स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विविध राज्यांमधील विधानसभांपर्यंत प्रत्येक स्तरावरील निवडणुकांमध्ये घवघवीत यश संपादन करणा-या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक येथे संपन्न झाली.
भुवनेश्वर- स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विविध राज्यांमधील विधानसभांपर्यंत प्रत्येक स्तरावरील निवडणुकांमध्ये घवघवीत यश संपादन करणा-या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक येथे संपन्न झाली.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मिळालेल्या यशावर समाधान मानू नका, असा सल्ला दिला. ही तर केवळ सुरुवात आहे. भविष्यात पंचायतींपासून संसदेपर्यंत विधिमंडळाच्या प्रत्येक स्तरावर सर्वत्र भाजपचीच सत्ता यायला हवी, असा निर्धार शहा यांनी व्यक्त केला.
गेल्या काही महिन्यांमध्ये पार पडलेल्या सर्व निवडणुकांमध्ये विजयी घोडदौड कायम राखलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. येथील जनता मैदानातील संत कवी भीम भोई सभागृहामध्ये ही बैठक पार पडली.
अपेक्षेप्रमाणे भाजपाध्यक्षांनी, २०१९मध्ये होणा-या विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती तयार करणे आणि भविष्यात पक्षाचा सर्वदूर विस्तार करणे हाच या बैठकीचा प्रमुख अजेंडा असल्याचे स्पष्ट केले. या बैठकीस भाजपचे सर्व १३ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ४५ केंद्रीय मंत्री आवर्जून उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात अमित शहा म्हणाले की, २०१४ मध्ये जेव्हा आपण सत्तेत आलो तेव्हा सर्वजण म्हणत होते की भाजपचा हा सुवर्णकाळ आहे. त्यानंतर २०१७ म्हणजेच यंदा विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या मोठय़ा यशानंतरही अनेकांनी त्याचा पुनरूच्चार केला. मात्र माझ्या मते, भाजपचा सुवर्णकाळ अजून यायचा आहे.
पंचायत ते संसदेपर्यंत भाजपची सत्ता यायला हवी. देशातील १३ राज्यांमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. मात्र देशातील प्रत्येक राज्यात भाजपची सत्ता असावी हा आपला संकल्प असला पाहिजे. हा संकल्प जेव्हा पूर्ण होईल तोच भाजपचा खरा सुवर्णकाळ असेल, असे आवाहन शहा यांनी केले.
ईव्हीएमशी छेडछाड करण्यात आल्याच्या विरोधकांच्या आरोपांवर यावेळी सडकून टीका करण्यात आली. सप, बसप, आप यांना सत्ता मिळाली तेव्हा त्यांना ईव्हीएमवर आक्षेप नव्हता मात्र भाजपला यश मिळताच सर्वांना द्राक्षे आंबट लागू लागली, या शब्दांत शहा यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.