पैशांच्या हव्यासापोटी ग्रामीण भागांतील महिलांनी शस्त्रक्रिया करून त्यांची गर्भाशये काढून टाकल्याचा प्रकार कर्नाटकात २०१५ साली उघड झाला होता.
बंगळुरू- पैशांच्या हव्यासापोटी ग्रामीण भागांतील महिलांनी शस्त्रक्रिया करून त्यांची गर्भाशये काढून टाकल्याचा प्रकार कर्नाटकात २०१५ साली उघड झाला होता. चार रुग्णालयांमध्ये हे गोरखधंदे सुरू होते. यात तब्बल २२०० महिलांची गर्भाशये काढून टाकण्यात आल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
गर्भाशयाशी संबंधित आजार झाल्यास त्यात कॅन्सरचीही शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला महिलांना दिला जातो. ही शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयांमध्ये अतिशय महागडी असते. मात्र जीवावर बेतणार असल्याने ही शस्त्रक्रिया करून घेण्याकडेच महिला आणि त्यांच्या परिवाराचा कल असतो.
अशाप्रकारे महिलांची फसवणूक होत असल्याचे अनेकदा बोलले जात असले, तरी अशी प्रकरणे समोर आली नव्हती. आता कर्नाटकातील प्रकरणामुळे अशा घटना घडत असल्याचा धडधडीत पुरावाच समोर आला आहे. २०१५ साली या प्रकारांना वाचा फुटली होती. त्यानंतर सुमारे २२०० महिलांची गर्भाशये अशाच प्रकारे विनाकारण काढून टाकण्यात आल्याची आकडेवारी समोर आली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे ही चाही रूग्णालये अजूनही बिनदिक्कतपणे सुरू असून त्यांच्या व्यवस्थापकांवर गुन्हे दाखल करत रुग्णालये बंद करण्याची मागणी महिलावर्गाने केली आहे. याच मागणीसाठी सोमवारी कर्नाटकातील कालबुरागी येथे स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांसह शेकडो पीडित महिला रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. कर्नाटकातील खाजगी वैद्यकीय कायदा अधिक कडक करण्याची मागणी या महिलांनी केली.
ग्रामीण भागातील महिलांना वैद्यकीय उपचारांबाबत अज्ञान असते. याच अज्ञानाचा गैरफायदा घेत केवळ पैसे कमावण्यासाठी त्यांच्यावर चुकीचे उपचार केले जात असून यामुळे महिलांचे मात्र हकनाक नुकसान होत आहे. त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेऊन सरकारने कडक पावले उचलण्याची मागणी महिलावर्गाने केली आहे.