राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने या वर्षी होणा-या ५५व्या मराठी राज्य नाटय स्पर्धेकरिता ३३७ अर्ज आले आहेत. ५४व्या राज्य नाटय स्पर्धेत ही संख्या जवळपास २७५ इतकी होती. या वर्षी स्पर्धकांचा प्रतिसाद वाढला, प्राथमिक फेरीत सादर होणा-या नाटकांची संख्य वाढणार आहे, मात्र अंतिम फेरीत जाण्याची संधी १९ नाटकांनाच मिळणार आहे. त्यामुळे हा वाढलेला प्रतिसाद एक आव्हान ठरले आहे.
नाटकाच्या वेगवेगळ्या स्पर्धा कलावंतांचा उत्साह वाढवत असतात. त्यात वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धासह कामगार कल्याण मंडळ आणि राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने होणा-या मराठी राज्य नाटय स्पर्धा हौशी रंगकर्मीना मिळालेला मोठा रंगमंच आहे. महाराष्ट्र शासनाच्या या दोन्ही स्पर्धानी सातत्य राखून पन्नाशी पार केली आहे.
शासकीय स्तरावर अशा दोन-तीन अंकी नाटकांच्या स्पर्धा आयोजित करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, त्याचा सार्थ अभिमान रंगकर्मीना आहे. त्याबद्दलची कृतज्ञता वेळोवेळी व्यक्त झाली आहे.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने होणा-या ५५व्या हौशी मराठी राज्य नाटय स्पर्धेच्या प्रवेश प्रक्रियेला ऑगस्टमध्ये सुरुवात झाली. संचालनालयाकडे राज्यभरातून या वर्षी उत्तम प्रतिसाद मिळाला. अर्जाची तपासणी झाली आणि तब्बल ३३७ नाटयसंस्थांचे अर्ज प्राथमिक फेरीसाठी निवडण्यात आलेत.
कुठल्याही स्पर्धेला प्रतिसाद वाढणे ही बाब अभिमानाची असते. त्यातून आयोजकांचा उत्साह वाढत असतो. तसाच उत्साह या वर्षी संचालनालयाचा वाढला असेल, यात दुमत नाही. वाढत्या प्रतिसादानुसार या स्पर्धेतील काही नियमांत बदल करण्याची गरज आहे. त्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे प्राथमिक फेरीतून निवड होणा-या नाटकांची संख्या होय.
संचालनालयाकडे आलेल्या या प्रवेश अर्जानुसार ही ३३७ नाटकं प्राथमिक फेरीसाठी वेगवेगळ्या १९ केंद्रांवर सादर होणार आहेत. म्हणजे एका केंद्रावर कमीत कमी १७ ते १८ नाटकांचे प्रयोग होतील. या स्पर्धेच्या नियमानुसार प्रत्येक केंद्रावरून अंतिम फेरीसाठी एकच नाटक निवडण्यात येते. दुस-या आणि तिस-या क्रमांकाच्या नाटकाला पुरस्कार दिले जातात, मात्र त्यांना अंतिम फेरीत जाण्याची संधी मिळत नसते.
५४व्या राज्य नाटय स्पर्धेचा विचार करता सरासरी एका केंद्रावर १३ ते १७ नाटकांचे प्रयोग सादर झाले होते. त्यातून प्रत्येक केंद्रातून एक याप्रमाणे राज्यभरातील १९ आणि गोवा आणि दिल्ली केंद्रातून आलेले प्रत्येकी एक अशा टॉप २१ नाटकांची अंतिम फेरी पनवेलमध्ये घेण्यात आली होती.
१४-१५ नाटकांतून अंतिम फेरीसाठी एक नाटक निवडणे हेसुद्धा दुस-या क्रमांकाच्या नाटकावर अन्यायच होता. आता ५५व्या राज्य नाटय स्पर्धेत हे प्रमाण वाढणार असून १७-१८ नाटकातूनही एकच नाटक निवडणे हे हौशी कलावंतांच्या दृष्टीने अन्यायकारक ठरणार आहे.
प्रत्येक केंद्रावर सादर होणा-या नाटकाची संख्या लक्षात घेऊन आता किमान दोन नाटकं अंतिम फेरीसाठी निवडली जावीत, ही हौशी रंगमित्रांची अपेक्षा आहे. अशी दोन नाटकांची निवड केल्यास अंतिम फेरीतील नाटकांची संख्या वाढून ३८वर जाईल. त्यात एका गोवा केंद्रावरील नाटकाची भर पडून एकूण ३९ नाटकांची अंतिम फेरी घेता येईल.
महत्त्वाचे म्हणजे या वर्षी दिल्ली केंद्रावर स्पर्धा होणार नसल्याने अंतिम फेरीत येणारे एक नाटक कमी होणार आहे. ती उणीव भरून काढण्यासाठी गोव्यातूनही दोन नाटकांची निवड व्हावी आणि टॉप ४० नाटकांची अंतिम फेरी घेता येईल. अर्थात या प्रस्तावाला राज्य सरकारची परवानगी लागणार आहे.
नाटकांच्या संख्येनुसार अंतिम फेरीत नाटकं सादर होण्याची एक गुरुकिल्ली ५-६ वर्षापूर्वी होती. ज्या केंद्रावर ९पेक्षा कमी नाटकांचे सादरीकरण झाले, त्या केंद्रावरून एका नाटकाला अंतिम फेरीत प्रवेश मिळायचा. नऊपेक्षा जास्त आणि १८ पेक्षा कमी नाटकांचे सादरीकरण होणा-या केंद्रावरून दोन नाटकांची निवड अंतिम फेरीसाठी व्हायची. हा नियम मोडीत काढला आणि १२ ते १४ नाटकंच एका केंद्रावर होतील आणि त्यातून एकच नाटक निवडले जाईल, असा नवा नियम आला.
हळूहळू केंद्रांवर सादर होणा-या नाटकांची संख्या वाढू लागली. तरीही अंतिम फेरीसाठी एकच नाटक निवडण्याची प्रक्रिया मात्र कायम राहिली. दरवर्षी हे प्रमाण वाढते आहे. या वर्षी तर एका केंद्रावर किमान १७ नाटकांचे सादरीकरण होणार आहे. त्यातूनही एकच नाटक निवडले गेले तर हा नियम हौशी कलावंतांचा उत्साह मारणारा ठरणार आहे.
प्रतिसाद वाढला पण कलावंताचा उत्साह मारला गेला, असे खापर कुणी आयोजकांवर फोडू नये, यासाठी एका केंद्रावरून एकच नाटक पाठवण्याच्या नियमावर फेरविचार करण्याची गरज आहे. दोन नाटकं पाठवणे शक्य नसल्यास प्रवेशिकांच्या संख्येनुसार केंद्रांची संख्या वाढवावी लागणार आहे. एका केंद्रावर १२ नाटकांपेक्षा जास्त प्रयोग होणार नाहीत, असे नियोजन तरी केले पाहिजे.
त्यातही केंद्र वाढवण्यापेक्षा एका केंद्रातून दोन नाटकं अंतिम फेरीसाठी निवडणे हे रंगकर्मसाठी उचित ठरणार आहे. कारण एकच नाटक निवडण्याचा नियम येण्यापूर्वी दुस-या क्रमांकाच्या नाटकालाही अंतिम फेरीचे तिकीट मिळत होते, तेव्हा अनेकदा प्राथमिक फेरीत दुसरे आलेले नाटक अंतिम फेरीत सवरेत्कृष्ट ठरल्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे दुस-या क्रमाकांवर येणा-या नाटकावर आता अन्यायच होत आहे, हे या स्पर्धेचा इतिहास सांगतो आहे, हे आयोजकांनी लक्षात घेतले पाहिजे.
या वर्षी ज्या १९ केंद्रांवर ही स्पर्धा होणार आहे, त्यात मुंबईत रवींद्र नाटय मंदिर, साहित्य संघ मंदिर आणि यशवंत नाटय मंदिर असे तीन केंद्र असून एकूण ५३ नाटके सादर होणार आहेत. ठाणे जिल्हयात ठाण्याचे डॉ. काशिनाथ घाणेकर नाटयगृह आणि कल्याणचे आचार्य अत्रे रंगमंदिर असे दोन केंद्र असून त्यासाठी ४० अर्ज आहेत. रत्नागिरी (१७), पुणे (१८), पिंपरी-चिंचवड (१९), सोलापूर (१५), सांगली (१९), कोल्हापूर (१६), नाशिक (२१), अहमदनगर (१५), जळगाव (२०), औरंगाबाद (१९), नांदेड (१५), नागपूर (१८), अमरावती (१७) आणि चंद्रपूर (१५) या प्रमाणात या केंद्रांवर नाटकांचे सादरीकरण होण्याची शक्यता आहे. सादर होणा-या नाटकांची संख्या लक्षात घेता प्रत्येक केंद्रावरून दोन नाटकं अंतिम फेरीसाठी निवडली पाहिजेत, अशी हौशी रंगमित्रांची भावना आहे. त्यांच्या भावनेचा सन्मान आयोजक करतील, अशी अपेक्षा करू या.