महापालिका निवडणुकांच्या प्रचारात सर्वच पक्षांना आणि प्रामुख्याने शिवसेनेला अंगावर घेतलेल्या भाजपाने मुंबईत ब-यापैकी बाजी मारली आहे, मुंबईत त्यांची ताकद ब-याच प्रमाणात वाढली आहे, ही वस्तुस्थिती असली, तरी ठाण्यात मात्र त्यांचे साफ म्हणजे अगदी पारच वस्त्रहरण झाले आहे. पालिकेवर भाजपाचा झेंडा फडकावण्याचे भाजपाचे स्वप्न होते. तशा भल्या मोठय़ा वल्गनाही त्यांचे स्थानिक नेते करत होते. मात्र ठाण्यात शिवसेनेला सध्यातरी पर्याय नाही हे निकालानंतर स्पष्ट झाले असून तोंडावर आपटलेल्या भाजपाला सध्या तोंड लपवून फिरावे लागत आहे. कारण पहिल्या क्रमांकाची अपेक्षा करणारी भाजपा तिस-या क्रमांकावर फेकली गेली आहे आणि महापौरपद तर सोडाच, विरोधी पक्षनेतेपदही त्यांच्या हातून गेले आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाने ठाण्यातील भाजपाच्या नेत्यांच्या डोक्यात चांगलीच हवा गेली होती. यामुळे भसाडय़ा आवाजात ‘हम होंगे कामयाब’ म्हणत ठाणे महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत आपण वेगळे लढू, असा आग्रह त्यांनी नेतृत्वाकडे धरला होता. अगदी आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर ठाण्यात झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीवेळीही याच स्थानिक नेत्यांनी पोस्टरबाजी करत स्वतंत्र लढण्याची मागणी केली होती. त्यावेळी ठाण्यावर कमळच फुलणार, असे दावे या नेत्यांकडून केले जात होते, मात्र निकाल पाहता या वल्गना पोकळ असल्याचे सिद्ध झाले आहे. कारण नुसते बोलून चालत नाही आणि दुस-या पक्षांतून आयात केलेल्यांवर अवलंबून राहूनही चालत नाही. स्वत:मध्ये काहीतरी मर्दुमकी, काहीतरी स्पार्क असावा लागतो. अनेक वष्रे कुणाकडे तरी गहाण राहिल्यानंतर अचानक असा तो स्पार्क येत नाही. तसेच सध्या भाजपाच्या बाबतीत ठाण्यात झाले आहे. ठाण्यात भाजपाच्या प्रचाराची आणि संपूर्ण निवडणुकीची धुरा ज्या आमदार संजय केळकरांवर होती, ते सोडता एकाही स्थानिक नेत्याला ठाण्यात काहीही तीर मारता आलेले नाहीत. पाच वर्षाची वैयक्तिक तजवीज मात्र अनेकांची झाली असावी, अशी चर्चा आहे. केळकर यांनीही त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील काही जागा सोडून काहीही विशेष अशी चमक दाखवलेली नाही. त्यांच्या मतदारसंघातील नौपाडा विभागातील चार जागा जिंकणे, याव्यतिरिक्त काहीही विशेष उल्लेखनीय कामगिरी करणे त्यांना जमलेले नाही. त्यामुळे ठाण्यातील भाजपाच्या नेत्यांना त्यांनी ‘कुवत’ आणि ‘औकात’ या निकालाने नक्कीच समजली असेल, असे म्हणायला हरकत नाही.
ठाणे शहरात शिवसेनेने १३१ पैकी सर्वाधिक ६७ जागा जिंकत पालिकेवर स्पष्ट बहुमत मिळवले असून सिंहाचे कपडे घालून वावरणा-या भाजपाचे फक्त २१ नगरसेवक निवडून आले आहेत. विशेष म्हणजे यातील फक्त ९ नगरसेवक भाजपाचे पूर्वीपासून कार्यकर्ते आहेत. उर्वरित सर्व जण कुठल्या तरी पक्षातून आयात केलेले आहेत. त्यामुळे सगळीकडेच भाजपाच्याच जीवावर हे नगरसेवक निवडून आले, असेही म्हणता येणार नाही. ठाण्यातील ज्या नौपाडय़ाच्या निकालाच्या जीवावर सध्या भाजपाचे हे नेते खूश होत आहेत, त्या निकालामध्येही भाजपाचे काही विशेष योगदान नाही. अनेक ठिकाणी त्या नगरसेवकांचे वैयक्तिक बळ असेल. उदाहरण घ्यायचे झाल्यास भाजपाच्या संजय वाघुलेंना आता पक्षाची गरज राहिलेली नाही. ते अपक्ष म्हणूनही निवडून येऊ शकतात. मात्र कुठला तरी शिक्का हवा आणि पूर्वीपासूनचे कार्यकर्ते म्हणून ते भाजपातून निवडणूक लढवतात. त्यामुळे भाजपाचे नेमके यश किती? याचे एकदा ‘माप काढणे’ गरजेचे आहे. नौपाडय़ात उर्वरित जागांवर शिवसेनेत काही उमेदवारांवरून असलेली नाराजी आणि त्यातच मनसेने खाल्लेली काही मते यामुळे तिथे मतांचे विभाजन होऊन भाजपाला फायदा झाला आहे. शिवसेनेत नौपाडा विभागात सारेकाही आलबेल असते, किंवा थेट सांगायचे झाल्यास नव्या चेह-यांना संधी मिळाली असती, तर भाजपाचे आणखी काही नगरसेवक निश्चितपणे कमी झाले असते, यात वाद नाही. ठाणे महापालिका निकालाचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते ती अशी की, भाजपाला ठाणे शहर वगळता कुठेही विशेष कामगिरी करता आलेली नाही. ओवळा, माजिवडा, किसननगर, वागळे इस्टेट या भागात भाजपाचे यश अत्यंत तोकडे आहे. त्याचप्रमाणे कळवा, मुंब्रा आणि दिवा विभागात तर भाजपाला मतदारांनी साफ नाकारले आहे. त्यामुळे वेगळे लढून भाजपाने काय साध्य केले? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ठाणे महापालिकेच्या निकालावर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी विचारमंथन करणे गरजेचे असून नुसत्या पोपटपंची करणा-या नेत्यांच्या ऐवजी खरोखर काम करणा-या नेत्यांना यापुढे संधी देणे गरजेचे आहे. आता मुंबई महापालिकेत भाजपा आणि शिवसेनेची युती झाल्यास ठाण्यातही एखादे सभापतीपद मिळेल, या आशेने भाजपा शिवसेनेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करेल, मात्र शिवसेनेने सदसद्विवेक बुद्धी जागी ठेवली, तर भाजपाच्या नगरसेवकांचा कचरा होणार, हे साफ आहे. त्यांच्यासाठी विशेष आयात केलेले दुस-या मजल्यावरचे ‘भाऊ’ त्यांना कितपत तारतात, यावर सारेकाही अवलंबून आहे.
शिवसेनेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ठाणे आणि शिवसेना हे आता समीकरण बनले आहे. हे समीकरण बदलणे आता सहजीसहजी शक्य राहिलेले नाही. राज्याच्या १० महापालिकांपैकी ठाणे या एकमेव महानगरपालिकेत शिवसेनेला यश, म्हणजे स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मुंबईत बहुमतासाठी झुंजणा-या सेनेला ठाणेकरांनी मात्र साथ दिली असून त्यामुळे ठाणे महापालिकेवरील भगवा कायम राहिला आहे. स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे आगामी काळात शिवसेनेसाठी अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. मग ती विविध समित्यांची निवड असो, स्थायी किंवा परिवहनचे सभापतीपद असो, शिवसेनेला आता यासाठी कुणाचीही मनधरणी करण्याची गरज पडणार नाही, तसेच दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठीही फारशी अडचण येणार नाही. त्यामुळे आता चौपाटी, सेंट्रल पार्क हे प्रकल्प पुढील निवडणुकीपर्यंत वापरात आलेले असतील, शिवाय आता ठाणे महापालिका क्षेत्रात होणारी रस्ता रुंदीकरणाची कामे, कारवाई यात चालणारी हिटलरशाही कमी होईल, अशी अशा करण्यास हरकत नाही. आणि हिटलरशाही कमी झाली, की कधीही येणा-या धमक्या कमी होतील आणि त्यामुळे रात्री बेरात्री ‘कुणा-कुणाला’ फोनही करावे लागणार नाहीत. मुळात हे हिटलर ठाण्यात भाजपाचा झेंडा फडकावण्यासाठीच आणले गेले होते, असे बोलले जाते. मात्र ठाण्यात भाजपाचे पानिपत झाल्यानंतर सध्या त्यांना १३ दिवसांचे कडक सुतक लागल्याची चर्चा पसरली आहे. त्यामुळे आता काही दिवस तरी दुस-या मजल्यावर स्मशान शांतता असणार आहे. त्यात भर म्हणून शिवसेनेने या हिटलरचा बदला घेण्याचा प्रयत्न केला तर? ही भीती सध्या त्यांच्या मनाला खाते आहे म्हणे. त्यामुळे ‘दुसरा मजला’ आता ‘सहाव्या मजल्या’साठी प्रयत्न करू लागल्याची माहिती आहे.
ठाण्यात भाजपाच्या झालेल्या वस्त्रहरणाला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. निवडणुकीच्या काळात तर भाजपाचे काही स्थानिक नेते मॅनेज झाले आणि त्यांनी सेनेच्या चांगल्या उमेदवारांविरोधात मुद्दाम कमकुवत उमेदवार दिले, असेही आरोप झाले होते. त्यामुळे शिवसेनेपुढे ‘लेलेगिरी’ करणारे हे नेते कोण आहेत? कुणावर आरोप झाले होते? आणि ते खरे होते का? याचा आता ‘सखोल तपास’ थेट ‘प्रबोधिनीत’ बसून होणे गरजेचे आहे. शिवाय येऊरचे ते ‘बदनाम फार्महाऊस’ कुणाचे आहे? हेदेखील एकदा स्वत: मुख्यमंत्र्यांनी जातीने येऊन बघणे गरजेचे आहे. त्यानिमित्ताने त्यांना पुन्हा ठाण्यात येण्याची एक संधी तरी मिळेल. अन्यथा पुढील पाच वष्रे तरी मुख्यमंत्र्यांना ठाण्यात येण्याची तशी काही गरज पडेल, असे वाटत नाही. कारण ठाणे शिवसेनेचेच आहे, हे मतदारांनी त्यांना दाखवून दिले आहे.
वस्त्रहरण नक्की झाले कोणाचे ???
analysis चुकले काय or प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे………..
ठाणे
काँग्रेस १८ वरून ०३
भाजपा ०८ वरून २३,