारांच्या विळख्यात अडकतो. तेवढ्यात काहीतरी होतं आणि तो शून्य फुटतो आणि आपण पुन्हा सद्यस्थितीत परततो; पण कधी त्या शून्यातून बाहेर आल्यावर विचार करून बघा की आपण काय विचार करत आहोत.
बहुतांश लोकांच्या मनात भूतकाळात घडलेल्या वाईट गोष्टी, आलेलं अपयश, काहीतरी न करता येण्याची खंत किंवा भविष्यात काहीतरी करण्याची, मिळवण्याची इच्छा असे विचार असतात. विचार टिकतात ते थोडया वेळासाठी आणि पुन्हा आपण स्वत: स्वीकारलेल्या सद्यस्थितीत परततो. रोज असंच होतं! होय रोज! पण त्या शून्यातल्या विचारांना चांगल्या भविष्यासाठी प्रत्यक्षात बदलण्याची सुरुवात आपण करतच नाही, असं का? याची बरीच कारणं असतात. स्वत:च्या कार्यक्षमतेवर शंका, अपयशाची भीती, प्रतिकूल आर्थिक किंवा कौटुंबिक परिस्थिती वगैरे वगैरे. पण आपण आज ही परिस्थिती का नाही बदलत यापेक्षा का बदलावी, कशी बदलावी आणि केव्हा बदलावी यावर थोडासा विचार करूया.
का?
माणूसजातीचा स्वभाव दोनच प्रकारचा असतो असं मला वाटतं. असंतुष्ट आणि अल्पसंतुष्ट. त्यातला असंतुष्ट प्रकार मला आवडतो. अशा माणसांमध्ये अधिकाधिक मिळवण्याची इच्छा अमर्याद असते. आणि ही इच्छा त्यांना कधीच स्वस्थ बसू देत नाही, पण असंतुष्ट लोकांचेही ३ प्रकार असतात. एक म्हणजे असे लोक जे आपल्या इच्छापूर्तीसाठी अमर्याद मेहनत घ्यायची तयारी बाळगतात आणि अमलात आणतात. दुसरा प्रकार म्हणजे असे लोक जे आपल्या अमर्याद इच्छापूर्तीसाठी वाटेल ते करायला तयार असतात, मग भलेही त्यासाठी अनैतिक, अमानवी असे मार्ग स्वीकारावे लागले तरी त्यात त्यांना गैर काहीही वाटत नाही आणि तिसरा प्रकार ज्यात बहुतांश लोक मोडतात. असंख्य इच्छा बाळगणारे; पण त्यासाठी काहीही न करणारे. हा सगळ्यात विचित्र प्रकार म्हणता येईल. याच लोकांकडे स्वप्नासाठी, इच्छापूर्तीसाठी काहीही न करण्याची असंख्य कारणे सापडतील.
अल्पसंतुष्ट लोकांची दुनियाच वेगळी असते. ते आयुष्याला जगण्याच्या गरजेइतकंच मोजतात. जगात असलेल्या असंख्य संधी त्यांच्या जगण्याच्या गरजेच्या चौकटीत शिरूच शकत नाहीत. अकार्यक्षम, असंतुष्ट आणि अल्पसंतुष्ट लोकांसाठी ‘का?’ हा प्रश्न अधिक चांगल्या पद्धतीने जोडला जाऊ शकतो. अशा लोकांनी आपली मन:स्थिती का बदलावी? खरं तर मोठी स्वप्नं, अमाप पैसा, संपत्ती, ऐषआरामी जीवन सगळ्यांच्याच मनात असतात. डोळे सताड उघडे ठेवलेत तर असंख्य संधी रोज भोवताली वावरताना दिसतील. आयुष्यात मिळवण्यासाठी अमर्याद गोष्टी समोर ठेवल्या आहेत. गरज आहे ती फक्त भय विसरून आळस झटकून ते पहिलं पाऊल उचलण्याची.
कसं?
का? याच प्रश्नाला जोडून दुसरा प्रश्न येतो ‘कसं?’ उत्तर आहे ‘किळस’. आश्चर्य वाटलं ना? पण खरं तर कोणताही बदल आणण्यासाठी एका झटक्याची किंवा ‘ट्रीगर’ची गरज असते. हा ट्रीगर प्रत्येकाला वेगळा असू शकतो. माझ्या मते हा ट्रीगर जरा दणकट असावा, आपल्या स्वाभिमानाला हादरवणारा. तेथून गोष्टी बदलण्याची अमाप ऊर्जा बाहेर पडू शकते. म्हणून त्यातलंच एक सोपं साधन मी सुचित करतो. ‘स्वत:ची किळस’, खरं तर स्वत:वर किळस येणं अवघड असतं, पण आपण आजवर काय मिळवलंय, आपल्याला काय हवंय आणि आपण ते मिळवण्यासाठी किती मनापासून मेहनत घेतोय याचा आढावा घेतला तर स्वत:वर किळस सहज येते. हीच किळस तुम्हाला स्वत:ला आव्हान करेल आणि किळस किती प्रखर किंवा बोचणारी आहे, त्यावर तुमच्यातील बदल होण्याचा वेग ठरेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, स्वत:वर किळस येणं हा अनुभव नकारात्मकतेकडे कलता कामा नये. ही गोष्ट फक्त स्वत:मध्ये सकारात्मक बदल आणण्यासाठीच वापरली गेली पाहिजे.
केव्हा?
जन्म आपल्यासोबत एक अटळ घटना घेऊन येतो. सर्वज्ञात आहे की स्वत:चा मृत्यू कोणीही सांगू शकत नाही. केव्हा, कसा आणि कुठे होईल. तरीही आपण आपल्या स्वप्नांच्या दिशेने करावयाचे काम भविष्यात ढकलत असतो. मला व्यायामशाळेत जायला सुरुवात करायची आहे. १ तारखेपासून किंवा सोमवारपासून मी पुढल्या महिन्यात संगीत शिकण्यासाठी क्लास लावेन. मला भविष्यात स्वत:चा व्यवसाय सुरू करायचाच आहे. अशा अनेक गोष्टी आपण रोज ऐकतो, बोलतो, त्यावर विचार करतो. माझे यावर प्रश्न आहेत..आज किंवा आत्ता का नाही? सगळ्याच गोष्टींसाठी मुहूर्त असावा का? भविष्यात काही होण्याची वाट बघण्यापेक्षा आज, आत्ता भविष्य आपल्या इच्छेप्रमाणे घडवण्यासाठी आपल्याला कारण का हवंय?
समजा, तुम्हाला कळलं की येणा-या काही दिवसांत तुमचा मृत्यू होणार आहे, आणि तुम्हाला आयुष्यात मोठं काहीतरी करायचंय, तरीही तुम्ही त्या मोठया कामाची सुरुवात उद्यावर ढकलाल? हे उदाहरण म्हणून ठीक आहे, पण तसंही मृत्यू अनिश्चित पण अटळ आहे. त्यामुळे त्या उदाहरणाचं आपल्या आजच्या आयुष्याशी तेवढंच साधम्र्य आहे हे मान्य करायला हवं.
आपल्या आयुष्यात काही मोजकेच वर्षे, महिने, दिवस, तास, किंवा क्षण आहेत. या प्रत्येक क्षणाचा आपलं आयुष्य अधिक सुखी, सुंदर, अधिक यशस्वी बनवण्यासाठी वापर कसा करायचा ही निवड तुमची. अजूनही विचार पडलाय का, की हे सर्व सुरुवात करण्यासाठी योग्य वेळ कोणती?