राष्ट्रीय महामार्गावरील १०० कोटींहून कमी खर्च असलेले टोलनाके बंद करण्याबाबत केंद्र सरकार विचार करत असल्याची माहिती सोमवारी वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
नवी दिल्ली- देशातील १०० कोटींहून कमी खर्चाचे टोलनाके बंद करण्याबाबत केंद्र सरकार विचार करत असल्याची माहिती सोमवारी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. राज्यसभेतील प्रश्नोत्तरादरम्यान त्यांनी ही माहिती सादर केली.
याआधी देशातील ६२ टोलनाके बंद केल्याचे त्यांनी राज्यसभेत सांगितले. त्यासोबत ई-टोलची सुविधा सुरु झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. ई- टोलमुळे टोलनाक्यांवर लागणारा कालावधी कमी झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
देशातील १०० कोटींहून कमी खर्चाचे टोलनाके बंद करण्याबाबत सरकार विचाराधीन असून याबाबतचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत मंजूरीसाठी ठेवण्यात येईल, असे गडकरी म्हणाले.
अन्यायकारक टोलवसुलीमुळे जनतेमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. टोलनाक्यांवरून केल्या जाणा-या टोलवसुलीविरोधात देशभरात तसेच राज्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलने झाली व सध्या अनेक ठिकाणी सुरु आहेत.
टोलमुक्तीची घोषणाही निवडणुकीदरम्यान भाजपा नेत्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून टिकेची झोड सुरु आहे. त्यामुळे सरकारही टोलच्या मुद्द्यावर गांभीर्याने निर्णय घेणार असल्याचे समजते.