ऐन नवरात्र उत्सवात महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी काँग्रेस सोडणे ही साधी घटना नाही. राणेंनी पूर्ण पत्ते उघडले नसले तरी त्यांच्या निर्णयाचे दूरगामी परिणाम होणार आहेत. शिवसेनेला ब्रेक लागणार आहे..
महाराष्ट्राचे राजकारण बदलत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्याने काँग्रेसच्याच नव्हे तर एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहेत. काँग्रेस नावाचा कुणी पक्ष कधीकाळी इथे सत्तेत होता, असे लोक म्हणतील. शिवसेनेला ब्रेक लागेल. भाजपला हेच अपेक्षित आहे. नारायण राणे ही व्यक्ती नव्हती, मुलुखमैदान तोफ होती. सभागृहात बोलायचे तेव्हा सरकारला घाम फुटायचा, विरोधकांच्या चिंधडय़ा व्हायच्या. काँग्रेसला त्यांचा उपयोग करता आला नाही. त्या उपेक्षेचा कधीतरी स्फोट होणार होता. आज काँग्रेसकडे रोखठोक बेधडक बोलणारा कोण आहे? एक नेता सांगा.
पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील म्हणजे भेंडीची भाजी आहे. अजित पवार, सुनील तटकरे या नेत्यांवर घोटाळ्यांची टांगती तलवार आहे. त्यामुळे त्यांना सांभाळून बोलावे लागते. गेल्या तीन वर्षात सभागृहात हेच दिसले. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरही विरोधक एकत्र नव्हते. उपचार म्हणून, संघर्ष यात्रेपुरते ते एकत्र दिसले. स्वत:ला विरोधी नेते म्हणवणारी ही नेतेमंडळी हातचे राखून बोलत गेल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक अधिवेशन सोपे गेले. मुख्यमंत्रीही खासगीत ही गोष्ट कबूल करतात. पण प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण गंभीर नाहीत. काही दिवसांपूर्वी नांदेड या त्यांच्या गावच्या काँग्रेसच्या पाच नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला तेव्हाही चव्हाण असेच बोलले होते. असल्या बेपर्वा वृत्तीनेच त्यांनी काँग्रेसला आजच्या स्थितीत आणून सोडले आहे. राणे काँग्रेस सोडणार याची चर्चा काही महिन्यांपासून सुरू होती. पण कुणीही थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. या पराभूत मानसिकतेनेच काँग्रेसमध्ये केवळ ‘आऊटगोइंग’ सुरू आहे.
एकही नवा कार्यकर्ता आला नाही. आहेत तेच आपल्या मठावर नागोबा बनून बसले आहेत. पक्ष वाढावा असे कुणालाही वाटत नाही. हायकमांडलाही पराभव आवडतोय की काय? कारण भाजपची सत्ता आल्यानंतर झालेल्या बहुतेक महापालिका, नगर पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेस मार खात आली आहे. पण पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना कुणी जाब विचारला नाही. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रोखण्यासाठी श्रेष्ठींनी चव्हाणांना पाठवले. पण पवारांना रोखणे तर दूर राहिले. यांनी काँग्रेसलाच संपवण्याचे काम केले. चव्हाण ‘आदर्श’ घोटाळ्यात अडकले आहेत. अशा नेत्याला खरे तर बाजूला ठेवायला हवे. पण दिल्लीश्वरांनाही काँग्रेसमुक्तीची घाई झाली की काय असा प्रश्न पडतो.
राणेंनी जाताना अशोक चव्हाण यांना टारगेट केले. कार्यकर्त्यांच्या मनातले ते बोलले. राणेंनी हिंमत दाखवली एवढेच. या चव्हाणांविरूध्द विदर्भातील काँग्रेस नेत्यांनीही गेल्या कित्येक महिन्यांपासून मोहीम चालवली आहे. राहूल गांधी यांना भेटून या नेत्यांनी विदर्भासाठी वेगळी काँग्रेस समिती देण्याची मागणी केली. राहूल यांनी ऐकून घेतले. पण काहीही केले नाही. त्यामुळे समांतर काँग्रेस उभारून प्रदेश काँग्रेसला शह देण्याच्या हालचाली विदर्भात सुरू आहेत. सतिश चतुर्वेदी, नरेश पुगलिया, शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, नितीन राऊत, अनीस अहमद आदी दिग्गज नेते यासाठी विदष्टद्धr(149)रात फिरणार आहेत. इंदिरा गांधी जन्मशताब्दीचा १९ नोव्हेंबर रोजी समारोप आहे. पण त्यासाठी प्रदेश काँग्रेसने अजून कुठलाही कार्यक्रम जाहीर केला नाही. भाजपवाले २०१९ च्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. पण काँग्रेसच्या नेत्यांकडे कार्यकर्त्यांना द्यायला कार्यक्रमच नाही. नागपुरची काँग्रेस गटबाजीसाठी जगप्रसिध्द आहे. नागपूर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे आणि माजी खासदार विलास मुत्तेमवार विरूध्द सगळे अशी ही लढाई आहे. महापालिका निवडणुकीत या शक्तीप्रदर्शनाचा वाद विकोपाला गेला.
हसनबागेतील प्रचार सभेत अशोक चव्हाण यांच्या अंगावर शाई फेकण्यात आली. या घटनेला वर्ष उलटूनही श्रेष्ठींनी कुणावर कारवाई केली नाही म्हणून शहर काँग्रेसचा गट संतप्त आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदही असंतुष्ट गटाने पळवल्यामुळे मोठी रिअॅक्शन आहे. मुत्तेमवार गटानेही तलवारी उपसल्या. दिल्लीला जाऊन राहूल गांधींना भेटायचे ठरवले आहे. गेल्या कित्येक वर्षापासून नागपुरची गटबाजी सुरू आहे. पण अशोक चव्हाण यांना दोन्ही गटांना एकत्र बसवता आलेले नाही. नागपुरात भाजपचा गड आहे, इथला मुख्यमंत्री आहे, अशा उपराजधानीच्या गावात काँग्रेसने जातीने लक्ष द्यायला हवे होते. पण अंगावर शाई पडल्यापासून चव्हाणांनी नागपुरची एवढी दहशत घेतली आहे की, इकडे ते फिरकलेही नाहीत. नेत्याचेच दुर्लक्ष झाल्याने एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या विदर्भात काँग्रेसचा कार्यकर्ता शोधावा लागतो, अशी परिस्थिती आहे.
येत्या काळात हे चित्र आणखी कठीण होणार आहे. राणे काय खुशीने गेले नाहीत. गेली १२ वर्षे त्यांचा कोंडमारा सुरू होता. अनेक काँग्रेसजन या कोंडीतून जात आहेत. राणेंसारखे नेते हिंमत करून मोकळे होतात. प्रत्येकाला हे जमत नाही. निवडणुकीत घरी बसणे ते पसंत करतात. कुणीतरी सुरूवात करायची गरज होती. आता तुम्ही पहाल काँग्रेस रिकामी व्हायला सुरूवात होईल. राणे यांनी अजून आपले सारे पत्ते उघड केलेले नाहीत. ते कुठे जाणार? भाजपात जाणार की सदाभाऊ खोतांसारखी भाजपशी जवळीक ठेवणार की स्वत:चा वेगळा राजकीय पक्ष काढणार? याची उत्सुकता आहे. पुढच्या महिन्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. समर्थ पॅनलच्या झेंडय़ाखाली त्या लढवण्याची घोषणा राणेंनी केली आहे. सदाभाऊ खोतांप्रमाणे राणेंना भाजप बाहेरून रसद पुरवू शकतो. पण राणेंसारखा समुद्रात पोहण्याची सवय असलेला नेता डुबक्या मारण्याच्या भानगडीत पडणार नाही.
योग्य मुहुर्त साधून ते थेट भाजपात उडी घेतील असे त्यांच्या समर्थकांना वाटते. तसे झाले तर महाराष्ट्रासाठी तो शुभशकून असेल. मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी असल्या प्रश्नांचे मोठे आव्हान राज्यापुढे आहे. हे किचकट विषय मार्गी लागायला राणेंच्या पुढाकाराने मदत होणार आहे.राहिला विषय शिवसेनेचा. राणे भाजपात आले तर शिवसेनेची काय भूमिका असेल? सरकारमधून सेना बाहेर पडेल काय? सेनेच्या अल्टीमेटमची चर्चा आहे. पण मुख्यमंत्री ‘अल्टीमेट’ आहेत. आतापर्यंत सांभाळले तसे आताही सांभाळून घेतील. मुख्यमंत्र्यांच्या मुत्सद्देगिरीचा कस लागणार आहे आणि एक सांगू का? सेना बाहेर पडली तरी सरकार काही कोसळत नाही. तसे झालेच तर राष्ट्रवादीलाही भाजप सोबत घेऊ शकतो. जनतेत काय संदेश जाईल याची चिंता संघवाले करीत बसतील. भाजपसाठी आता कुणीही अस्पृश्य नाही.
बिहारच्या फॉम्र्युल्याने हे दाखवून दिले. त्यामुळे फार ‘सोवळे’ पाळण्याच्या नादात कुणी जाऊ पाहणार नाही. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोविंद यांना १६ मते जास्तीची मिळाली. दोन्ही काँग्रेसच्या आमदारांची ही मते होती. मुख्यमंत्री म्हणाले ते ‘अदृश्य हात’ हेच आहेत. या आमदारांनी भाजपमध्ये जाण्याची मानसिकता बनवली आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका २०१९ मध्ये आहेत. या दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याचे सुरू आहे. या निवडणुकांच्या आधीच काही विरोधी आमदार भाजपमध्ये गेलेले दिसतील. सेनेचे २५ आमदार फुटणार असल्याची चर्चा आहे. फुटले तर आश्चर्य नको. पुढच्या निवडणुकीचा निकाल काय लागणार ते आजच दिसते आहे. आमदार साधूसंताचा मठ उघडून बसलेले नाहीत. सत्ता मिळेल तिकडे ते जाणार. येत्या निवडणुकीत कुणाची सत्ता येणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना पर्याय नाही. फडणवीस यांचे सरकार येत्या ३१ ऑक्टोबर रोजी तीन वर्षे पूर्ण करीत करीत असताना देवीच्या ऐन नवरात्रात राजकारण तापले आहे.
[EPSB]
नारायण राणे यांच्या समर्थनार्थ पदाधिका-यांचे सामूहिक राजीनामे
[/EPSB]