महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपल्या बांबरवाडीत एखादा स्टेज कार्यक्रम करावा असे सरपंच आप्पा गावडे यांच्या मनात आले. आपला विचार त्यांनी काही जणांकडे बोलूनही दाखविला. आणि मग त्यासंदर्भात सिद्धेश्वराच्या देवळात ग्रामस्थांची मिटिंग बोलविण्यात आली.
त्या मिटिंगला स्वत: सरपंच आप्पा गावडे, तातू बावधनकर, बबन्या सुतार, विश्वनाथ पराडकर, किशोर, शित्या चौकेकर, आबा शेलार कविवर्य बबन धारगळकर, तात्या डांगे वगैरे ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. गावात कधी नाही तो स्टेज शो होणार याचे सर्वानाच कौतुक होते.
इतरांपेक्षा काहीतरी वेगळा कार्यक्रम करावा असं मत जेव्हा कविवर्य बबन धारगळकर याने मांडले तेव्हा सरपंच आप्पा गावडे त्याला म्हणाले, ‘ठीक हा! बबन्या, तूच काय तो येगळो कार्यक्रम सुचव. पन त्येचो खर्च जास्ती आसता कामा नये.’
‘माज्या मते यावेळी आपन कविसंमेलन भरवया. अगदी आपल्या बजेटात बसणारो कार्यक्रम आसा.’
‘कविसंमेलन म्हंजे नेमक्या काय?’ किशोरला हा प्रकार न कळल्याने त्याने भाबडेपणाने विचारलं. त्याच्या शंकेचं निरसन करत बबन म्हणाला,
‘कविसंमेलन म्हंजे सगळे कवी एकटय येव्न आपापली कविता सादर करतत.’
‘म्हंजे नेमक्या काय करतत?’
‘तुज्या बापाशीचा श्राद्ध घालतत.’ किशोरच्या अडाणी बोलण्यावर आबा शेलार जाम वैतागला. पण गावात कधी नाही ते आपल्या कवितांना व्यासपीठ मिळतंय ते हातचे जावू नये यासाठी बबन धारगळकर शांतपणे म्हणाला,
‘काय आसता किशोर, जे कविता लिवतत तेंका कवी म्हंतत. अशे कवी संबूर बसतले आनी आपली कविता म्हंतले. आता मी सोता एक कवी आसय. आपल्या गावात हेमलता पाटील हल्ली कविता करूक लागला हा. शिवाय आन्खी दोन-चार कविंका बोलवया. अध्यक्ष म्हणान मोठो कवी हाडया.’
‘पन त्येंचो खर्च..’ बबनचं बोलणं मध्येच थांबवत आप्पा गावडे म्हणाला. यावर बबन ठामपणे बोलला,
‘खर्चाची काळजी नूको. कविसंमेलनाक जो खर्च येतलो तो मी करतंय.’
‘मग ठीक आसा. गावातलो कोनतरी फु डे येताहा, त्येका आपन सगळयांनी साथ देवया.’ गावातला कोणीतरी पुढे जातोय यापेक्षा कविसंमेलनाचा खर्च बबन स्वत: करतोय म्हणूनच तात्या डांगेने आपली संमती दिली. मग सगळयांचेच कविसंमेलनाबाबत एकमत झाले. पहिल्याच बैठकीत कधी नव्हे तो बिनविरोध ठराव झाला.
कविसंमेलनाचे निश्चित झाल्यावर बबन धारगळकर भयंकर खूश होता. आजवर कुठल्याही कविसंमेलनात व्यासपीठ न मिळालेल्या बबनला गावातल्या संमेलनाची मॅनेंजमेंट मिळाली होती. हक्काचे व्यासपीठ मिळाले होते.
बबन धारगळकरने आजवर शंभराच्या आसपास कविता केल्या होत्या. सगळयाच कविता स्वानुभवावर आधारित होत्या. अनेक दैनिक, साप्ताहिक तसेच मासिकांमध्ये त्याने त्या प्रसिद्धीसाठी पाठविल्या. पण का कोण जाणे! एकाही संपादकाला कविवर्य धारगळकरांचा ‘स्वानुभव’ लोकांपर्यंत पोचवावासा वाटला नाही. त्यामुळे त्याच्या कविता प्रसिद्धीपासून अलिप्त होत्या. स्वत:ला हा बबन शिघ्रकवी समजायचा.
अर्थात त्याच्यात तथ्यही होतं. बसल्या जागी तो पाच-सहा कविता सहज खरडवून काढायचा. त्यानंतर शांतपणे तो यमक जुळवत बसायचा. कविसंमेलनाचं एकदाचं निश्चित झाल्यावर त्याने सर्वप्रथम हेमलताला गाठलं. हल्ली-हल्लीच हेमलता कविता करायला लागली होती. ‘पान’, ‘फू ल’, ‘कळी’ या कवितेंवरूनच ही निसर्ग कवयित्री आहे हे सुजाण वाचकांच्या लक्षात आले असेल.
कविसंमेलनाची एकंदर रूपरेषा निश्चित ठरविण्यासाठी आणि नवीन कवितेची निर्मिती करण्यासाठी बबन रोज संध्याकाळी हेमलताला घेवून गावाबाहेरच्या नदीकाठी जावू लागला. खांद्याला शबनम अडकवलेला बबन आणि पर्स व दोन-चार वहया घेतलेली हेमलता ही जोडी गावातून निघाली की, विहिरीवर पाणी भरत असलेल्या बायकांची कुजबूज सुरू होई.
‘तो बग बबन कविता करूक चल्लो. कसो काय कविता करता कळना नाय.’ अशांसारखी वाक्ये आणि कुतूहुलपूर्वक नजरा त्यांच्यावर खिळल्या की, दोघांनाही कवी झाल्याचे सार्थक वाटे. रोज संध्याकाळी ही दोघं नक्की कसल्या कविता करायला जातात हे पाहण्यासाठी गावातल्या काही टारगट पोरांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. परंतु नदीकाठी बसून एकमेकांच्या डोळयात बघत त्यांचे ‘मूकस्पंदन’ पाहून दोन दिवसानंतर पोरांनी हा नाद सोडून दिला.
कदाचित पोरांचे ते उद्योग बबनला माहिती असावेत. कारण पोरं येईनाशी झाल्यावर डोळयांबरोबरच त्यांचे हात, पाय वगैरेसुद्धा एकमेकांकडे बघायला लागले.
खास प्रसिद्ध कवी संदेश ताडगांवकर यांना बबनने कविसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून आमंत्रित केले होते. अर्थात हा दीड-दोन हजारांचा खर्च कवितेच्या प्रेमापोटी त्याने बायकोसाठी केलेले मंगळसूत्र गहाण ठेवून केला होता. अध्यक्ष ताडगांवकर जेव्हा बांबरवाडीत आले तेव्हा त्यांच्याबरोबर गावात फिरून लोकांच्या खेचून घेतलेल्या नजरेत त्याचा अर्धा खर्च वसूल झाला होता.
प्रत्यक्षात कविसंमेलनाचा दिवस उजाडला तेव्हा सर्वाचीच उत्सुकता शिगेला पोचली होती. कार्यक्रमाला गर्दीही भयंकर होती. फिक्कट गुलाबी रंगाची साडी नेसलेली हेमलता आणि पांढरा झब्बा-लेंगा घातलेला बबन नवीनच लग्न झालेल्या जोडप्याप्रमाणे वावरत होते. गावातल्या या दोन कवींबरोबर जिल्हयातले आणखी तीन कवी व्यासपीठावर स्थानापन्न झाले. अध्यक्ष कविवर्य संदेश ताडगांवकर यांची सन्मानीय उपस्थिती सर्वाचेच लक्ष वेधून घेत होती.
तबला-पेटीच्या तालावर धुंद गाणी होणार असं या कार्यक्रमाबाबत सर्वाचंच मत होतं. परंतु कार्यक्रमाला सुरुवात झाल्यावर जसजशा कविता वाचल्या जावू लागल्या तशी लोकांमधली कुजबूज, जांभया, डुलक्या आणि शेवटी-शेवटी बैठकीची आवराआवर सुरू झाली. निसर्ग कवयित्री हेमलताने पान, फू ल, कळी या जुन्या कवितेंबरोबरच खास कविसंमेलनासाठी लिहिलेल्या देठ, खोड, सोटमूळ, गवत, पर्वत आदी दहा-बारा कविता वाचून मागची बरीचशी माणसं उठविण्यात मोलाचा हातभार लावला.
ख-या अर्थी कार्यक्रमाचे हिरो असलेले बबन धारगळकर यांनी स्वानुभवावर आधारित असलेल्या ‘माझा पहिला फ राळ’, ‘मी खड्डयात पडलो तेव्हा..’, ‘बापाचा मार आणि आईची डागणी’ अशा दहा कविता वाचल्या. बबनच्या कविता संपल्या तेव्हा अवघी दहाच माणसे शिल्लक होती. अर्थात ते मंडळाचे कार्यकर्ते होते. काही असलं तरी बबनच्या कवितेवेळी हेमलता मध्ये-मध्ये ‘वा! क्या बात है’ वगैरे म्हणत असल्यामुळे बबन खूष होता.
अर्थात हेमलताच्या वेळी बबननेसुद्धा चार-पाच वेळा ‘बहोत खूब!’ म्हटल्यामुळे ती त्याच्या ऋणात होती. सर्वात शेवटी अध्यक्ष ताडगांवकर यांनी सद्यस्थितीवर चार कविता पेश केल्या आणि कविसंमेलनाची सांगता झाली. डोळे चोळत असलेल्या कार्यकर्त्यांनी समाधानाने आवराआवर केली. त्यापैकी एकाने बबनला ‘अध्यक्षांपेक्षा तुझ्या कविता ब-या होत्या’ असं सांगितल्यामुळे तो हवेतच तरंगत होता. ताडगांवकरांना आपल्या घरी घेवून जाताना बबनने त्यांना विचारलं,
‘माझ्या कविता कशा वाटल्या?’ ते बिचारे काय बोलणार? ठीक आहे म्हणाले. त्यांचे बोलणं बहुधा बबनला रूचलं नसावं. कारण तो त्यांना लगेच म्हणाला,
‘साहेब, तुमच्या कविता ब-या होत्या. पण सर्वसामान्यांना त्या कळत नाहीत. सगळयांना समजलं तरच ते यशस्वी लेखन असं माझं मत आहे.’
प्रत्यक्ष कविवर्याची ही अवहेलना! ताडगांवकर काही क्षण बबनकडे पहातच राहिले. काय बोलावे तेच त्यांना सुचेना. खरोखरच त्यांच्या सोशिकतेला एखाद्याने दाद दिली असती. दुस-या दिवशी ते लवकर उठले. आपलं मानधन घेतलं आणि बबन धारगळकराचा निरोप घेवून मिळेल ती पहिली गाडी त्यांनी पकडली. कारण त्याच्याशी आणखी काही वेळ जरी त्यांनी काव्यावर चर्चा केली तर स्वत:चं काव्य बांबरडवाडीच्या भूमीत गहाळ होण्याची त्यांना अधिक भीती होती.