महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील १५ सदस्यीय संघात निवडसमितीने अश्विन, जडेजा आणि शामीला विश्रांती दिली आहे.
नवी दिल्ली- न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन लढतींसाठी भारताच्या संघाची गुरुवारी घोषणा झाली. अनुभवी ऑफस्पिनर आर. अश्विनसह अष्टपैलू रवींद्र जडेजा तसेच मध्यमगती गोलंदाज मोहम्मद शामीला विश्रांती देण्यात आली असून डावखुरा फलंदाज सुरेश रैनाचे पुनरागमन झाली आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील १५ सदस्यीय संघात ऑफस्पिनर जयंत जाधव एकमेव नवा चेहरा आहे.
मोठा हंगाम पाहता एमएसके प्रसादच्या अध्यक्षतेखालील निवडसमितीने अश्विन, जडेजा आणि शामीला विश्रांती दिली आहे. तब्बल वर्षभरानंतर रैनाने पुन्हा वनडे संघात स्थान मिळवले आहे. तो शेवटची वनडे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये खेळला होता. जयंतसह मध्यमगती गोलंदाज जसप्रीत बुमरा, आघाडीचा फलंदाज मनदीप सिंग आणि केदार जाधवला संधी मिळाली आहे. मध्यमगती गोलंदाज उमेश यादवही संघात परतला आहे.
कसोटी संघात पुनरागमन केल्यानंतर सलामीवीर गौतम गंभीरबाबत काय निर्णय होतो, याची उत्सुकता होती. मात्र सलामीला अनुभवी गंभीरऐवजी युवा मनदीपला प्राधान्य दिल्याचे मुख्य सिलेक्टर प्रसाद यांनी सांगितले. दुखापतग्रस्त असल्याने शिखर धवन आणि लोकेश राहुलच्या नावाचा विचार झाला नसल्याचे ते म्हणाले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेला १६ ऑक्टोबरपासून धरमशालामध्ये (हिमाचल प्रदेश) सुरुवात होईल. त्यानंतर नवी दिल्ली (२० ऑक्टोबर), मोहाली (२३ ऑक्टोबर), रांची (२६ ऑक्टोबर) आणि विशाखापट्टनममध्ये (२९ ऑक्टोबर) सामने होतील.
भारताचा संघ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, मनीष पांडे, सुरेश रैना, हार्दिक पंडय़ा, अक्षर पटेल, जयंत यादव, अमित मिश्रा, जसप्रीत बुमरा, धवल कुलकर्णी, उमेश यादव, मनदीप सिंग, केदार जाधव.