भारतीय स्वातंत्र्यलढय़ाचे अग्रणी नेते महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू हे इंग्लंडहून भारतात परत आले होते.
नवी दिल्ली- भारतीय स्वातंत्र्यलढय़ाचे अग्रणी नेते महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू हे इंग्लंडहून भारतात परत आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आझाद, पटेल हेही अनिवासी भारतीय (एनआरआय) आहेत, असे विधान काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी केले आहे. मूळ काँग्रेसची चळवळ ही अनिवासी भारतीयांनीच उभी केली, असेही ते म्हणाले.
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील सुमारे २००० काँग्रेस समर्थक अनिवासी भारतीयांना राहुल गांधी संबोधित करत होते. राहुल गांधी दोन आठवडय़ांच्या अमेरिकेच्या दौ-यावर आहेत. नवभारताची पायाभरणी करणा-या नेत्यांबाबत आपले विचार मांडताना राहुल गांधी पुढे म्हणाले, की राष्ट्र निर्मात्या नेत्यांपैकी प्रत्येकजण भारताबाहेर गेला, बाहेरचे जग पाहिले, पुन्हा मायदेशात परतला आणि आपल्यासोबत आणलेल्या कल्पनांचा वापर करत त्याने देशाला बदलण्याचे काम केले. असे हजारो आहेत, ज्यांच्या योगदानाची दखल अद्याप घेतली गेलेली नाही याकडेही राहुल गांधी यांनी अनिवासी भारतीयांचे लक्ष वेधले. भारतीय धवलक्रांतीचे जनक वर्गीस कुरियन यांचीही आठवण राहुल गांधींनी यावेळी काढली. कुरियन देखील अनिवासी भारतीय असल्याचे ते म्हणाले.
भारतातील लोक परदेशात राहतात याचा अर्थ त्यांचे आपल्या मायभूमीसाठी काहीच योगदान नाही असे म्हणता येत नाही. अनिवासी भारतीय हे भारताचा कणा आहेत, अशा शब्दात राहुल गांधी यांनी अमेरिकेतील अनिवासी भारतीयांची प्रशंसा केली. अनिवासी भारतीयांना भारताच्या विकासातील महत्वाचे घटक असल्याचे म्हणताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवरही जोरदार टीकास्त्र सोडले. भारतातील केंद्र सरकार हे लोकांमध्ये फूट पाडण्याचे राजकारण करत असून भारतात जातीय हिंसाचार आणि असहिष्णूतेत सतत वाढ होत असल्याचे म्हणत त्यांनी चिंता व्यक्त केली.
[EPSB]